माणसाला जगण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यापैकी बळ देणारी आणि जगवणारी एकमेव गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीविषयी त्याच्या मनात असलेली आशा. केवळ आशेच्या जोरावरच माणूस कोणत्याही संकटाला तोंड देऊन उभं राहतो. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर मॅकमिलन हे उत्तरध्रुवाच्या मोहिमेवर निघाले होते. ते जायच्या आधी त्यांच्या नावावर एक पाकीट आलं. पाकीटावर दर्शनीच लिहिले होते, ”ज्या वेळेस जिवंत रहाण्याची इच्छा पूर्णपणे संपेल त्यावेळेस हे पाकीट उघडावे” ते पाकीट आणि त्यावरील मजकूर वाचून मॅकमिलनना आश्चर्यच वाटले. पण तरीही या खडतर प्रवासात ते पाकीट जवळ असावं म्हणून मॅकमिलननी ते बरोबर घेतले. त्यानंतर ते उत्तरध्रुवाची भलीमोठी मोहीम करून सुखरूप घरी परत आले. पाच-दहा वर्षांनी दूरदर्शनवर त्यांची मुलाखत घेतली जात होती. त्यावेळेस मुलाखत्छा घेणार्याने विचारले, ”आपण अजूनही ते पाकीट उघडून पाहिलं का नाही?” त्यावर मॅकमिलन म्हणाले, ”ज्या व्यक्तीने प्रवासाला जातांना मला आशेचं बळ दिलं त्यांचा विश्वास मी कधीच तोडू शकलो नाही आणि आजपर्यंत मी आशा कधीच सोडली नाही त्यामुळे पाकीट उघडून बघायची वेळच आली नाही.”
तात्पर्य – आशेच्याच बळावर जीवन पुढे जात असते.
Leave a Reply