अंतःस्वर

Front Cover

लेखक रमा नामजोशी
किंमत : १५०/
पाने : १००
प्रकाशक डिंपल पब्लिकेशन
ISBN :
पुस्तकाचे स्वरूप/प्रकार : छापील पुस्तक 
वर्गवारी : कवितासंग्रह

 

 

 


पुस्तकाचा संक्षिप्त परिचय – 

समजत सूर लाभलेला अंतःस्वर…

रमा नामजोशी यांचा अंतःस्वर नामक कवितासंग्रह प्रकाशित होतोय. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. एखादी अभिव्यक्ती वा नवनिर्मिती आपल्या जीवनाचे सारतत्व घेऊनच येत असते… सदर कवितासंग्रहात कवयित्रीचा अंतःस्वर… तिचा आतला आवाज… मुखरित झालेला आहे. तिचं हे प्रस्फुटित होणं… अत्यंत परिपक्व स्वरूपाचं आहे. जीवनाकडे बघण्याच्या तिच्या दृष्टिकोनात परिपक्वता आहे. समंजस दृष्टी आहे. त्यांच्या कविता, जीवनातील काही सुंदरसं हरवल्याच्या… त्याच्या परिपूर्तीच्या प्रतीक्षेच्या असल्या तरी त्यातील समंजस स्वर… ‘पाहता वाटुली शिणले डोळुले’…असे म्हणत… अंतर्यामाला समजावीत धीर देणारा आहे. समजावणीचा सकार इतका प्रभावी आहे; की निराशेचे मळभ दाटतच नाही… हरपल्या श्रेयाची, पुनर्भेट घडविण्याची ताकद कवयित्रीच्या… अर्थात काव्यगतनायिकेच्या अंतःस्वरात आहे. ही जीवनाची पुनर्भेट आहे की, पोळलेल्या, अनुभवांची गाठभेट आहे… असा प्रश्न ती
स्वतःलाच विचारत आहे आणि विस्कटलेपणातील सौंदर्य न्याहाळण्याचा प्रयत्न करताना विस्कटलेली चूण ही लाजल्याचा प्रत्यय तिला येतो.

कवयित्रीच्या प्रणयाबद्दलच्या अभिव्यक्तीत भावविव्हलता असली तरी धीटपणादेखील आहे. ती म्हणते…

उन्हाच्या तीव्र झळा सोसतानाही
दूर कोठेतरी कदंबासारखा
आपली सावली धरुन तू उभा आहेस.
फक्त माझ्यासाठी…
तुझ्याजवळ…
रितं करुन टाकावं हे एकटेपण

तिचं एकटेपण त्याच्या स्मृतींनी भरलेलं आणि भारावलेलं आहे. अशा स्मृतिसुमनांचा… प्राजक्त सडा सर्वत्र पसरलेला आहे… ती म्हणते… तुझी अवघी धुंदी तुझ्या रंध्रातूनच ओघळते, बेभान स्पर्श उन्मादी रतिक्रीडा करिती गात्री अशी त्यांची अवस्था होते. स्पर्शाचा सुगंध, वाळ्याचे अत्तर होऊन येतो, तिचे शब्द तिच्यासकट त्यामध्येच पूर्णविराम शोधत येतात… परंतु या स्मृतींना पूर्णविराम सापडत नाही. तिचं तनमन गंधफुल होऊन जातं… जुईपण त्यांच्यात सहजपणे उतरून येतं… स्मृतिसुगंधाने ती दरवळत राहते. त्याच्या स्मृतिंनी काठोकाठ भरलेलं मन इतकं रितं कसं राहतं… असा तिला प्रश्‍न पडतो… आणि मग कोरड्या विहिरीत… पाणी वळत रहावं… तसं तिचं मन पुनश्च त्याच्या स्मृतींनी भरू लागतं. त्याचं अस्तित्व तिला कवेत घेतं…

चुरडल्याशिवाय मेंदीचा सुवास पसरत नाही…
पण त्यामागे तिचा उभा जन्म वाळवंटात असतो.

अशी एखादी वेगळी प्रतिमा तिचा कवितेत येते. त्यामुळे रमा नामजोशी यांची कविता…केवळ मी-त ची प्रेमविव्हलकविता राहत नाही, तर ती एकूणच कविता निर्मितीची प्रक्रिया ठरते… त्याच्या विषयी कवितागत नायिकेचे विचार… गंभीर स्वरूप असल्याने…त्या प्रत्येक स्मृतिंतून कविता निथळत राहते, म्हणूनच कवितेवर नितांत प्रेम करणारं कोणीतरी तिला हवंय…ते तिला त्याच्या स्वरूपात सापडतं…कारण तिच्या अंतःस्वरांनी… अत्यंत ओलावलेली साद त्याला घातलेली आहे.

कवितागत नायिका आपल्या स्वरांचं सुरेल संगीत आळविताना म्हणते…
काही सूर हळवे असतात
काही कोमल असतात
नेमका सूर गवसेपर्यंत
रियाज करते आहे
यमन तर सारेच गातात…
मी मारवा पेलते आहे.

ही नायिका अवघड सूर आळवीत आहे…आणि तो पेलण्याचा रियाज तिने केलेला आहे.

एका अनाम ओढीने सुरू झालेला काव्यात्मक प्रवास अंतःस्वर मध्ये अनुभवायला मिळतो…शब्दांचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या अनाम कोणी कवितागत नायिकेला साद घालतो आहे. आपली ओंजळ इवलिशी असली…तरी ती भरलेली आहे…एवढाच आशावाद तिला त्याच्याकडे खेचतो आहे…आपली भुई भेगाळलेली असली तरी त्याच्या ओल्या पावलांनी अंगण न्हाऊन निघेल याची तिला खात्री आहे.निसर्गाच्या विविध रूपात ती आपला प्रियतम शोधते आहे…विश्वाच्या…लौकिक जीवनाच्या पलीकडे तो उभा आहे आणि ती भासाच्या अलीकडे आहे. असा अलौकिकतेचा स्पर्श मग तिच्या अभिव्यक्तीत येत जातो…शारिरतेकडून अशारिरीकतेकडे त्यांची कविता जाऊ लागते…किंबहुना प्रेम ही गोष्टच अलौकिक आहे…वासनेचा स्पर्श होताच ती हातून निसटून जाते…ती जपण्यासाठी मग अत्यंत संवेदनशील मन हवं असतं… ते व तसे मन कवयित्रीकडे आहे…त्यातून त्यांचे अंतःस्वर उमटत राहतील हे मात्र निःसंदेह! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

– डॉ. सिसिलिया कार्व्हालो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*