सेतुमाधवराव श्रीनिवास पगडी

Pagdi, Setumadhavrao Shrinivas

इतिहासाच्या अभ्यासात, संशोधनात तसंच सनदी सेवेसाठी योगदान देणार्‍या सेतुमाधवराव पगडी यांचा जन्म २७ ऑगस्ट १९१० साली झाला.इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दुचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता, फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रकाशित केले आहे. “भारतीय मुसलमानः शोध आणि बोध“ व “१८५७चे आणखी काही पैलू“ ही त्यांची दोन पुस्तके परचुरे प्रकाशन संस्थेनी प्रसिध्द केली आहेत.

सेतु माधवराव पगडी हे १९६० ते१९६९ या काळात महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून व त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.

मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लनेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“ , “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“चे अध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भुषविलेले आहे.

मराठवाडा विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानाची पदवी प्रदान करून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला होता . पगडी यांच्या “जीवनसेतु“, “छत्रपती शिवाजी“ या त्यांच्या माहितीपर ग्रंथाना राज्य पुरस्कार, मराठा मंदिरातर्फे चरित्रकार पदक आणि न. चिं. केळकर पारितोषिक प्राप्त झाले.

भारत सरकारच्या पद्मभुषण पुरस्काराने सेतुमाधवराव पगडी यांना गौरविण्यात आले आहे.

१४ ऑक्टोबर १९९४ रोजी सेतुमाधवराव पगडी यांचे निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*