एकदा एक राजा आपल्या प्रधानाला बरोबर घेऊन शिकारीला जातो. मधेच थोडेसे ढग गोळा होऊन अंधारल्यासारखे वाटते. राजाबरोबर बराच लवाजमा असतो. पाऊस आला तर सुरक्षित जागा शोधायला हवी म्हणून राजा प्रधानाला विचारतो, ‘‘पाऊस पडेल असे तुम्हाला वाटते का ?’’ प्रधान त्यावर ‘‘काही सांगता येत नाही’’ असे उत्तर देतो. तेवढ्यात समोरून एक गुराखी येत असतो. राजा त्यालाही हा प्रश्न विचारतो. त्यावर गुराखी म्हणतो, ‘‘हो, थोडाच वेळाने पाऊस पडेल.’’ आणि थोडावेळाने खरोखर पाऊस पडतो. ते पाहून राजास प्रधानाचा राग येतो आणि इतके साधे उत्तर देता आले नाही म्हणून त्याचे पद काढून त्या जागी गुराख्याची नेमणूक करतो. काही दिवसांनी शत्रूचे राज्यावर आक्रमण होणार आहे अशी बातमी राजाला हेरांकडून समजते. तो नवीन प्रधानाला म्हणजे गुराख्याला युद्धाची तयारी करा अशी आज्ञा करतो. पण मुळात गुराखी असलेला प्रधान घाबरून ‘‘मला युद्धातले काही कळत नाही. मी काय करणार ?’’ असे राजाला सांगतो. तेव्हा राजाला आपली चूक लक्षात येते आणि तो आपल्या प्रधानाला पुन्हा बोलावून घेतो. ::
तात्पर्य – ज्याचं काम त्यानीच करावं.
Leave a Reply