मी एकदा म्हटलं होतं की, अत्र्यांना त्यांच्या मास्तरांनी ‘बे एके बे’ हा पाढा न शिकवता ‘दोन हजार एके दोन हजार’, ‘दोन हजार दुणे चार हजार’ हाच पाढा शिकवला असावा. आम्हाला म्युनिसिपालिटीच्या शाळेतल्या मास्तरांना दोन म्हणतानासुद्धा आपण जास्त सांगतोय, असं वाटतं. अत्र्यांना कोण ते सासवडचे गुरुजी मिळाले कुणास ठाऊक?
पुण्यातल्या एका समारंभाला आम्ही दोघेही बसलो होतो. त्यांचं आणि माझं, दोघांचंही भाषण होतं. मला म्हणाले, ‘काय रे पी.एल.? किती माणसं असतील असं वाटतं?’ आता माझा साधारणत: कारकुनी अंदाज. मी म्हटलं, ‘हजार-बाराशे असतील.’ ते म्हणाले, ‘अरे बघ, कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार लोक आहेत.’
म्हटलं, ‘कुठले आहेत?’
‘अरे, सत्तर ते ऐंशी हजार म्हणाला नाहीस तर जिल्हा पत्रकाचासुद्धा संपादक होणार नाहीस.’
मग मी सांगितलं त्यांना, ‘बरोबर आहे, ही सभा पुण्यात असल्यामुळे एक माणूस म्हणजे दहा माणसांच्या बरोबरीचा. असा हिशोब तुम्ही काढून हे लोक काढलेले असणार!’
– पु. ल. देशपांडे
सभ्य स्त्री-पुरुषहो
(पुलं.ची भाषणे)
Leave a Reply