कबीर, तुळसीदास किवा तुकाराम हे काही नुसतेच कवि नव्हते. ते नुसतेच जर कवी असते तर त्यांचे काव्य समाजाने डोक्यावर घेतले नसते. कबीराने शाईला आणि कागदाला हातसुद्धा लावला नाही. तुकारामाने एका ठिकाणी देवाला म्हटले आहे की, ‘देवा, अजून मला पुरता अनुभव नाही. मग काय, मी नुसता कवीच होऊ का रे ?’ ज्यात अनुभव नाही ते कसले काव्य, असेच तुकारामाला वाटत होते. मूर्ति, मंदिर, योग, जप, तप ही धर्माची लचांडे गरीब आणि अज्ञ जनतेला झेपण्यासारखी नव्हती. मोक्षाचा मार्ग आपल्याला मोकळा नाही असे त्यांना वाटत होते. त्यांच्यासाठी ‘काम’ करता करता ‘नाम’ घेण्याचा सर्वात सोपा धर्म कबीराने आणि तुकारामाने शोधून काढला.
– प्र. के. अत्रे (सन्त आणि साहित्य)
Leave a Reply