धनसंपत्ती, ऐश्वर्य सर्व मिळवून त्याचा उपयोग घेतल्यानंतर देवदत्ताला ईश्वरप्राप्तीची इच्छा झाली होती. त्याच्या मनात येत होते की आता आपल्याजवळ सर्व काही आहे. नाही तो फक्त ईश्वरच ! मग तो मिळवायलाच हवा. म्हणून तो भगवी वस्त्रं घालून स्वत:च्या वाड्याजवळच एक झोपडी बांधून राहू लागला. झोपडीच्या बाजूला एक मोठे तळे होते. एकदा रात्री कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. पाहतो तो तळ्यातील पाण्यात उतरून एक व्यक्ती काहीतरी शोधत होती. देवदत्ताने त्याला विचारले, ”इतक्या रात्री तुम्ही पाण्यात काय शोधत आहात ?” त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले, ”माझे काही मिठाचे खडे पाण्यात पडले आहेत. तेच शोधतो आहे.” त्यावर आश्चर्याने देवदत्त म्हणाला, ”मीठ तर कधीच पाण्यात विरघळले असेल ते आता कसे सापडेल ?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ”तुम्ही ज्या अस्वस्थपणे आणि भगवी वस्त्रं घालून ईश्वराला शोधत आहात ते तर पाण्यात मिठाचा खडा शोधण्यासारखेच. मग तुम्हाला ईश्वर कसा मिळणार ? ईश्वर मिळायला, मीठ पाण्यात विरघळतं त्याप्रमाणे त्याच्याशी एकरूप झाल्यावरच त्याची प्राप्ती होईल.”
तात्पर्य – ‘मी’ पणा संपल्यावरच ईश्वराचा शोध सुरू होतो.
Leave a Reply