एका राज्याचा राजकुमार असलेला सिद्धार्थ ज्या वेळेस सर्व संसाराचा, मोहाचा त्याग करून सत्याच्या शोधासाठी महालाबाहेर पडला. काही वर्षांच्या तपानंतर सिद्धार्थ म्हणजेच गौतमबुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली. त्यावेळेस लोकांनी गौतमबुद्धांना विचारले, ”ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे तुम्हाला काय मिळाले ?” त्यावर बुद्धांनी उत्तर दिले, ”मला काहीच मिळालं नाही उलट जे माझ्याजवळ होतं ते मला आधीच मिळालं होतं याची जाणीव झाली.” त्यांच्या ‘शिष्याने’ त्यांना एकदा प्रश्न केला, ”तुम्ही असे काय केलेत की ज्यामुळे तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाली.” त्यावेळी बुद्धांनी उत्तर दिले, ”जोपर्यंत मी जाणूनबुजून काही करीत होतो तोपर्यंत मला काहीच मिळालं नव्हतं आणि ज्या वेळेला काही करणे सोडून दिले तेव्हा बरंच काही मिळालं. जोपर्यंत काहीतरी करण्याच्या प्रयत्नात होतो तेव्हा मन अस्वस्थ, अशांत होतं. पण सर्वसंग परित्याग केल्यावर मात्र मनाला कोणतेही व्यवधान नाही, कोणत्याही विकाराचे विचार नाही. त्यामुळे मन शांत शांत झाले आणि जे माझ्या आत होतं त्याचा मला शोध लागला.”
तात्पर्य – ज्ञानप्राप्ती म्हणजेच अंतरात्म्याचा शोध.
Leave a Reply