माझा रिसर्च चा विषय

नैराश्य :बालमनातील  स्व-संकल्पना (Despair in Child Self-Concept)

वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या  गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व नैराश्य या घटनांना सामोरे जावे लागत आहे.

ताणतणाव  म्हणजे,
” ज्या एका मानसिक अवस्थेतेमुळे शरीर स्वास्थ्य  प्रभावित होऊ शकते ती म्हणजे ताण (Stress). “”ज्यांच्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते  किंवा घडून येण्याचा धोका संभवतो,अशा घटनांद्वारे उद्धवणारी प्रक्रिया म्हणजेच ताण (by Lazhrous /fhokman,psychologist).

वाईट घटनांमुळे निर्माण होणारा  ताण खऱ्या अर्थाने त्रासदायक असतो तर चांगल्या घटनांमुळे होणारा ताण हा आनंददायक किंवा सुखद असतो.

 स्व-संकल्पना म्हणजे , 
“स्वतःचे स्वतःविषयीची कल्पना,भावना,अभिवृत्ती,आवडी निवडी ,सवयी,क्षमता,राहणी,प्रेरणा इत्यादींचे मूल्यांकन म्हणजे स्वसंकल्पना होय.” ताण निर्माण करणाऱ्या घटना :

जीवनात ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर मानवी जीवन अस्वस्थ होण्यास सुरुवात होते . जसे ,जीवनसाथी ,नोकरी दैनंदिन वादविवाद ,संशयवृत्ती ,भांडणे ,वैचारिक मतभेद ,नोकरीमधील वरिष्ठांची अपमानित वागणूक, प्रेमप्रकरणं ,फसगत अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक घटकांवर प्रतिकूल परिणाम होऊन मानवी आरोग्य बिघडते . अपमान ,एकाकीपणा ,अभ्यासाचे दडपण ,भीती व अपयश, नातेसंबंधातील दुरावा ,जीवनातील अनेक लहान सहान समस्यांनी त्रस्त होणे,इतरांकडून न मिळणारा आधार,प्रेम ,यामुळे सतत तणावात राहणे त्यामुळे आंतरिक प्रतिकार शक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो . व्यक्तीच्या  आयुष्यात एका उंचीपर्यंत कार्यक्षमतेच्या प्राप्तीसाठी ताण येणे आवश्यक असते ,परंतु ताणाच्या कार्यक्षमतेची पातळी सतत वाढली तर त्याचे रूपांतर नैराश्याकडे जाऊ शकते . बालपणातील मानसिक,शारीरिक किंवा लैंगिक आघात . नकारात्मक विचार येणे,त्याबद्ल स्वप्नं पडणे,भीती वाटणे,लक्ष केंद्रित करता न येणे,स्मरणशक्ती कमी होणे,नकारात्मक विषयावरील टीव्ही सिरीयल पाहणे . समाजात मिळून मिसळून वागायची भीती वाटणे . कमकुवत आर्थिक स्थितीमुळे नेहमी ताण येतो.

समस्या १ : दीपाली मॅडम सरकारी शाळेत नोकरीला. वर्गात छान शिकवायच्या,प्रेमळ होत्या . त्यांच्या लग्नानंतर  पतिपत्नीतील वैचारिक वादावरून पटेनासे झाले, नित्याची भांडणे,मारझोड,संशयवृत्ती  यामुळे पतीचा त्रास वाढत गेला. सतत ताणतणावात असल्याने चिंता,नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. या दरम्यानच्या काळात दोन अपत्य झाली .घरच्या सदस्यांनी समजाविले परंतु मार्ग निघाला नाही.एकाकीपणा ,सामाजिक नीति-नियम ,प्रतिष्ठेच्या कल्पना यामुळे इतरांना समस्या न सांगण्याचे धाडस अशा अनेक नकारात्मक कारणांमुळे नैराश्यात आयुष्य जगणे सुरु झाले .

मॅडम होळीला आपल्या सहा वर्षाच्या मुलासह माहेरी गेल्या . ताणतणावाचा परिणाम त्यांच्या शरीरावर व मनावर झालेला होता. आईला म्हणाल्या, माझ्या मुलांचा सांभाळ करशील का? या सवांदावरून आई वडिलांनी काळजी घ्यायला हवी होती. त्यांना आईवडिलांची साथ लाभले नाही व आई वडिलांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी सारं काही असहय होऊन आपल्या मुलासह आत्महत्या केली .

समस्या २ : सरिता मुलाला घेऊन आईवडिलांकडे वास्तव्याने राहायला आली. ती नोकरी करते. पाहायला सुंदर, प्रेमळ ,इतरांना मदत करणारी ,काय झालं असेल तिच्या आयुष्यात ?लग्नानंतर लहानसहान कारणावरून  भांडण, वादविवाद,मतभेद ,नेहमीचा ताणतणाव चिंता यामुळे एकत्र आयुष्य जगणे असह्य झाले .समस्येचे  निराकरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु अपयश .

दरम्यानच्या काळात पतीने एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला परंतु सरिताने नकार दिला .पती मुलाला शाळेतून परस्पर घेऊन गेला . पतीला काहीही न बोलता आपल्या ताणतणावाचे व वात्सल्याचे समायोजन केले पालकांनी सकारात्मक मानसिक धाडस दिलं . जगण्याची नवी उमेद दिली . तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या  प्रेमळ सहवासाने पती व मुलाविना सरिता आनंदाने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेय .

व्यक्तीच्या बालमनांतील स्वसंकल्पना :

स्पर्धेच्या काळात मनुष्य स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार न करता स्वतः अंध काळोखात जात आहे. ही लहानपणातील स्वसंकल्पना होय .अनुवंश व बाह्य घटकांमुळे व्यक्तीची जडणघडण होते. उदा .स्वतःचे विचार व्यक्त न करू देणे ,स्वतःला कमी लेखणे, काळा वर्ण ,शारीरिक व्यंग इ .कारणांमुळे व्यक्तिमत्व न्यूनतेची स्व-संकल्पना बालमनात बनते . उद्धट बोलू नकोस ,वाद घालू नकोस,मुलीच्या जातीने जास्त बोलायचे नाही , अशा नकारात्मक गोष्टीचे मुले अनुकरण करतात यातून स्वसंकल्पनेची बीजे रुजविल्या जातात .कुटुंब व शाळेत मुलांमधील स्वतःचे महत्व कमी असल्याची स्वसंकल्पना दृढ होत जाते .बालकाच्या स्वसंकल्पनेवरच जीवनाचे यश अपयश अवलंबून असतेबालमनात कुटुंब व शाळामधून ऐकविलेल्या काल्पनिक परिकथा /गोष्टी उदा. सिंड्रेला, भुताच्या गोष्टी इत्यादींमधून स्वसंकल्पना बनत जातात .                  समस्येचे  मूळ त्याच्या बालमनांतील स्वसंकल्पनेत दडलेले असते .

बालमनातील भीतीयुक्त स्वसंकल्पनेमुळे समस्येचे समायोजन दीपाली मॅडमला करता आले नाही.  पालकांनी समस्या व्यक्त करण्याचे धाडस निर्माण केले असते  तर टोकाचा निर्णय घेतला नसता . आयुष्यातील चिंता ,ताणतणाव, नैराश्य या  बाबत पालक ,जीवलग मित्र ,यांना सांगून समस्येचे  निराकरण झाले असते.स्वतः कमावती असल्याने पतीपासून विभक्त किंवा वेगळे राहून आनंदी जीवन जगता आले असते .पालक, मित्र, नातेवाईकांनी भावनिक आधार दयायला हवा होता .आत्महत्या करण्यापेक्षा थोडे अपमान सहन  करण्याची सकारात्मक हिंमत करायला हवी होती .  सरिताने आयुष्यातील ताणतणावाचे आईवडिलांच्या भावनिक आधाराने,प्रेम व सहकार्याने समस्येचे व्यवस्थापन केले, आज आपले आयुष्य आनंदाने जगत आहे .

तणाव, चिंता ,नैराश्य यातून सुटका होण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा  उपयोग नियमित करावा .नैराश्य दूर करण्यासाठी परिस्थिशी जुळवून घेणे व समस्येचे भावनिक समायोजन करण्यास शिकणे .जीवनशैली साधी व गरजा कमी ठेवणे . बालमनावर कुटुंब व शाळांमधून सकारात्मक स्वसंकल्पनेची बीजे रुजविणे .स्वतःची बलस्थाने आणि उणिवा ओळखून त्याचा स्वीकार करणे .नकारात्मक विचार, गैरसमजुती, व्यसनाधीनता यापासून दूर राहणे, रागावर नियंत्रण ठेवावे .विनोदबुद्धी, छंद जोपासणे ,मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवणे, साजेसा जीवनसाथी शोधणे. आपले काम प्रामाणिकपणे करणे व आनंदी राहणे. स्वआदरभाव राखून स्वतःचा व इतरांचा मानसन्मान करणे .अपमान सहन करायला शिकले पाहिजे .सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या महामानवांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाचन करावे.  जसे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले , सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, बाबा आमटे  इ. स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा, मी माझे मानसिक आरोग्य उत्तम ठेऊन आनंदाने आयुष्य जगू शकतो,असे स्वतःला सुचवित राहावे . सकारात्मक विचार देणाऱ्या चित्रपट, टीव्ही मालिका पाहाव्या .

ताणतणाव ,चिंता व नैराश्य यावर मात करून सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावा व सकारात्मक विचारधारेचा अंगीकार करावा.

— प्रा. हितेशकुमार पटले

ExamVishwa

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*