‘‘अगदी बरोबर ! खुद्द फंयादेखील म्हणत होते.’’ ‘‘फंया कोण ?’’ ‘‘थिबा. ब्रह्मदेशच्या राजाला ब्रह्मी भाषेत आदरार्थी फंया म्हणतात. फंया म्हणजे राजाधिराज.’’ ‘‘पण ‘जयमंगल’ चं काय झालं ?’’ ‘‘तो चोरीस गेला. त्याची एक मजेदार गष्ट आहे.’’ व्हाइटने व्हिस्कीचे दोन ग्लास काठोकाठ भरले. एक माझ्यासमोर ठेवला व दुसरा स्वतः अर्धा रिकामा करून सिगारेट पेटवली व माझी गोष्टी ऐकण्याची पूर्वतयारी केली. एवढे झाल्यावर तो मला म्हणाला, ‘आता सांगच ती गोष्ट.’ ‘‘१९८६ साली ब्रिटिश सरकारनं फंयांना वेडे ठरवून रत्नागिरीला आणलं,’’ मी गोष्ट सांगू लागलो. ‘‘खरच थिबा वेडा होता ?’’ व्हाइटने मधेच पुटका टाकला. ‘‘मला कधी त्याचं वेड दिसून आलं नाही. त्यांच्याबद्दल कैक आख्यायिका रत्नागिरीत प्रसिद्ध आहेत. ते जेव्हा रत्नागिरीत आले तेव्हा त्यांच्याजवळ पुष्कळ जडजवाहीर होतं. परंतु साहेब लोक ते लांबवतील या भीतीनं त्यांनी ते आपले शिपाई-प्यादी, न्हावी-धोबी यांच्यात वाटून टाकलं असं म्हणतात
— र. वा. दिघे (किमत)
Leave a Reply