आनुवंशिकेची जाणीव : कुटुंबांची गोत्रे

गोत्र हे देखील कुटुंब आणि व्यक्ती ओळखण्याचे साधन आहे. आणि त्याबद्दल विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. निरीक्षणे आणि अनुभवावरून मानवाने ज्ञान मिळविले आहे. कदाचित निरीक्षणे आणि अनुभवावरून त्याच्या लक्षात आले असावे की, पितृवंशाकडून जास्त प्रभावी गुणसुत्रे, अपत्यात प्रवाहित होत असावीत. म्हणूनच नर अपत्यांना, पित्याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते. हाच नियम मादी अपत्यांच्या बाबतीत का पाळला जात नाही? मुलीचा विवाह झाला की तिला नवर्‍याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते म्हणजे तिचे आडनाव आणि गोत्रही बदलते. वास्तविक आडनाव, मानवनिर्मित आहे तर गोत्र आनुवंशिक आहे. आनुवंशिक गुणधर्म कुणालाही बदलता येत नाहीत. गोत्र हे आनुवंशिकतेचे प्रतीक असल्यामुळे, नवीन गोत्र धारण करणे, विज्ञानीय दृष्ट्या, अगदी चुकीचे आहे.

आपल्या पूर्वजांनी, अनेक मातापित्याचे स्वभाव, सवयी, रंगरूप, डोळ्यांचा-केसांचा रंग, चेहर्‍याची ठेवण, आवाज, बुद्धी, संगीताचे ज्ञान, कला, मधुमेहासारखे रोग वगैरे आणि त्यांच्या अपत्यांच्या ह्याच गुणावगुणांचा अभ्यास करून नोंदी ठेवल्या असाव्यात. ह्या निरीक्षणांवरून कदाचित त्यांना असे आढळले असावे की पित्याकडून आलेली आनुवंशिकता जास्त प्रमाणात असते म्हणून पित्याचे आडनाव लावण्याची प्रथा पडली असावी. गोत्रांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला असावा. बर्‍याच प्रमाणात सारखे आनुवंशिक गुणावगुण असलेल्या कुटुंबांचे त्यांनी काही गट निर्माण केले आणि त्यांना ऋषिची नावे देअून गोत्रांची संकल्पना रूढ केली असावी. आता जनुक नकाशामुळे ह्या संकल्पनांवर प्रकाश पडण्यासारखा आहे.

स्वतः पुरूष व्यक्ती, त्याचे आअी-वडील, आजी-आजोबा आणि त्यांच्या पूर्वपिढ्या, तसेच त्या पुरूष व्यक्तीची पुरूष अपत्ये, नातू-पणतू वगैरे पुढील पिढ्या, या सर्वांचा अेक कुटुंब गट, आनुवंशिक दृष्ट्या ओळखण्यासाठी गोत्र या संकल्पनेचा अुदय आणि विकास झाला. या गटातील सर्व संबंधित स्त्रियांनाही सरसकट तेच गोत्र देण्यात आले. वास्तविक या स्त्रिया वेगवेगळ्या गोत्राच्या कुटुंबात जन्मल्या होत्या. खरे पाहिले असता गोत्रालाही शास्त्रीय आधार नाही. समान आनुवंशिक गुणधर्म असलेल्या व्यक्तींच्या गटाला ‘गोत्र‘ असे नाव दिले गेले असावे आणि ते गट ओळखण्यासाठी त्यांना ऋषिची नावे दिली गेली असावीत.

जनुके, गुणसूत्रे आणि डीअेनअे यांच्या संचानुसार केलेल्या गटांना मात्र शास्त्रीय आधार असेल. ते गट म्हणजे शास्त्रीय गोत्रे असतील. अेकाच गोत्राची, भिन्न स्थानी वास्तव्य करणारी कुटुंबे अलग अलग ओळखण्यासाठी आडनावांची संकल्पना रुजली असावी. ‘जात‘ म्हणजेच आनुवंशिकता असे समीकरण असल्यामुळे, आडनाव म्हणजेही जात असे समीकरण झाले. अनेक जातीमध्ये देखील, समान आनुवंशिक गुणधर्म आढळले असावेत. म्हणूनच तीच ती गोत्रे अनेक जातींमध्येही आढळतात. आता आपल्या लक्षात येअील की, आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी आडनावांची प्रथा मुळात रूढ झाली, परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होअून विचित्र आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालू राहिली. कुलनाम वापरावयाची प्रथा जरी जुनी असली तरी तिचा वापर फारसा होत नसे. अिंग्रजांच्या राजवटीपासून मात्र आडनाव वापरावयाची प्रथा रूढ झाली आणि आता आडनांव बदलण्याची किंवा आडनाव नकोच अशी चळवळ सुरू झाली आहे.

सध्या प्रचलित असलेल्या मराठी आडनावांची निर्दोष स्वरूपात जंत्री म्हणजे मराठी मातृभाषिकांच्या आडनावांचा कोश करण्याचे काम फार मोठे आहे. प्रत्येक आडनावाचा खरा अितिहास किंवा अुपपत्ती जाणून घेणे तर त्याहूनही कठीण आहे. मराठी आडनावांची संख्या लाखाच्या आसपास असावी असा माझा अंदाज आहे.

— गजानन वामनाचार्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*