नवीन लेखन...

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – अ

भाग – २ – अ

 भाषेचा शुद्धपणा व लोकभाषा

आपण भाषेच्‍या शुद्धपणाचा परकीय भाषेच्‍या संदर्भात विचार केला. आतां आपण त्‍याचा विचार लोकभाषेच्‍या दृष्‍टीकोनातून करूं या. त्‍यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्‍व नाहीसं करून टाकील, असा निष्‍कर्ष निघतो कां तें.

आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्‍यांची भाषा असते. तिला प्रतिष्‍ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्‍व टिकून राहतं.

कुठलीही एक भाषा घेतली तरी, एक गोष्‍ट लक्षात ठेवायला हवी की तिची वेगवेगळी रुपं असतात. भाषेचं रूप काळाबरोबर बदलतं, हे जसं खरं; तसंच हें ही खरं की एकाच वेळी भाषेची भिन्न रूपंही अस्तित्‍वात असतात. एकनाथी काळात गद्य व पद्याच्‍या भाषेचं स्‍वरूप कसं वेगवेगळं होतं हें ही आपण पाहिलं आहे. आजही बोलचालीची व साहित्यिक भाषा भिन्न आहे. दर बारा कोसांवर बोली बदलते असं म्‍हणतात. त्‍यातही पुन्‍हा, अमुक शहरातली भाषा अधिक शुद्ध आहे, किंबहुना तेंच भाषेचं खरं रूप असा आग्रह धरला जातो. उत्तर भारताच्‍या एका विस्‍तृत प्रदेशात हिंदी किंवा तिच्‍या बोलीभाषा बोलल्‍या जातात. पण शुद्ध हिंदी समजलं जातं बनारस, अलाहाबादचं. मराठीच्‍या बाबतीतही, पुण्‍याची मराठी हेंच तिचं खरं रूप आहे असं आज अनेक विद्वान म्‍हणतात.

असं प्रतिपादन योग्‍य आहे किंवा नाहीं हा भाग वेगळा. पण एक महत्त्वाची गोष्‍ट आपण ध्‍यानांत घेत नाही की ही so-called शुद्ध भाषा ( म्‍हणजे शुद्ध म्‍हणविली जाणारी भाषा ) उच्‍चवर्णीय आणि उच्‍चवर्गीयच बोलतात, जनसामान्‍य बोलत नाहींत. याचाच अर्थ असा की ही so-called शुद्ध भाषा म्‍हणविली जाणारी भाषा फक्‍त ३% मंडळीच बोलतात ( मी ही त्‍यातलाच एक असं म्‍हणायला हवं ). विशेष करून आजच्‍या काळात, जेव्‍हा समाजाच्‍या विविध थरात जागृती झाली आहे , होत आहे , त्‍यामुळे अशी ३% लोकांच्‍या उपयोगात असलेली इंग्रजी, आमच्‍या भारतीय लोकभाषेचं अस्तित्‍व कसं नाहींसं करू शकेल?

प्राकृत भाषांचं अस्तित्व आपल्‍याला भारतात गेली २००० वर्षं दिसतं आहे. संस्‍कृत ही लोकांच्‍या बोलाचालीची भाषा राहिली नव्‍हती. तरीही लोकभाषा हीन लेखली जात असे. एकनाथांना काशीच्‍या ब्राह्मणांना खडसावून विचारावं लागलं की, ‘‘संस्‍कृत भाषा देवें केली, मराठी काय चोरापासून झाली?’’ आज तेंच वाक्‍य आपण इंग्रजीच्‍या बाबतीत म्‍हणून पहावं.

आपल्‍या भारतीय मातृभाषोची जागा इंग्रजी घेईल असं आपण म्‍हणत असतो. खरंच तसं झालं तर काय होईल याची कल्‍पना करून ३ दृष्यं आपण डोळ्यासमोर आणू या –

१) दोन भारतीय शेतकरी शेतात नांगर धरतांना – ‘‘The बाजरी crop is good this year?’’
किंवा ‘‘Take a spade and water the करडई.’’ असं बोलत आहेत.
२) खेडेगांवातल्‍या दोन शेजारणी अंगणात भांडी घासतांना, ‘‘Jowar is very costly these days.’’ किंवा ‘‘I have to still prepare भाकरी & पिठलं.’’ असं म्‍हणत आहेत.
३) एखादा भिकारी हात पसरून, ‘‘Give in the name of Allah!’’ किंवा ‘‘May your couple live happily like रामसीता.’’ असं काही म्‍हणत आहे.
ही दृश्‍य पाहिली, की इंग्रजी आपल्‍या मातृभाषेचं स्‍थान घेईल, ही कल्‍पना किती हास्‍यास्‍पद आहे, हे कळून येईल.
**

(पुढे चालू)

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..