घनदाट जंगलात एक वाघ आणि लांडगा रहात होते. दोघं एकमेकांचे मित्र होते. वाघ रोज शिकार करून आणायचा आणि लबाड लांडगा त्यावर पोट भरायचा. एकदा वाघ आजारी पडला तेव्हा लांडग्याला नाईलाजाने शिकारीसाठी जावे लागले. शिकारीसाठी धावपळ कोण करेल ? असा विचार करून त्या आळशी पण चतुर लांडग्याने एका गाढवाशी मैत्री केली. लग्नाचं आमिष दाखवत जंगलातील दोन गाढविणींशी तुझी ओळख करून देतो म्हणत त्याला जंगलात वाघाच्या गुहेत घेऊन आला. त्याला पाहताच वाघाने त्याच्यावर झडप घातली पण गाढव तिथून निसटले. लांडगा पुन्हा दुसर्या दिवशी गाढवाकडे गेला आणि ‘‘काल गाढविणीला भेटायच्या आतच हे घडले तेव्हा आज तिला भेटायला परत जाऊ’’ लांडग्याच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवून गाढव पुन्हा त्याच्याबरोबर गेले. तेथे पोहोचताच वाघाने त्याला लगेच मारले आणि लांडग्याला म्हणाला,‘‘मी पाचच मिनिटात येतो. आल्यावर शिकारीचा आस्वाद घेऊ.’’ पाच मिनिटानी वाघ परतल्यावर पहातो तर गाढवाचे डोके आणि कान लांडग्याने खाल्ले होते. वाघाला लांडग्याचा राग आला. त्याने त्याबद्दल विचारले असता लांडगा म्हणाला, ‘गाढवाला कान आणि डोकं नव्हतच. ते असतं तर माझं ऐकून तो पुन्हा मृत्यूच्या दारात आला असता कां ?’
तात्पर्य – दुसर्यावेळी तिच चूक पुन्हा करतो तो मूर्ख असतो.
Leave a Reply