कोणताही याचक युधिष्ठिराच्या दरबारातून विन्मुख होऊन परत जात नसे. असेच एक दिवस युधिष्ठिराकडे एक याचक येतो. युधिष्ठिर त्याला थोडीफार मदत करतो आणि उद्या परत येण्यास सांगतो. ही सारी घटना भीम बाजूला उभं राहून पाहत असतो. हे सर्व बघून भीमाला आश्चर्य वाटते. म्हणून न्याय मागण्यासाठी भीम युधिष्ठिराच्या महालाबाहेरील घंटा वाजवतो. घंटेचा आवाज ऐकून युधिष्ठिर भीमाला प्रश्न विचारतो, ”हे भीमा, तुझ्यावर असा कोणता अन्याय घडलाय ?” त्यावर भीम म्हणतो, ”महाराज, माझ्यावर नाही. या याचकावर अन्याय घडलाय.” काही अर्थबोध न झाल्याने ”तो कसा काय ?” म्हणत युधिष्ठिर आश्चर्य व्यक्त करतो. तेव्हा भीम प्रश्न करतो की, ”महाराज तुम्हाला अमरत्व मिळाले आहे का ? आणि जर मिळाले नसेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी मृत्यू येईल. याचा अर्थ मी उद्या जिवंत असणार आहे असे गृहीत धरून तुम्ही त्याला खोटे आश्वासन कसे दिले ?” भीमाच्या या प्रश्नानी युधिष्ठिराला आपली चूक कळून आली.
तात्पर्य – जीवन क्षणभंगुर आहे म्हणून त्याची शाश्वती कोणीच देऊ नये.
Leave a Reply