संकष्टी चतुर्थीचा दिवस. गणपतीच्या मंदिरासमोर भक्तींची गर्दी उसळली होती. जो तो दर्शनासाठी आतुर झाला होता. त्या गर्दीत एक अंध भक्त दर्शनासाठी आला होता. एवढ्या गर्दीत धडपडत जाणार्या त्या अंध व्यक्तीला पाहून शाम म्हणाला, ‘‘एवढ्या गर्दीत धडपडत ही अशी लोकं कशाला येतात ?’’ तो प्रश्न त्या अंध व्यक्तीनी ऐकला आणि म्हणाला, ‘‘साहेब, आज संकष्टी आहे. तेव्हा मी पण दर्शनाला आलो आहे.’’ त्याच्या या वाक्यावर हसतच शाम म्हणाला, ‘‘हा आंधळा, गणपतीचं दर्शन घेणार ? कमालच आहे !’’ त्यावर आंधळा म्हणाला, ‘‘मी जन्मापासून अंध आहे तेव्हा ही त्या गजाननाची इच्छा आहे की मला त्याचं दर्शन घेता येऊ नये. पण तरीही मी मंदिरात दर्शनाला का जातो आहे ? साधी गोष्ट आहे. मला त्याला पाहता येणार नाही पण तो ईश्वर स्वरूप गणपती तो तर मला पाहिल की नाही ! म्हणजे मग मी त्याला पहाणं काय किवा त्याने मला पाहाणं काय ? एकूण एकच कारण मी त्याचाच अंश आहे.
तात्पर्य – अंतरंगातूनच प्रकाश मिळाल्यावर बाह्यदृष्टीचे महत्त्व किती ?
Leave a Reply