नवीन लेखन...

हृदयरोग आणि व्याधिक्षमत्व

गेल्या ४० ते ५० वर्षांत हृदय रोगाचे प्रमाण खूपच वाढले आहे . गेल्या ४ ते ५ दशकांमध्ये लोकसंख्या खूपच वाढली आहे . तसेच पूर्वी आपल्या देशाचे सरासरी वय होते ३५ वर्षे होती . जसजशा सुधारणा घडत गेल्या , औषधोपचार पद्धतींत खूपच बदल होत गेले व नवनवीन चाचण्या येऊ लागल्या व रोगांचे निदान अचूक होऊ लागले व त्यांचे उपचार चांगल्या रीतीने होऊ लागले , तसतसे जगण्याचे प्रमाण वाढत गेले . सध्या सरासरी वय आहे ६५ वर्षे आहे . येत्या १० वर्षांत हे सरासरी वय ७५ ते ८० वर्षे होऊ शकेल असा होरा आहे .

कार्डिओग्राम , एक्स रे , २ – डी ईको , स्ट्रेस टेस्ट , सि.टी. व एम् . आर् . आय् . स्कॅन , सि.टी. अंजीओ , थॅलियम स्कॅन , स्ट्रेस इको , रक्ताच्या चाचण्या , इन्वेझिव अँजियोग्राफी ह्यांच्या आधारे हृदयाच्या निरनिराळ्या व्याधींचे निदान होऊ लागले . हृदयाचे बरेच प्रकारचे आजार असतात . त्यांचे वर्गीकरण मुख्यतः खालील प्रमाणे आहे .

हृदयांतील पडद्यामध्ये
१ ) जन्मतःचे हृदयरोग छिद्र असणे . ( ए.एस् , डी , व्हि.एस्.डी. , ओओर्टो पल्मोनरी विंडो , डक्टस् पेटंट आर्टेरिओसिस ASD , USD ,
AP Window , PDA इत्यादि .

२ ) हमॅटिक हृदयरोग हृदयांतील झडपा खराब होतात . जसे स्टेनॉसीस , ओओर्टिक स्टेनॉसीस इत्यादि .

३ ) तापांच्या आजारांचे हृदयरोग – ( जंतूंचे व विषाणूंचे आजार ) कोविड १ ९ ( करोना ) , निरनिराळ्या प्रकारचे विषाणू , डिप्थीरिया , व्हायरल

हमॅटिक तापापासून मायट्रल मायोकार्डायटिस .

४ ) क्षयरोगापासून होणारा हृदयरोग – हृदयाच्या आवरणाला येणारी सूज व त्यांत पाणी जमणे
पेरिकार्डिटिस ( Pericarditis ) .

५) ईस्किमिक हृदयरोग ( Ischemic Heart Disease ) – हार्ट अॅटॅक , ॲजायना इत्यादी रोग प्रामुख्याने मधुमेह व उच्च रक्तदाब व उच्च स्निग्ध पदार्थांचे प्रमाण ह्यापासून उद्भवतो .

६) डायल्याटेड मायोकार्डाइटिस – ह्या आजारात हृदय बरेच मोठे होते . त्याच्या स्नायूंची शक्ती क्षीण होत जाते . हृदयाचे आकुंचन बरोबर होत नाही . त्यापासून बऱ्याच प्रकारचे त्रास होतात .

७ ) उच्च रक्तदाबापासून होणारा हृदयरोग हृदयाचे स्नायू जाड होतात . त्याचा वाईट परिणाम आकुंचनावर होतो .

८ ) हृदयाचा व हृदयाच्या आवरणाचा कर्करोग . ह्या व्यतिरिक्त हृदयाचे दुसऱ्या प्रकाराचे रोग असतात . परंतु त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे . त्यामुळे ते आजार ह्या लेखात दिलेले नाहीत .

हृदयरोगांत व्याधिक्षमत्व ( Immunity ) नक्कीच कमी होते . मग तो कोणत्याही प्रकारचा हृदयरोग असो . हृदयरोगात जेव्हा हृदयाची आकुंचन पावण्याची क्रिया कमी होत जाते व रक्तप्रवाह योग्यरीतीने होत नाही , त्यावेळी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते , ह्याला कंजेस्टिव कार्डियाक फेल्युअर ( CCF ) असे म्हणतात . यामध्ये भूक लागत नाही . आहार कमी होतो . त्यामुळे यकृत मोठे होते व अंगाला सूज येते. त्यामुळे व्याधिक्षमत्वाला लागणारे इम्यूनिटी प्रोटीनस् कमी होतात . ह्याचा परिणाम व्याधिक्षमत्वावर होतो . इम्यूनोग्लोब्यूलिन्स कमी होतात .

नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की , हृदयरोगांत कोलेस्टरॉलचे बारीक कण इम्यूनसिस्टीम मधील बारीक कणांना उत्तेजित करते व त्यामुळे सुद्धा व्याधी विरोधी बल कमी होते , तसेच रक्तवाहिन्यांत Atherosclerosis वाढते . तेथील स्थरांना सूज येते , रक्तवाहिन्यांना अपाय होतो . त्यातूनच हृदयशूल , मेंदूत रक्ताची गाठ होणे , अर्धांगवायूचा झटका येणे व बऱ्याच रुग्णांमध्ये मृत्यू होऊ शकतो .

सायटोकाईन्स ( cytokines ) चे प्रमाण रक्तात वाढते . याचा अपाय शरीरात हृदयाव्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी दिसून येतो . हृदयाच्या Dilated Cardiomyopathy प्रकारात तर हे प्रमाण जास्त दिसून येते .

Rheumatic Heart Diease मध्ये तर हृदयाच्या झडपा खराब होतात . त्यामुळे हृदयाची आकुंचन व प्रसरण पावण्याची क्रिया बिघडत जाते व शेवटी त्या रुग्णाला Congestive Heart Failure होते व त्याच्या वाईट परिणामांतून Immunoglobulin चे प्रमाण कमी होते . Rheumatic प्रक्रियेमध्ये वारंवार ताप येणे , सांध्यांना सूज येणे , भुकेचे प्रमाण कमी होणे , वजन कमी होणे हे प्रकार घडतात व त्याचा परिणाम व्याधिक्षमतेवर होतो . हृदयाच्या झडपांवर जंतू बसतात , त्याला सूज आणतात . या प्रकाराला Subacute Bacterial Endocarditis असे संबोधतात . त्याचाही वाईट परिणाम व्याधिक्षमतेवर होतो अशा बऱ्याच प्रकारच्या वाईट परिणामांमुळे रुग्णाची कार्यक्षमता कमी होते , वजन कमी होते व त्याची प्रतिकारशक्ती आणि व्याधीविरोधी बल सारख्याच प्रमाणात कमी होते .

जसजसा हृदयविकार बळावतो , बराच काळ रहातो तसतशी रोग्याची प्रतिकारशक्ती हीन होत जाते . वरील मजकुरात बलहीन होण्याची कारणमीमांसा केलेली आहे . चिकित्सेदरम्यान व नंतरसुद्धा आजाराने ग्रासलेले रुग्ण सुधारत नाहीत व त्यांचे व्याधीविरोधी बल कमीच रहाते . हे बल व व्याधीविरोधी शक्ती प्राप्त करण्यासाठी हृदयविकाराचे अचूक निदान होणे अतिशय महत्त्वाचे आहे . जितक्या लवकर अचूक निदान होईल व त्याची योग्य ती कारणमीमांसा होऊन , योग्य ते उपचार चालू होतील त्या प्रमाणात रुग्ण लवकर बरा होऊ शकतो . त्याची Immunity ( व्याधिक्षमत्व ) पूर्ववत होण्यास मदत होते . हृदयविकाराचे निदान लवकर होणे अतिशय महत्त्वाचे आहे . कारण निरनिराळ्या प्रकारच्या हृदयरोगांमध्ये उपचार पद्धती वेगवेगळी असते . निदान जर योग्य झाले नाही , तर उपचार पद्धती चुकीची होऊ शकते . त्यातून वेगळीच गुंतागुंत होते व नवीन नवीन Complications होतात . असे झाले तर त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो . व्याधिक्षमत्व ( Immunity ) जास्त प्रमाणात कमी होते व रुग्णाला दुसऱ्याच प्रकारचे आजार उद्भवतात जसे की न्यूमोनिया , क्षयरोग , पोटांचे आजार , यकृतांचे आजार इत्यादी .

त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे , ती म्हणजे हृदयविकार तज्ज्ञांकडून योग्य निदान लवकरात लवकर करून घ्यावे व त्यांच्याकडे नियमित Follow up करावा . केव्हाही प्राथमिक स्तरावर हृदयविकाराचे उपचार करणे सोपे असते . परंतु जेवढा उशीर होईल तेवढ्या प्रमाणात आजाराची गुंतागुंत वाढते . दुसरे विकार ( Complications ) निर्माण होतात . अशावेळी त्यांचे उपचार करणे जास्त जिकिरीचे होते व रुग्णांना उपचाराचा फायदा जसा पाहिजे तसा मिळत नाही . बऱ्याच वेळा वाईट गोष्टी घडतात व त्या रुग्णांच्या प्राणावर बेततात . बऱ्याचवेळा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते . उपचारांचा खर्चही वाढत जातो .

आजारापासून संरक्षण
वरील लेखनातून वाचकांना कल्पना आलीच असेल की , योग्य निदान लवकरात लवकर होणे किती महत्त्वाचे आहे . त्यांचे उपचार सुद्धा लवकरात लवकर सुरू होणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे .

इंग्रजीत म्हण आहे की , ‘ Prevention is better than Cure . ‘ म्हणूनच अशा हृदयविकारापासून संरक्षण मिळणे हे खूपच महत्त्वाचे आहे . त्यासाठी खालील उपाययोजना करणे महत्वाचे आहे .

१ ) योग्य व क्षमतेप्रमाणे रोज ३० ते ६० मिनिटे व्यायाम करावा . ३ ते ४ किलोमीटर चालणे . योगासन करणे , प्राणायाम करणे , पीटीचे व्यायाम करणे , सायकलींग , आयसोमेट्रीक Contractions ( स्नायूंचे आकुंचन ) , पोहोणे हे व्यायाम उत्तम . परंतु आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे हे धोकादायक होऊ शकते .

२ ) योग्य तो व शरीराला पोषक असा आहार करावा . ह्याबाबतीत डॉक्टरांची मदत घेणे योग्य ठरेल . आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा . प्रामुख्याने आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे , तेलकट तूपकट पदार्थ टाळावेत . रोजच्या आहारांत लोणची , चटण्या , पापड ह्यांचा समावेश नसावा . साखरेचे प्रमाण कमी ठेवणे उत्तम . गोड पदार्थ शक्यतो टाळावेत . आहाराचे प्रमाण योग्य तेवढेच असावे . एखादा पदार्थ आवडल्यास , त्याचे अतिसेवन टाळावे . आहाराच्या वेळा ठराविक असाव्यात . रात्रीचा आहार कमी घ्यावा . जेवणानंतर लगेचच झोपू नये . दोन ते अडीच तासांचे अंतर असावे . हृदयविकाराव्यतिरिक्त दुसरे आजार असल्यास , उदाहरणार्थ मधुमेह , उच्च रक्तदाब , संधिवात , गाऊट इत्यादि त्यांचीसुद्धा योग्य ती औषधे घ्यावीत . त्याप्रमाणे आहारात योग्य ते फेरफार करणे महत्त्वाचे असते . ह्या सर्व गोष्टी वैद्यकीय सल्ल्यानेच कराव्यात .

३ ) धुम्रपान , तंबाखू सेवन , दारूसेवन अशा प्रकारची व्यसने असता कामा नयेत . त्यांचा पूर्णपणे त्याग करावा .

४ ) वजन जर जास्तच असेल , B. M.I. जास्त असेल , तर वैद्यकीय सल्ल्यानुसार ते कमी करण्याचे उपाय करावेत . उंची व वजन हे योग्य असले पाहिजे . ह्यासाठी सुद्धा योग्य आहार व व्यायाम करणे इष्टप्राप्त आहे .

५ ) रक्तामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्यास , ते कमी करण्याचे प्रयत्न करावेत . ह्यासाठी सुद्धा व्यायाम , योग्य आहार , वजन कमी करणे हे सर्व जरुरीचे असते . वैद्यकीय सल्ला जरुरीचा असतो . जरूर लागल्यास चरबी कमी करण्याची औषधे वैद्यकीय सल्ल्याने घ्यावीत .

६ ) मनःशांती खूपच महत्वाची आहे . रोज साधारणत : सात तास तरी झोप घ्यावी . मनःशांती व योग्य झोप नसेल तर व्याधिक्षमत्व नक्कीच कमी होते . चांगली Immunity असण्यासाठी ह्या बाबी जरुरीच्या आहेत .

७ ) जीवनपद्धतींत सुधारणा . ( Life style Management ) आजच्या जीवनपद्धती प्रमाणे बहुतेक मोठमोठ्या शहरांमध्ये धावपळ वाढली आहे . प्रवासाचा वेळ वाढला आहे , गर्दी व गोंगाट वाढला आहे . स्पर्धा , आशा – अपेक्षा ह्यांचे प्रमाण खूपच जास्त आहे . त्यातूनच मानसिक अशांती निर्माण होते . कामाचे प्रमाण खूपच जास्त आहे . वेळेचे व कामाचे समीकरण जमत नाही . इच्छापूर्ती न झाल्यामुळे मानसिकता बिघडली आहे . उदासीनता वाढली आहे . ह्याच्यामुळे सुद्धा हृदयरोग उद्भवतात . हे टाळण्यासाठी साधारणत : दर १ ते २ तास काम केल्यानंतर कामाच्या ठिकाणी शारीरिक व मानसिक शिथिलीकरण करणे जरुरीचे आहे . बरेच जण संगणकावर काम करतात . त्यांनी मधून मधून थोडे उठावे , २ – ३ फेऱ्या माराव्यात . मान शिथिल करावी . बसल्या जागी मानेचे व्यायाम करावेत . खांद्यांचे व्यायाम करावेत , डोळ्यावर पाणी मारावे , डोळे बंद करून ५ मिनिटे मानसिक शिथिलीकरण करावे . ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्यावरील ताण कमी होतो . शारीरिक व मानसिक ऊर्जा मिळते व कामाचा उत्साह वाढतो .

आठवड्यातून एकदा दोनदा मानसिक ताण कमी करण्यासाठी मित्रांना भेटणे , गप्पा व हास्यविनोद करणे , निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळणे , आवडती गाणी ऐकणे , फिरायला जाणे , वाद्यांची आवड असल्यास त्यांचा सराव करणे , बागेत काम करणे , आवडत्या कलांमध्ये रमणे ह्या सर्व बाबींचा उपयोग मानसिक व शारीरिक शिथिलीकरणामध्ये अतिशय चांगला होतो . ताण – तणावामुळे निर्माण होणारे शरीरातील स्राव Adrenaline व Noradrenaline ह्यांचे प्रमाण कमी होते व त्यापासून हृदयाची गती रक्तदाब , शर्करेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते . शारीरिक जडपणा व डोकेदुखी सुद्धा कमी जाणवते.

हृदय रोग असणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी खालील उपाय करावेत . त्याचा उपयोग त्याच्या दैनंदिन जीवनात खूपच होतो . त्यातील बऱ्याच बाबींचा उल्लेख या लेखात आधीच केला आहे .

१ ) योग्य आहार : – आहार तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे आहार घ्यावा . व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी प्रथिने ( Proteins ) आहारात जास्त असावीत . दूध , डाळी , मूग – मटकी , कडधान्ये , भाज्या , सलाड्स् , सूप , फळं , अंड्याचा पांढरा भाग , मासे , चिकन यांचा समावेश आहारांत असावा . पिष्टमय व चरबी असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे . तूप तेलाचे प्रमाण कमी असावे .

२ ) व्यायाम : क्षमतेप्रमाणे रोज ३० ते ६० मिनिटे व्यायाम करावेत . निरनिराळ्या प्रकारच्या व्यायामांचा उल्लेख लेखांत आधीच केला आहे . साधारणतः आठवड्यातून ५ दिवस तरी व्यायाम करणे गरजेचे आहे . हल्ली जिममध्ये व्यायामाचे बरेच प्रकार करण्यासाठी योग्य ती साधन – सामग्री असते . कार्डीयोसारखे व्यायाम हृदयरोग असणाऱ्यांना खूपच उपयोगी असतात . त्यांचा अपाय हृदयाला होत नाही . उलट हृदयाच्या व इतर अवयवांच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात , त्यातून रक्तप्रवाह सुधारतो व शरीराला प्राणवायूचा पुरवठा उत्तमरीतीने होतो . हृदयशूलाचे प्रमाण कमी होते.रक्तदाब व मधुमेह ह्यांच्यावर उत्तम नियंत्रण रहाते , शारीरिक ऊर्जा वाढते . मानसिक प्रसन्नता जाणवते .

प्राणायाम , योगासने , ध्यानसाधना , शवासन , ओंकार साधना हे नियमित केल्याने मानसिक व शारीरिक शिथिलीकरणास योग्य ती मदत होते . मन : शांती प्राप्त होते . शारीरिक सुदृढता वाढते . वयोमान वाढते .

३ ) व्यसन : – हे अतिशय घातक असते . सिगरेट , तंबाखू सेवन , धूम्रपान , दारू या सर्व बाबी शरीराला घातक असतात हे सर्वश्रुत आहे . आजकाल आपण सर्व वर्तमानपत्रांतून व टीव्हीवर अमली पदार्थाविषयी भरपूर वाचतो , ऐकतो . चित्रसृष्टीतील बरीचशी उदाहरणे आपल्या नजरेसमोर आहेतच . चरस , गांजा , अफू , एल् . एस् . डी . व इतर नवनवीन अमली पदार्थ यांचा उपयोग व सेवन खूपच वाढले आहे . याचे प्रमुख कारण म्हणजे मानसिक अशांती . या सर्व बाबी शारीरिक व मानसिक संतुलन बिघडवितात व त्यातूनच हृदयरोग उद्भवतात . व्याधिक्षमत्व खूपच कमी होते . म्हणूनच ह्या सर्व बाबींपासून दूर रहाणे योग्य . मित्रपरिवार योग्य असल्यास ह्या बाबींची जरुर भासत नाही .

इतर बाबींचा विचार या लेखात आधीच केला आहे . त्या सर्व काटेकोरपणे पाळल्यास व्याधिक्षमत्व वाढविण्यास मदत होते . आपला बचाव बऱ्याचशा व्याधींपासून होऊ शकतो .आयुष्य निरामय व सुदृढ रहाते . यातून हृदय स्वास्थ्य मिळते . जीवनाचा आनंद घेता येतो . शरीरस्वास्थ्य चांगले तर जीवन आनंदमय , परिपूर्ण होते . जीवन सार्थकी लागते .

तुमचे सर्वांचे जीवन आनंदी व स्वास्थ्यपूर्ण राहो ही प्रार्थना .

डॉ . अनिल तांबे
तांबे हार्ट अँड मेडिकल हॉस्पिटल ,
नौपाडा , ठाणे ( प ) .
०२२२५३८१६६५ , ९ ८२०५४८०४१

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..