आपल्या शेतावरच्या घराच्या ओसरीत महादेव बसला होता. नुकताच त्याने समोरच्या झाडावर धरलेल्या मधमाशांच्या पोळ्यातून मध काढून आणला होता; आणि मधाचे भांडे ओसरीवरच समोर ठेवले होते. मधाच्या वासाने तेथे आसपास माशा घोंगावू लागल्या होत्या. हळूहळू मधाने भरलेल्या भांड्यावर त्या येऊन बसू लागल्या. भांड्याला बाहेरूनही मध लागला होता. त्या माश्या भांड्यावर बसून मध खाऊ लागल्या. महादेव दुरून हे पहात होता. सुरुवातीला एखाद-दुसरी माशी दिसत होती पण बर्याच माशा गोळा होऊ लागल्यावर त्यांना उडवून लावावे म्हणून तो भांड्याजवळ गेला व त्या माश्यांना उडवून लावू लागला. पण त्या जाईनात. त्यावेळी माश्या का उडत नाहीत म्हणून त्याने बारकाईने पाहिले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की माश्यांचे पंख भांड्याला चिकटून बसले आहेत. मध खाण्यात गुंग झालेल्या माश्यांना हे कळलेच नव्हते. त्या मधाचा आस्वाद घेण्यात इतक्या गढून गेल्या होत्या की मधाला चिकटून पंख तुटून जायबंदी झाल्याचे त्यांना समजलेच नव्हते.
तात्पर्य -भौतिक सुखात मनुष्य असाच गुंगून जातो आणि मानसिक सुखाला पारखा होतो.
Leave a Reply