कंबोडिया

कंबोडिया (अधिकृत नाव: ख्मेर: ‘KingdomofCambodia.svg) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत बहुतांश इंडोचायना द्वीपकल्पावर राज्य गाजवणाऱ्या सामर्थ्यवान हिंदू-बौद्ध ख्मेर साम्राज्याचे वारसदार राज्य म्हणजेच आजचा आधुनिक कंबोडिया म्हणता येईल.आधुनिक कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह येथे वसलेली आहे.
या देशाच्या पश्चिमेस व वायव्येस थायलंड, ईशान्येस लाओस, पूर्वेस व आग्नेयेस व्हिएतनाम हे देश असून दक्षिणेस थायलंडचे आखात आहे.
कंबोडियामध्ये घटनात्मक राजेशाही असून शासनाच्या सर्वोच्चपदी राजा असतो, तर पंतप्रधान कार्यकारी प्रशासकीय प्रमुख असतो. थेरवादी बौद्ध धर्म हा कंबोडियाचा अधिकृत धर्म असून या देशातील ९७% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.

भारतातून हिंदू धर्माच्या प्रचारार्थ बाहेर पडलेला द्रविड ब्राह्मण कौण्डिण्य आणि नाग राणी सोमा यांचा विवाह झाला. कौण्डिण्य याने व्याधपूर नावाची राजधानी स्थापन केली.त्याच्या मागोमाग भारतातील अनेक धाडसी वीर या प्रदेशात गेले आणि तेथील नाग कन्यांशी विवाह करून तेथेच स्थायिक झाले.त्यांनी आपल्या बरोबर संस्कृत भाषाही तिथे नेली. या राज्याला चीनी इतिहासात फुनान साम्राज्य असे नाव आहे. कौण्डिण्याने येथील रुक्ष भूमीमध्ये पाणी अडविण्याची योजना केली. लहान मोठी धरणे बांधून भातशेती सुरु केली.हे राज्य सहाशे वर्षे टिकून होते. कौण्डिण्यानंतर दोनशे वर्षे या स्म्राज्याचा विस्तारच झाला.फूनांचे हे साम्राज्य समृद्ध होते.तेथील प्रजा सोने,चांदी,मोती या रूपात कर भरत असे. ग्रंंथांची निर्मिती आणि त्यांची व्यवस्था यासाठी या राज्यात स्वतंत्र संस्था होत्या. प्रजेचे जीवन समृद्ध आणि सुरक्षित होते.कर व्यवस्था ,प्रजाहिताची कामे,यासाठी स्वतंत्र अधिकारी होते.शैव आणि वैष्णव संप्रदायांचा पसार येथे झालेला होता.सामर्थ्यशाली नौदल हे या साम्राज्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य.साम्राज्याचे सांस्कृतिक जीवनही समृद्ध होते.

या साम्राज्याचा मूळ पुरुष कंबूस्वयंभुव याच्या नावावरून या साम्राज्याला काम्बुज हे नाव मिळाले. इ.स. ६०० च्या सुमारास सम्राट भववर्मन याने भवपूर या नव्या राजधानीची स्थापना केली. याचा बंधू चित्रसेन याने ब्रह्मदेशापासून व्हिएतनाम पर्यंत साम्राज्य विस्तार केला. सातव्या शतकात पुराण साहित्यही येथे पोहोचले. त्यातील कथांचे वाचन,श्रवण येथे सुरु झाले. इ.स. ६११ मध्ये सम्राट ईशानवर्मन गादीवर आला. तो वैदिक धर्माचा अनुयायी होता. त्याने अनेक यज्ञ केले. भारतीय संस्कृतीच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांपौकी आश्रम पद्धतीचा विचार आणि गुरुकुल शिक्षण पद्धती येथे सुरु झाली.भारतातून अनेक विद्वान यासाठी कम्बुज प्रदेशात स्थायिक झाले. नवव्या शतकातील जयवर्मन राजाच्या रूपाने काम्बुज देशाला एक उमदा आणि पराक्रमी राजा मिळाला.याने इंद्रपूर नावाची नवी राजधानी वसविला. या राजाच्या कारकिर्दीपासूनच काम्बुज देशाचे सुवर्णयुग सुरु झाले असे मानले जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून कंबुजचे राजा स्वत:ला श्रीशैल म्हणवून घेत. नवव्या शतकापासून हे हिंदू साम्राज्य “ख्मेर साम्राज्य” म्हणून ओळखले जाऊ लागले.शेती आणि पाटबंधारे याकडे या साम्राज्यात विशेष लक्ष दिले जात होतेच तसेच कला,साहित्य,शास्त्र,धर्म या मध्येही या साम्राज्याची प्रगती होऊ लागली. याचा पुत्र यशोवर्मन याने यशोधरापूर नावाची राजधानी स्थापन केली.याचे वैशिष्ट्य असे की अतिशय नैसर्गिक परिसरात ही राजधानी होती.यशोवर्मन स्वत: काव्यशास्त्रनिपुण राजा होता. या राजाच्या काळातच खरे तर शिल्प आणि साहित्य यांचे युग सुरु झाले.याने आणिक मंदिरे आणि विहार बांधले.तेथील उत्कृष्ट शिल्पे आजही प्रसिद्ध आहेत. पाच्या जयवर्मन राजाचा काळ हा विद्वत्ता आणि ज्ञानाचे युग मनाला जातो. भारतापासून दूर असलेल्या या ठिकाणीही भारतीय पंथांचे तत्वज्ञान मूळ स्थितीत प्रसारित झाले. बौद्ध संप्रदायही स्वीकारला गेला. असंख्य मंदिरे या काळात उभारली गेली.रामायण आणि महाभारतातील आदर्श कथांचा प्रसार समाजात सर्व स्तरात झाला. बाराव्या शतकात या या प्रदेशात आंंग्कोर वाट आणि अंगकोर थोम या विष्णू मंदिरांची निर्मिती दुसरा सूर्यवर्मन या राजाच्या काळात झाली. इसवी सनाच्या पंधराव्या शतकाच्या अखेरीस कंबुज देशातील हिंदू राज्याचा अस्त झाला.

राजधानी व सर्वात मोठे शहर : फ्नोम पेन्ह
अधिकृत भाषा : ख्मेर
स्वातंत्र्य दिवस : नोव्हेंबर ९, १९५३ (फ्रान्सपासून)
राष्ट्रीय चलन : कंबोडियन रिआल

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*