ठाणे जिल्हा

ठाणे जिल्हा अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा जिल्हा आहे. ठाण्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे. बहुविध वैशिष्ठ्ये लाभलेला कोकण सुध्दा ठाणे जिल्ह्याच्या जवळ आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई म्हणजे ठाणे जिल्ह्याची सख्खी शेजारिण. त्यामुळे आपसूकच या जिल्ह्याचा आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक विकास झाला आहे. एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची घनता याबाबत ठाणे राज्यात आघाडीवर (पहिल्या तीन जिल्ह्यात) असून हा सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील वसईची केळी व डहाणूचे चिक्कू राज्यात प्रसिद्ध आहेत.