नवीन लेखन...

पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे

“काल “ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात “पूर्वाश्रमीची” असा शब्द वापरलाय, बहुधा “महत्वाची” असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले.

पाश्चात्य देशांमध्ये निर्घृणपणे (मर्सिलेस्ली) त्यांना दूर केले जाते. कारण एकच -त्यांच्यासाठी काळ काही विशिष्ट क्षणांमध्ये गोठलेला असतो. स्वतःच्या भूमिकांमधील / स्थानामधील होत चाललेला बदल एकतर त्यांना माहित नसतो किंवा ते पूर्वीच्या पदाला कवटाळून बसलेले असतात.

काही शहाणी माणसे ही पावले ओळखून आधीच स्वतःला बदलतात आणि नवी ओळख स्वीकारतात, भूतकाळातील ओळख विसरून.

डेरेक सीव्हर्स ची एका मुलाखतीच्या सुरुवातीला “यशस्वी उद्योजक “अशी ओळख करून दिल्यावर त्याने त्वरीत आक्षेप नोंदविला. मी दहा वर्षांपूर्वी व्यावसायिक होतो.त्यामुळे त्या नामाभिधानावर (टायटल) सध्या माझा हक्क नाही.त्याच्या मते – तुम्ही काय करता,हे टायटल सांगते पण तुम्ही कोण आहात याचा त्यावरून अर्थबोध होत नाही. आजची त्याची ओळख विचारवंत,साहित्यिक आणि संगीतकार आहे. उर्वरीत आयुष्यासाठी त्याने आपली ” यशस्वी उद्योजक ” ही ओळख सहजगत्या मागे टाकलीय.

पण जुन्याला धरून बसणाऱ्यांचे काय? ते पूर्वाश्रमातच जगत असतात. त्यांनी असंबद्ध, अप्रस्तुत, अप्रासंगिक,गैरलागू (एका IRRELEVANT शब्दाचे इतके अर्थ मला शब्दकोशाने दिले) झाल्यावर काय करायचे हा विचार तीन दिवस माझ्या डोक्यात घोळत होता.

अचानक परवा राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांचा १७ सप्टेंबरचा व्हिडिओ पाहिला. “माचीस”मधील “पानी पानी रे” हे गुलज़ार चे अप्रतिम गीत, विशाल भारद्वाज चे घायाळ करणारे संगीत आणि लताचा आवाज त्यांनी बेहद्द खूबसूरत रंगविला. हाईट म्हणजे पहिली ओळ “पानी पानी रे” आणि दुसरी ओळ “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” (“उंबरठा”- सुरेश भट, हृदयनाथ आणि परत एकदा अपरिहार्य लता) असे राहुलने सादर केले आणि मी त्या भावनांच्या, संगीताच्या आणि व्यक्तिरेखांच्या साधर्म्याने थरारलो.

आयुष्यातील / कुटुंबातील PIP स्थान गमावल्यावर काय दुःख होतं, त्याची जातकुळी किती अस्सल असते हे दोन कालखंडांमधील पण समकालीन रचनांनी मला उलगडून दाखविलं.

राहुल काळाच्या बराच पुढे असलेला गायक असल्याने तो प्रत्येक व्हिडिओत सांगीतिक भाष्यही करीत असतो. इथे तो चक्क कुमारांच्या “निर्गुणी” रचनांच्या संकल्पनेवर बोलला. संगीतामधील “विराम” (पॉझ) ऐकायला, जगायला शिका. मूळात सूर बारा असले तरी तेरावा सूर असतो-स्तब्ध, निरव शांततेचा, स्थिर! शुद्ध गंधार मधल्या गुरुस्तुतीच्या चार ओळी ऐकवून तो म्हणाला – हे सारं असं असतं. आकाशावर, निसर्गावर, आयुष्यावर लिहिलेल्या शांततेच्या ओळी याच अंतिम असतात.

PIP सदरात मोडणाऱ्या मंडळींसाठी हा मला मोठा धडा वाटला. अप्रस्तुत होण्याआधी गप्प व्हायला हवं, भवतालात शांतता निर्माण करता यायला हवी मग “सुन्या सुन्या” मैफिलीतून काढता पाय घेतल्यावर “खारे पानी” आपोआप “नयनोमे भर जा” संभवतं .

धन्यवाद राहुल!

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..