नवीन लेखन...

वीज जाते आणि येते… मध्ये काय घडते?

पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे.

ज्ञानेश्वर आर्दड,
जनसंपर्क अधिकारी, महावितरण, औरंगाबाद परिमंडल

—————————————————————————————————-

पावसाळा आणि वीजपुरवठा यांचे नाते सर्वांनीच गृहित धरलेले असते. अर्थात, विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करणे शक्य नाही, इतके तिचे महत्त्व वाढलेले आहे. त्यामुळे वीज गेली की, आपल्या संतापाचा पारा चढतो. परंतु वीज जाते, हे वास्तव आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. दुसऱ्या दिवशी त्याची बातमीही होते. परंतु, वीज का गेली, का जाते, याचे उत्तर बहुतेकांना माहीत नसते.

यंत्रणा जोखमीची

रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच ती परत येते. विजेची यंत्रणा अशी आहे की, ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाचा धोका असतो. मोबाईल किंवा टेलिफोनचे तसे नाही. त्याचे एकदा कनेक्शन घेतले की, त्याची सेवा संबंधित कंपनीला एका ठिकाणी बसून चालू किंवा बंद करता येते. तीही कोणत्या जोखमीशिवाय. वीज यंत्रणा त्याला अपवाद आहे. रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात परत येते, तेव्हा कोणीतरी त्या पावसात-अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून खांबावर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. त्यामुळे वीज यंत्रणेवर दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे.

सारा पसारा उघड्यावर

पारंपरिक अथवा अपारंपरिक स्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून निर्माण झालेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो किलोमीटर वीजवाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला ‘ग्रीड’ म्हणतात. हा सारा पसारा उघड्यावर आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात, तर कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरता मर्यादित असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळवारे व आकाशाच्या विजेतील कडकडाट सर्वांनी अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्यांमधून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज, दोन्हींमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की, घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण, उच्च दाबामुळे ती जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. नव्हे, तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते.

हानी टाळण्यासाठी यंत्रणा

दुसरी बाब म्हणजे वीज खांबात विद्युतप्रवाह उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बहुधा ते उन्हामुळे किंवा विद्युतप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात, ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपात्कालिन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीजवाहिनी) बंद पडतो. जर हा फीडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो.

बिघाड शोधणे जिकिरीचे

जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फीडर चालू केला जातो. जर फीडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते. तथापि, बिघाड शोधणे जिकिरीचे असते. ऊन-वाऱ्याची, पावसाची अथवा अंधाराची तमा न करता ही शोध मोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड काही खांबांदरम्यान सापडतो.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

लष्करातील जवानाला युद्धाचा सराव दररोज करावा लागतो. परंतु, युद्ध करण्याची वेळ सहसा येत नाही. इथे मात्र वीज कर्मचारी रोज युद्धभूमीवर असतात. चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ बांधूनच त्यांना खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारची काळजी घेऊनही वीज कर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघात होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु, मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की, एखाद्याच्या जिवाचे मोलही आपण ध्यानात घेत नाही. वीज जाते आणि येते, यादरम्यान काय होते, याचा विचार आपण जेव्हा करू त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाही.

वीज गेल्यास काय करावे आणि काय करू नये?

1.आपल्या घरात आरसीसीबी (रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.

2.अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.

3.वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.

4.वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.

5.विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.

6.वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.

7.बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.

8.विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. तातडीने महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाला अथवा १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर माहिती द्यावी.

— ज्ञानेश्वर आर्दड
जनसंपर्क अधिकारी, महावितरण, औरंगाबाद परिमंडल

लेखकाचे नाव :
ज्ञानेश्वर आर्दड
लेखकाचा ई-मेल :
vdnyan@gmail.com

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

1 Comment on वीज जाते आणि येते… मध्ये काय घडते?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..