सुगंध वनातील एक राजहंस चोरीला गेला पण काही शोध लागेना तेव्हा राजाने आपल्या हुशार प्रधानाला बोलावून खरा चोर पकडण्याची सूचना दिली. प्रधानाने चौकशी करता शिपायांनी संशयित असे सात लोक पकडल्याचे सांगितले. पण कुणी कबूल होत नव्हतं. त्या सातही संशयितांना दरबारात हजर करण्याचा आदेश प्रधानाने दिला. दरबारात ते हजर झाले पण कुणीही कबूल होईना. तेव्हा आता खरा चोर कसा पकडणार ? याची राजालाही चिता वाटली. ‘सर्वांनाच शिक्षा द्या’ असे एका सरदाराने सुचवले ‘पण हे न्याय देणे होणार नाही’ असे सांगून राजाने ती सूचना फेटाळली. मग पुन्हा एकदा मुख्य प्रधानाकडे राजाने आशेने पाहिले. तेव्हा तो प्रधान म्हणाला, ”राजन, चोर सापडलाय आणि तो इथेच आहे. ज्याने राजहंस चोरला त्याने त्याला नेताना त्याचे एक पिस त्याच्या अंगरख्याला चिकटले ते अजूनही तसेच आहे.” हे वाक्य ऐकताच खरा चोर सावध झाला व पटकन मागे हात फिरवून पिस झटकण्याचा प्रयत्न केला. त्याची ही हालचाल लक्षात येताच प्रधानाने त्याला पुढे बोलावून गुन्हा कबूल करायला भाग पाडले.
तात्पर्य – केलेल्या गुन्ह्याची मनातली खूण जागीच असते.
Leave a Reply