रत्नाकर मतकरी

प्रतिभावंत नाटककार आणि लेखक

३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या असे नव्वदपेक्षा अधिक विविध कलाकृतीचे विपुल लेखन करणारे रत्नाकर मतकरी. साहित्याचे विविध प्रकार त्यांनी आपल्या लेखनातून हाताळले असले तरी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख एक प्रतिभावंत नाटककार म्हणून जवळची वाटते.

रत्नाकर रामकृष्ण मतकरी यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३८ साली मुंबईला झाला. प्राथमिक शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये तर माध्यमिक शिक्षण राममोहन इंग्लिश स्कूल मध्ये झालं. १९५४ साली एस. एस. सी. तर एल्फिन्स्टन कॉलेजमधून १९५८ साली बी. ए. पदवी मिळविली. १९७८ पर्यंत त्यांनी बँक ऑफ इंडियात नोकरी केली आणि त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला नाट्यक्षेत्राला वाहून घेतलं. त्यांच्या लेखनाची सुरुवात त्यांच्या शालेय जीवनापासून झाली. महाविद्यालयात असतानाही नाट्यवेडे होतेच. त्यातूनच नाट्यलेखन सुरू झाले. आकाशवाणीवरून ‘वेडी माणसे’ ही पहिली श्रृतिका प्रसारित झाली आणि त्यानंतर अनेक नाटकं रंगभूमीवर यशस्वी झाली.
‘वार्यावरचा मुशाफिर (१९५९)’, ‘वर्तुळाचे दुसरे टोक (१९६०)’, ‘बिर्हाड बाजलं (१९७२)’, ‘आरण्यक (१९७४)’, ‘समोरच्या घरात (१९७४)’, ‘लोककथा (१९७९)’, ‘दुभंग (१९८१), ‘माझं काय चुकलं (१९८२)’, ‘खोल खोल पाणी (१९८३)’, ‘सत्तांध (१९८६)’, ‘घर तिघांचं हवं (१९९१)’, ‘जावई माझा भला (१९९४)’, ‘चार दिवस प्रेमाचे (१९९९)’ इत्यादी विविध प्रयोगशीलतेनी बांधलेली, मनाची पकड घेणारी, उत्कृष्ट पात्र योजना आणि कथानकात असणारी विविधता ही मतकरींच्या लिखाणाची वैशिष्ट्यता दिसते. मतकरींनी ‘जौळ’, ‘पानगळीचे झाड’ आणि ‘अॅडम’ या तीन कादंबर्या लिहिल्या. त्यापैकी जाळ वर ‘माझं काय चुकलं ?’ हे नाटक गाजलं. ‘लोककथा ७८’ या दलितांवरील नाटकाचे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनुवादित बरेच प्रयोग झाले. ‘चार दिवस प्रेमाचे’ या नाटकाने हजार प्रयोग केले. ‘सोनेरी मनाची परी’ (परिकथा) हसता हसविता (विनोदी), दहाजणी (वास्तववादी) अशा विविध रूपात त्यांनी कथालेखन केलं. गूढकथा ही मतकरींची खास आवड दिसते.
गेल्या पस्तीस वर्षात त्यांच्या दिडशेपेक्षा जास्त गूढकथा प्रकाशित झाल्या. त्यांनी ‘सात एकांकिका’, ‘एकाच मातीची खेळणी’, ‘लाल गुलाबाची भेट’, ‘शय्या’, ‘सत्य’, ‘कहाणी कुणा प्रेमिकाची’, ‘अंधार वाडा’, ‘पोट्रेट आणि यक्षिणी’ ह्या एकांकिका लिहिल्या. बालनाट्य क्षेत्रात त्यांनी भरभरून काम केलेले आहे. ‘मधुमंजिरी’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘गाणारी मैना’, ‘अचाट गावची अफाट मावशी’, ‘अदृश्य माणूस’, ‘इंद्राचे आसन आणि नारदाची शेंडी’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘सावळ्या तांडेल’, ‘धडपडे, बडबडे, मारकुटे आणि कंपनी’ ही त्यांची गाजलेली बालनाट्ये आहेत.

‘माझं घरं माझा संसार’, इन्व्हेस्टमेंट या चित्रपटांचे पटकथालेखन त्यांचेच..

## Matkari, Ratnakar

 

1 Comment on रत्नाकर मतकरी

Leave a Reply to Harshad Kamble Cancel reply

Your email address will not be published.


*