आपल्या भव्य महालाच्या भोजनखान्यात श्रीकृष्णांचे जेवण सुरू होते. त्यांनी दोन-तीनच घास खाल्ले असतील तोच ताट बाजूला करून ते दरवाजाजवळ गेले. अर्धवट ताटावरून उठताना पाहून रुक्मिणी म्हणाली, ”असं भरल्या ताटावरून कोणी उठतं का ?” रुक्मिणीला काहीही उत्तर न देता श्रीकृष्ण दाराबाहेर गेले. आणि उदास होऊन परतले व पुन्हा जेवण करू लागले. त्यांच्या सगळ्या हालचाली पहात असलेल्या रुक्मिणीच्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून श्रीकृष्ण म्हणाले, ”माझा आवडता एक भक्त रस्त्यातून जात होता. काही लोक त्याला दगडं फेकून मारत होती. जखमी अवस्थेतही तो सर्व सोसत होता. पण प्रतिकार करत नव्हता. त्यामुळे त्याच्या ह्या अवस्थेत तो मला आळवीत होता. त्यावेळी त्याला माझी गरज होती म्हणून मी जेवणातून उठून दाराबाहेर गेलो. त्यावर रुक्मिणी म्हणाली, ”मग लगेच परतलात का ?” श्रीकृष्णाने उत्तर दिले, ”दाराबाहेर गेलो तेव्हा त्याला माझी गरज राहिली नव्हती कारण त्या भक्ताने हातात दगड घेऊन समोरच्या लोकांनछा मारायला सुरुवात केली होती. प्रतिकार करायला तो आता समर्थ झाला होता. पण जोपर्यंत तो निराधार होता तोपर्यंत त्याच्या जीवाची तडफड मला खेचून घेत होती. आता तो निराधार नाही. त्याच्या हातात दगडाचा आधार आहे. तो स्वत:चे संरक्षण स्वत: करत आहे. तेव्हा त्याला आता माझी गरज नाही.”
तात्पर्य – परमेश्वर दुर्लबांच्या सहाय्यासाठी धावून येतो; पण सबलांनी स्वत:चे रक्षण स्वत:च करायचे असते.
Leave a Reply