नवीन लेखन...

तलावांचे शहर ठाणे – भाग १

सुरुवात करणार आहोत ती ठाण्याची शान असलेल्या मासुंदा तलावापासून. ठाणे म्हटलं की आपसूक लोकांच्या तोंडी येत ते मासुंदा तलाव आणि तिथे मिळणारी भेळपुरी आणि पाणीपुरी.ठाणे स्टेशन पासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर मासुंदा तलाव आहे. तुम्ही जर ठाणे स्टेशन वरून येत असाल तर बस ने येथे सहज पोहचू शकता.किंवा चालत अवघ्या पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर हा तलाव आहे , म्हणूनच अनेक पर्यटकांचे विशेष आकर्षण हा तलाव झालाय.बस ने येण्याचा फायदा असा की जेव्हा बस फ्लायओवर ब्रिज वरून जाते तेव्हा आपल्याला संपूर्ण तलावाचा एरियल व्यु बघायला मिळतो. हल्ली ते काम ड्रोन च्या सहाय्याने लोक करतात पण आपण बस मधून त्याच आनंद घेऊ शकतो. बस ने मासुंदा तलावाच्या बस स्टॉप वर उतरायच . या जागेला तलाव पाळी तसेच जांभळी नाका अस सुद्धा म्हणतात. बस मधून उतरल्याबरोबर आपल्याला अगदी प्रसन्न वाटायला लागतं,तलावाच विहंगम दृश्य बघून डोळ्याचे अगदी पारणे फिटल्या सारखे वाटते . मासुंदा तलावाला भेट देण्याची योग्य वेळ म्हणजे अगदी सकाळी सकाळी किंवा मग संध्याकाळी. सकाळी तर इथे फिरण्याची मजा काही औरच असते, म्हणूनच मासुंदा तलावाला दिवाळीच्या दिवसात लोक अगदी पहाटे चार वाजे पासून संपूर्ण परिवारासोबत नवीन कपडे परिधान करून दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी येतात .पूर्वी दिवाळीच्या दिवसात लोक संपूर्ण तलावाच्या किनाऱ्यावर पणत्या पेटवून दिवाळी पहाट साजरी करायचे. तो देखावा अवर्णनीय असा असायचा. त्याच बरोबर हल्ली काही विशेष प्रसंगी संपूर्ण तलावाला रोषणाईने सजविले जाते.रात्री हा तलाव रंगीबेरंगी रोषणाईने नटलेला दिसतो. हे दृश्य पाहून आपला हात आपोआप मोबाईल कडे वळतो आणि विविध प्रकारच्या सेल्फीचा कार्यक्रम कधी सुरू होतो हे आपल्यालाच कळत नाही.

बरं बस मधून उतरल्यावर तलावाच्या किनाऱ्यावर बांधलेल्या  कठड्यावर बसून हा मन मोहून टाकणारा देखावा बघत बसावं असंच तुम्हाला वाटेल. समोरच तलावाच्या आत मध्ये रुबाबात उभा असलेला अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा बघून आपली छाती फुलून जाते आणि म्हणावसं वाटत अभिमान आहे मी मराठी असल्याचा. महाराजांच्या पुतळ्यापासून काही अंतरावर तलावाच्या अगदी मध्यभागी शंकराचे मंदिर आहे,आणि त्याच्याच आवारात दोन हनुमानाचे पुतळे उभे आहेत. त्यांना बघून असाच वाटत की जणू ह्या मंदिराच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी यांनीच समर्थपणे पेलली आहे. असा देखावा बघून नक्कीच तुम्हाला तलावाची  प्रदिक्षणा करावीशी वाटेल.  तालावाभोवती फिरताना संध्याकाळी भेळ पुरी ची दुकानं बघून तुमच्या जिभेवर कंट्रोल करणं अवघड होईल. तलाव पाळीची भेळ आणि पाणीपुरी खाताना समुद्र किनाऱ्यावरची चौपाटी ची मजा अनुभवता येते. म्हणूनच मासुंदा तलावाला ठाण्याची चौपाटी असेही  काही लोक म्हणतात . मासुंदा तलावाचे आणखी एक आकर्षण म्हणजे इथे असणारी बोटिंग ची सुविधा, याची मजा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना अनुभवावीशी वाटते. संध्याकाळी तलावाची प्रदिक्षणा करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर टांग्याची सुविधा आहे. बच्चे कंपनी साठी ही मेजवानीच असते. इथे असलेले सर्व टांगे सजविलेले असतात. बच्चे कंपनी साठी आणखी एक ठिकाण म्हणजे तालावाशेजारीच असलेले महात्मा गांधी उद्यान, या उद्यानात असलेली मिनी रेल्वे बच्चे कंपनीचे लक्ष वेधून घेते.

तलावाचा फेरफटका मारून झाला तर जवळच प्रभात  सिनेमा आहे तेव्हा सिनेमाचा आनंद ही घेता येतो. एवढंच नाही तर ठाण्यातील सुप्रसिद्ध गडकरी रंगायतन सुद्धा तलावाच्या अगदी  शेजारी च आहे. अनेक कलावंतांच माहेर घर असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. नाटकात काम करणाऱ्या प्रत्येक कलावंताच स्वप्न असतं की आपल्या नाटकाचा एक तरी प्रयोग गडकरी रंगायतन मध्ये व्हावा. गडकरी रंगायतन मध्ये गेलात की तिथल्या कँटीन मधील कलादलनाला अवश्य भेट द्या, अनेक मोठ्या नाट्यकर्मींची छायाचित्रे त्यांनी अगदी लक्ष वेधून घेतील अश्या प्रकारे लावलीत,  मराठी भाषेला आणि मराठी नाट्यसृष्टीला जिवंत ठेवण्याचं काम आपलं हे गडकरी रंगायतन मोठ्या निष्ठेने पार पडतोय. अर्थात गडकरी च्या कँटीन च नाव घेतलं की तिथला प्रसिध्द बटाटावडा खाल्ल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.

मासुंदा तलावाला अनेक ऐतिहासिक वास्तूंचा सहवास लाभलाय एकीकडे मराठीची जपणूक करणारी वास्तू म्हणजे गडकरी रंगायतन तर त्याच्या अगदी विरुद्ध भागी असलेले प्राचीन मंदिर म्हणजे कोपीनेश्वर मंदिर. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. तलावाचा सैरसपाटा मारून झाल्यावर या मंदिरात येऊन आपला सर्व थकवा घालवण्याची ही एकच योग्य जागा आहे  अस मला वाटतं. येथील अध्यात्मिक वातावरणाने मन अगदी प्रसन्न होते. कोपीनेश्वर मंदिरापासून थोड्याच अंतरावर परंतु तलावा शेजारीच आणखी एक वास्तू आहे आणि ते म्हणजे सेंट जॉर्ज चर्च.येथील शांतीपूर्ण वातावरण आपल्या मनावर प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही. मासुंदा तलावाला भेट दिल्यावर जवळच असलेल्या मामलेदारची मिसळ खाल्ल्याशिवाय। परत जाणे बरोबर नाही.येथील मिसळ  खूपच प्रसिद्ध आहे,  संपूर्ण परिवारासोबत जर आपण जाणार असाल तर त्यांचीच शाखा असलेलं हॉटेल  आमंत्रण मध्ये जाऊन  तुम्ही मिसळ खाऊ शकता. मिसळ खाऊन झाल्यावर त्याच्याच जवळ  असलेलं शेवटचं ठिकाण आहे प्रसिद्ध मराठी ग्रंथ संग्रहालय , वाचक प्रेमींचे अगदी आत्मीयतेच ठिकाण, येथे तुम्हाला वाचण्यासाठी शेकडो पुस्तके आहेत. ठाण्यातील हे सर्वात जुने वाचनालय आहे, त्याला नक्कीच भेट द्यायला विसरू नका.

— भैय्यानंद वसंत बागुल

लेखकाचा ई-मेल :
bvbagul4@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..