नवीन लेखन...

ते ओझं..

 

एकदा दोन तरुण संन्यासी एका गावाहून आपल्या आश्रमाकडे परत येत होते. आत्मज्ञानाच्या शोधयात्रेमध्ये गुरूचं मार्गदर्शन लाभल्यानं दोघंही खूष होते. गाव मागे पडत होतं. वसाहत कमी झाली. निसर्ग जवळ आला. एकूणच प्रसन्न वातावरण होतं. जाताना एक नदी लागली. काही स्त्रिया पाणी भरण्याला तर काही कपडे धुण्यासाठी काठावर होत्या. संन्यासी त्यांना ओलांडून पुढे आले. सहज त्यांनी किनार्‍याला पाहिलं. एक असहाय महिला लंगडत होती. ती तरुण अन् सुंदरही होती; पण पायाला मार लागल्यानं विव्हळत होती. तिला त्या किनार्‍यावरून या किनार्‍यावर यायचं होतं. या तरुण संन्याशांना पाहून तिनं मदतीची याचना केली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. काय करावं हा प्रश्न दोघांच्याही चेहर्‍यावर होता; पण क्षणातच त्यातल्या एकानं निर्णय घेतला, तो नदी ओलांडू लागला. कंबरेइतक्या पाण्यातून तो त्या तीरावर पोहोचला. म्हणाला, ‘काय मदत करू?’ ती म्हणाली, ‘मला पलीकडे जायला मदत कर.’ त्यानं पाहिलं, त्या तरुणीचा पाय जखमी होता. एकटीनं नदी ओलांडणं कठीण होतं. क्षणभर तो थांबला अन् त्यानं तिला दोन्ही हातानं उचलून घेतलं.

मानेखाली आणि कमरेखाली हात अशा अवस्थेत तो त्या तरुणीला घेऊन झपाट्याने किनार्‍याकडे येऊ लागला. तरुणीच्या देहाचा स्पर्श त्याच्या देहाला होत होता; पण ती आणि तो निरागसपणे अलीकडच्या किनार्‍याला पोहोचले. त्यानं तिला वाळूत विसावलं, गुरूचं स्मरण केलं आणि आपल्या सोबत्याबरोबर चालू लागला. तिनं धन्यवाद दिले; पण त्याकडेही त्याचं लक्ष नव्हतं. आता या दोन्ही शिष्यांचा प्रवास सुरू झाला. शांतपणे आणि अबोल. मैलभर चालून आल्यावर त्यातला एक म्हणाला, ‘‘मित्रा, एक सांगू, तू जे काही केलंस ते चांगलं नाही केलंस. तू त्या तरुण मुलीला उचलून घेतलंस, तिला स्पर्श केलास. आपण आत्मज्ञानाच्या शोधात आहोत आणि तशात तू विकाराला चालना देणारं वर्तन केलंस, हे काही मला पटलं नाही.’’ दुसरा संन्यासी म्हणाला, ‘‘मित्रा, मानवी मदतीच्या हेतूनं जे ओझं मी उचललं ते मी केव्हाच किनार्‍याला ठेवून रिकामा झालोय आणि तू मात्र इतका वेळ ते ओझं इथपर्यंत वागवत होतास?’’ भगवान म्हणतात, ‘‘वर्तमान जगा. भविष्यात किवा भूतकाळात जगू नका; अन्यथा काळ तुमच्यासाठी थांबणार नाही. वर्तमान भूतकाळात रूपांतरित होत जाईल. त्या शिष्यानं कृती केली; पण त्या घटनेचे कोणतेही संदर्भ मनावर राहू दिले नाहीत. तर दुसरा ते अपराधीपणाचं ओझं घेऊनच चालत राहिला. माणसाचं जगणं पाहिलं तर बहुतेकांना आपल्या वागण्या-बोलण्यात असं ओझं वाहण्याचा अनुभव येऊ शकेल. उद्या काय होईल? काल काय चुकलं? यापेक्षा आता आपण काय करतो आहोत, काय आनंद-अनुभूती घेतो आहोत ते महत्त्वाचं. आनंदी जीवन जगणं म्हणजे वर्तमानात जगणं. वर्षापूर्वी कोणी तरी काही तरी बोललेलं आपण मनात जपतो आणि अस्वस्थ होत जातो. अशा वेळी ती व्यक्ती भेटली तर भेटीच्या आनंदापेक्षा अस्वस्थताच अधिक असते. त्यात आनंद कसा सापडेल?’’

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..