श्रद्धेची शक्ती

एक जोडपे भारत भ्रमण करण्यासाठी निघाले होते. अनेक स्थळं पाहात पाहात समुद्र पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ते समुद्र किनार्‍यावर आले. समोर समुद्रात अनेक लोक बोटीत बसून जलक्रीडेचा आनंद घेत होते. ते पाहून त्या जोडप्यालाही जलक्रीडेचा मोह आवरता आला नाही. समुद्रात फेरफटका मारण्यासाठी ते एका नौके जवळ आले. नावाड्याला पैसे देऊन ते त्या नौकेत ते बसले. नौका समुद्रावर विहार करूं लागली. सर्व प्रवासी लाटांचा, त्यातील तुषारांचा आनंद घेत होते. इतक्यात समुद्रात वादळ उठले. लाटा जोरजोरात येऊ लागल्या आणि नौका हेलकावे खाऊ लागली. कोणालाही जीवाची शाश्वती वाटेना. त्या जोडप्यातील स्त्री अतिशय घाबरली पण पती मात्र शांत आणि स्थिर होता. पतीचा शांतपणा बघून तिने आपल्या पतीला विचारले, ‘ ‘अहो, बोट बुडण्याच्या अवस्थेत असताना तुम्ही इतके शांत कसे? भीती वाटत नाही का? काहीतरी धडपड करा आणि आपले जीव वाचवा. ”अस्वस्थपणे ती सारखं सारखं आपल्या पतीला हे सांगत होती. शेवटी पतीने समोरच्या टेबलावरील चाकू उचलला, तिच्या गळ्याला लावला आणि विचारले,. ‘आता तुला माझी भीती वाटते?” त्यावर ती ‘ ‘नाही’ ‘ म्हणाली. त्याने कारण विचारताच ती म्हणाली, ‘ ‘तुमच्या हाती माझं सर्व आयुष्य असताना तुमची भीती कशी वाटेल. ” त्यावर तो म्हणाला, ‘हो ना, ? हे सगळं जीवनच ईश्वराने दिलं आहे. तर मग भीती कशाची बाळगायची? सर्व काही व्यवस्थित होईल. ”

तात्पर्य : श्रद्धेच्या शक्तीमुळे व्यक्ती निर्भय बनते.