‘‘नारद हा सर्वश्रेष्ठ भक्त’’ या सगळ्यांनी केलेल्या कौतुकामुळे नारदाला त्याचा गर्व झाला होता. हे ब्रह्मदेवाने ओळखले आणि नारदाला पृथ्वीवर जाण्यास सांगितले. पृथ्वीवर एक शेतकरी माझा परमभक्त आहे त्याची भेट घेण्यास सांगितले. नारद पृथ्वीवर आला शेतकर्याच्या घरी गेला, त्याला भेटला. त्याने शेतकर्याची दिनचर्या पाहिली की सकाळी उठल्यावर एकदाच परमेश्वराला नमस्कार करून हरी ॐ म्हणून तो शेतावर जातो आणि रात्री पुन्हा एकदा हरी ॐ म्हणून झोपी जातो. त्याचा हा दिनक्रम पाहिल्यावर नारद स्वर्गात परतला आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, ‘‘देवा, मी दिवसभर ‘नारायण, नारायण’ म्हणत तुमचा जप करतो पण तुम्हाला मात्र पृथ्वीवरचा शेतकरी प्रिय आहे.’’ नारदाच्या या वाक्यावर ब्रह्मदेव एक तेलाने गच्च भरलेली वाटी नारदाच्या हातात देतात आणि, ‘‘वाटीतील तेल थेंबभर ही न सांडता पृथ्वी प्रदक्षिणा करून ये !’’ असे नारदाला सांगतात. त्याप्रमाणे नारद पृथ्वी प्रदक्षिणा करून येतो. आल्यावर ब्रह्मदेव त्याला विचारतात, ‘‘पृथ्वी प्रदक्षिणा करताना कितीवेळा माझं नामस्मरण केलं ?’’ त्यावर नारद म्हणतात, ‘‘नामस्मरण मी कधी करणार ? कारण वाटीतील तेल सांडू नये याकडे माझं सर्व लक्षं होतं.’’ त्यावर ब्रह्मदेव त्याला म्हणतात, ‘‘अरे, तुझ्यासारख्या श्रेष्ठ, ज्ञानी भक्ताची अशी अवस्था झाली तर त्या सामान्य शेतकर्याने काय करायचं ? दिवसभर कुटुंबाच्या पालन पोषणासाठी तो कष्ट करीत असतो. त्याच्यावर संसाराची जबाबदारी असतानासुद्धा तो दिवसातून दोन वेळा माझं भत्ति*भावाने स्मरण करतो तर त्याची भक्ती ही श्रेष्ठ दर्जाचीचआहे.
तात्पर्य – संख्येपेक्षा निष्ठा महत्त्वाची.
Leave a Reply