स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करीत असताना एकदा वाराणसीला आले. दुर्गामातेचे दर्शन घेऊन स्वामीची परत निघाले होते. रस्त्याच्या एका बाजूला पाण्याचा तलाव होता. तर दुसर्या बाजूला उंच भित होती. स्वामीजी त्या रस्त्यावरून चालत होते तेवढ्यात काही वानरे त्यांच्या पाठोपाठ येऊ लागली. ती मोठमोठाली वानरे पाहून स्वामीजी भराभर चालू लागले. वानरेही वेगाने मागे लागली. स्वामीजींनी आपला वेग वाढवला आणि ते जोराने पळू लागले. वानरांनी जोरात पळत येऊन स्वामीजींना गाठले. पळतांना ती त्यांना आडवी येऊ लागली. आणि अंगाशी झोंबू लागली. काय करावं स्वामीजींना सुचेना. रस्त्याच्या बाजूला एक खेडूत उभा होता. त्याने हा प्रकार पाहिला आणि स्वामीजींना म्हणाला, ”पळू नका, वानरांकडे तोंड करा.” त्याचे बोलणे ऐकून स्वामीजी उलटे फिरले आणि वानरांकडे तोंड करून उभे राहिले. हे पाहून वानरे बिचकली आणि मागच्या मागे पळून गेली. हा प्रसंग सांगताना स्वामीजी नेहमी सांगत, आयुष्यात एक फार मोठा धडा मी या प्रसंगामुळे शिकलो.
तात्पर्य – संकटापासून पळून जायचे नाही, तर त्याला तोंड द्यायचे.
Leave a Reply