कल्पनाशक्तीचा संबंध बुद्धीशी आहे, ही गोष्ट मराठी साहित्यशास्त्राला नवीन नाही. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी,वि. स. खांडेकर यांचे कल्पनाप्रचुर वाङ्मय भावनेपेक्षा बुद्धीला अधिक आवाहन करते, असे आपण नेहमीच म्हणत आलो आहोत. पण बुद्धी आणि भावना यांमध्ये काही विरोध आहे, असे जर याने सूचित असेल तर ते मात्र मानसशास्त्राला मंजूर नाही. अभिज्ञानात-बोधनेच्या उद्दिष्टात बुद्धीचा व्यापार चालतो, पण भावना ही अभिज्ञानाची सहचारी असते. एखाद्या गोष्टीचे अभिज्ञान आपल्याला घडले म्हणजे त्या गोष्टीबद्दल अनुकूल अगर प्रतिकूल भाव आपल्या मनात निर्माण होतो. आपल्याला ती गोष्ट आवडते तरी अगर नावडते तरी. एखादी गोष्ट आपल्याला चांगली अगर वाईट वाटण्यापूर्वी आपण ती ऐकली पाहिजे, पाहिली पाहिजे, अगर तिचा स्पर्श घडला पाहिजे.
— प्रभाकर पाध्ये (साहित्य : समीक्षा)
Leave a Reply