नवीन लेखन...

पं. बिरजू महाराज

महान कथक गुरू, उत्कृष्ट गायक, निष्णात तबला, सरोद, व्हायोलिन वादक आणि उत्तम दर्जाचे चित्रकार असणाऱ्या पं. बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. पं बिरजू महाराज यांचे वडील म्हणजे लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यातील अच्छन महाराज.  त्याचे नाव खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा. बिरजू हे त्यांचे लहानपणचे नाव.

आज आपण त्यांना आजही पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखतो. पं.बिरजू महाराज यांना नृत्य वारसा हक्कानेच मिळाले होते. त्याशिवाय लय-तालाची नैसर्गिक देणगीही होती. बालपणातच त्यांनी आपल्या वडीलांकडून नृत्याचे धडे घ्यायला सुरवात केली. मात्र हे शिक्षण त्यांना फार काळ लाभले नाही. पं.बिरजू महाराज वयाच्या दहाव्या वर्षीच अच्छन महाराजांचे निधन झाले. पुढचे शिक्षण बिरजू महाराज यांनी त्यांचे काका पंडित लच्छू महाराज आणि पंडित शंभू महाराज यांच्याकडे घेतले. लच्छू महाराज लास्यांगात मुरलेले तर शंभू महाराजांचा अभिनयात हातखंडा. बिरजू महाराज यांनी हे सगळे टीपकागदाप्रमाणे आत्मसात केले. थोर गुरूंकडून मिळालेली विद्या, असामान्य प्रतिभा आणि अंत:प्रेरणा या त्रयींवर पुढे महाराजजींनी कथक नृत्यात नवनवीन प्रयोग केले. त्यांचे पूर्वज दरबारात नृत्य करत होते. ते नृत्य आता रंगमंचावर आले आहे याचे भान ठेवून बिरजू महाराज यांनी ते अधिकाधिक लोकाभिमुख केले. महाराजजींचं बालपण अतिशय हालाखीत गेले.त्यांचे काका श्री लच्छू महाराज मुंबईत नृत्य गुरू म्हणून आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी आपल्या या पुतण्याला मुंबईला येण्याचा प्रस्ताव दिला.खूप मोठी संधी बिरजू महाराज यांच्याकडे चालून आली होती पण त्यांच्या आईने त्यांना अडवले. “चित्रपटसृष्टीत नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळेल पण घराण्याचं काम अर्धवट राहील. घराण्याचा वारसा पुढे नेणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे!” असे सांगून आईंनी महाराजजींना जणू त्यांच्या जीवितकार्याची जाणीव करून दिली. बिरजू महाराज यांनीही आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानली. पुढे काही तुरळक सिनेमांचा अपवाद वगळता महाराजजी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले.

लहान वयात बिरजू महाराज यांची उत्तम नर्तक म्हणून ख्याती होतीच पण या वयातच उत्तम गुरू म्हणूनही त्यांचा लौकीक होऊ लागला.त्यांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली.’फाग-लीला’, ’मालती-माधव’, ’कुमार संभव’ ही काही नावे. या नृत्यनाट्यांमधे त्यांनी स्वत: प्रमुख भूमिकाही साकारल्या. त्यांनी ’रोमिओ-ज्युलिएट’ या महान नाटककार शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतीवर सर्वांगसुंदर असे नृत्य-नाट्य सादर केले. संपूर्ण देशभरात आणि विदेशात बिरजू महाराज यांच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. बिरजू महाराज यांचे नृत्य पहाणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. त्यांच्या सहज-सुंदर रेषा, अप्रतिम पवित्रे, जणू एक जिवंत चित्रशिल्पच! मोराच्या गतीत जेव्हा बिरजू महाराज मोराची चाल करतात तेव्हा खरोखरच लखलखीत पिसाऱ्याचा, डौलदार मानेचा मोर आपल्यासमोर नाचतोय असे वाटते. त्यांचं भावांगही तितकंच सहज सुंदर. एखाद्या कुशल चित्रकाराने कॅनव्हासवर विविध रंगछटा लीलया साकाराव्यात त्याच सहजतेने त्यांच्या चेहेऱ्यावर भाव जिवंत होतात. सौंदर्यरसाच्या या उधळणीत रसिकमन चिंब भिजून जाते. बिरजू महाराज यांची प्रतिभा केवळ नृत्यापुरती सीमित नाही. ते एक उत्तम कवी आणि चित्रकार आहेत. तबला, पखावज वाजवण्यात ते वाकबगार आहेत. नृत्यासाठीही त्यांनी अनेक पद्यरचना केल्या आहेत. नवनवीन टुकडे, तोडे, तिहाया यांची निर्मिती तर अविरत चाललेली असते. खूप कमी कलावंत उत्तम शिक्षकही असतात.

मध्ये पुण्यातील कार्यक्रमात बिंदादीन महाराज यांच्या ठुमरींसह मराठी गाणेही गाऊन त्यांनी रसिकांना जिंकून घेतले होते. ’कथक केंद्र (दिल्ली)’ ते स्वत:ची संस्था ’कलाश्रम’ या प्रवासात त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य तयार केले. बाल, प्रौढ अश्या प्रत्येकाला शिकवण्याची महाराजजींची खास हातोटी आहे. बिरजू महाराज यांना ऐकताना आपण प्राचीन मंदिरातील कथकापुढे बसलो आहोत असे वाटते. बिरजू महाराज यांना अनेक मोठमोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देशाचा सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. बनारस आणि खैरागड या विद्यापिठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे.याशिवाय कालिदास सन्मान, ’नृत्य चुडामणी’, आंध्र रत्न, सोविएत लँड नेहरू पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ अनंत वझे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..