नवीन लेखन...

हिंन्दू संस्कृतीतील देवाचा उगम आणि शंकर-पार्वती-गणपती

हिंन्दू संस्कृतीतील देवाचा उगम आणि शंकर-पार्वती आणि गणपती; मला भावलेला एक अर्थ…

विश्वातील सर्वात प्राचिन अश्या आपल्या हिंदू धर्मात ईश्वर एकच असला तरी त्याची अनेक रुपं मान्य केली आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे मान्य करतानाच हिन्दू धर्माने, ईश्वराला सगुण साकार बनवूनही पुजलं आहे. आपला ईश्वर आपण जसा मुर्ती रुपात साकारतो, श्रद्धेने पुजतो, त्याच आणि तेवढ्याच श्रद्धेने आपण निसर्गातही देव शोधतो. ईश्वर सर्वव्यापी असून अवघे चराचर व्यापून वर दशांगुळे उरतो असं मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी, निसर्गातल्या विविध चल-अचल रूपातला ईश्वर स्विकारला त्यात नवल ते काय..! आपला ईश्वर एखाद्या सर्पाच्या रुपात असतो, एखाद्या प्राण्याच्या रुपात असतो किंवा मग अगदी एखादा रस्त्याच्या कडेला पडलेला धोंडाही असू शकतो. आपल्या धर्माने विश्वातल्या सर्व गोष्टी ईश्वराने निर्माण केलेल्या असून, त्या गोष्टीत ईश्वराचा अंश असतो असं आपण मानतो. या सर्व गोष्टीत ईश्वर शोधण्याची शिकवण आपल्या, विश्वातील सर्वात प्राचिन असलेल्या हिन्दू धर्माने दिली आहे. खरं तर ‘धर्माने शिकवण दिली आहे’ असं म्हणणं चुकीचं आहे, कारण ‘हिंदू’ हा धर्म नसून जीवन पद्धती आहे, संस्कृती आहे.. तिला ‘धर्म’ ही प्राप्त झालेली संज्ञा खुप अलीकडची आणि ती ही राजकीय गरज म्हणूण जन्माला घालण्यात आलेली आहे. या लेखात मी हिंदू संस्कृती हाच शब्द सर्वत्र वापरणार आहे.

मानवी बुद्धीच्या, आकलनाच्या पलीकडचं, ते देवाचं अशा तर्कशात्रातून आपल्या प्राचीन संस्कृतीतील देव/देवतांचा जन्म झाला आहे. धर्म ही संकल्पना अस्तित्वात येण्यापूर्वी हिन्दू संस्कृतीनंतर विविध प्रदेशात जन्म पावलेल्या इतर संस्कृतीतही, याच विचाराने त्याच्या विविध देवतांचा जन्म झाला. जगातील इतर प्राचिन संस्कृतीतील देवाच्या संकल्पनेत आणि आपल्या संस्कृतीतील देवाच्या संकल्पनेत एक साम्य म्हणजे, या सर्वांनीच निसर्गात देव पाहिला. जगातील इतर प्राचिन संस्कृती काळाच्या ओघात जन्म पावलेल्या इतर धर्मांच्या प्रभावाखाली लुप्त झाल्या, तरी हिन्दू संस्कृती मात्र आजपर्यंत टिकून राहीली. हिंदू संस्कृतीतील देवांची प्राचिन रुपं आजही कायम राहीली. आपण अवघ्या निसर्गात देव पहिला. आपण उगवत्या सूर्यात देव पाहिला, कलेकलेने लहान आणि मोठ्या होत जाणाऱ्या चंद्रात देव पाहिला. कडाडणाऱ्या विजेत देव पाहिला आणि वादळी वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पाण्यातही देव पाहिला. आकाशाला स्पर्शायला निघालेल्या उत्तुंग डोंगरालाही आपण देव मानलं आणि त्याच डोंगराचं उदर पोखरून त्यात वास करणाऱ्या सर्पालाही आपल्या संस्कृतीने देवस्वरूप मानलं. आकाशात रात्री चमकणारे तारे आपल्याला देवस्वरूप भासले, तर त्यांना झाकोळणाऱ्या मेघाला आणि सूर्य-चंद्रांना ग्रासणाऱ्या ग्राहणांनाही आपण आपल्या मनाच्या कोपऱ्यात उग्ररुपातील देवांची जागा दिली. प्रचंड मोठा हत्ती आणि हिंस्त्र वाघ- सिंहानाही देवत्व मिळालं. या सर्वांना देवत्व देण्याचं एकमेंव कारण म्हणजे त्या काळातील आपल्या पुर्वजांना त्यांच्या बद्दल वाचणारं आश्चर्य किंवा भिती. निसर्गातील सर्वच गोष्टी त्यांना अचंबित करणाऱ्या आणि त्यांच्या त्यावेळच्या बुद्धीला आकलन न होणाऱ्या असल्याने, त्या काळच्या आपल्या पुर्वजांनी त्यांना देव मानलं असावं यात नवल नाही. आजही जेंव्हा एखाद्या गोष्टीचं आकलन किंवा एखादी गोष्ट घडण्यामागचा कार्यकारण भाव कळला नाही, की आपण ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ किंवा ‘ईश्वराची लीला’ असं म्हणतोच ना? मग हज्जारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांची काय परिस्थिती असेल, याचा अंदाज आपण सहज बांधू शकतो.

आदिम काळातल्या मानवी शक्तीच्या आणि आकलनाच्या पलीकडे असणाऱ्या या निसर्गाच्या या घटकांना आणि शक्तींना आपल्या पूर्वजांनी पुढे कधीतरी त्यांना भावलेल्या/सुचलेल्या आकारात साकारून त्यांचे पूजन करण्याची सुरुवात केली, ती त्या अनाकलनीय शक्ती आपल्यावर नेहेमी प्रसन्न असाव्यात या भावनेतून. माणूस हा निरिक्षण करणारा आणि त्यातून अर्थ काढणारा प्राणी आहे आणि निसर्गात घडणाऱ्या घटनांची प्रथम भिती आणि नंतर त्यातून त्याचं जागं झालेलं कुतूहल आणि पुढं त्या कुतूहलापोटी केलेल्या निरीक्षणातून त्यांना निसर्गाची काही उलगडलेली आणि काही न उलगडलेली कोडी यांचा सुंदर मिलाफ आपल्या दैवातांमध्ये झालेला दिसेल.

असंच त्यांचं एक वर्षानुवर्षांचं निरिक्षण होतं. झाडाला कळ्या येतात, त्यांची फुलं होतात, फुलांतून फळं धरतात, फळं पिकून फुटतात आणि त्याच फळांच्या बिया जमिनीत रुजून पुन्हा त्याच जातीच्या नवीन झाडाचा कोंब जमिनीतून उगवतो आणि पुन्हा हे चक्र सुरु होतं. आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षे केलेल्या झाडांच्या या तल्लख निरीक्षणातून शेतीचा शोध लागला आणि आपल्या संस्कृतीने उत्क्रांतीची एक मोठी झेप घेतली. एका जातीच्या बिया दुसऱ्या ठिकाणी टाकल्या, तरी त्या ठिकाणी तशीच फळं देणारं झाड उगवतं, या प्रयोगातून शेती जन्माला आली, तरी असं का होतं, याचं आकलन त्या काळच्या आपल्या पूर्वजांना न झाल्याने, आधीच अनेक आश्चर्यांने देवस्वरुप मिळालेल्या निसर्गाच्या अनेक घटकांत, आता मातीचीही भर पडली आणि ती ‘भूमाता’ झाली. अपत्य जन्माच्या वेळीही अशीच काहीशी क्रिया घडते हे निरीक्षणातून आपल्या पूर्वजांच्या लक्षात आलं आणि म्हणून ‘भूमाते’ प्रमाणे स्त्रीमधेही काहीतरी अचाट शक्ती असली पाहिजे, या श्रद्धेनं आपल्या पूर्वजांनी स्त्रीलाही ‘देव’ स्वरूप मानलं. माती, मादी आणि माता या शब्दांतलं साम्य हेच तर सांगत असावं असं मला वाटतं. शेतीचा शोध लागला आणि आपले भटके पूर्वज स्थिर झाले आणि स्थिर झाल्यानं, त्यांना निरिक्षण करायलाही भरपूर वेळ मिळू लागला.

शेतीमुळे स्थिर झाल्यामुळे आता पोट भरण्यासाठी आपल्या पूर्वजांना शिकारीच्यामागे धावण्याची गरज उरली नाही आणि त्याचा उपयोग त्यांनी शेतीविषयक विचार करण्यात घालवला असावा. नांगरणी केल्याने पिक चांगलं येतं हे ही त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी ताकदवान बैलाचा उपयोग होऊ शकतो हे ही कालांतराने लक्षात आलं आणि बैलांची उपज करणारी गाय, ‘गोमाता’ म्हणून आपल्या अत्यंत महत्वाच्या देवतांच्या यादीत जाऊन बसली, ती आजतागायत. शेतीपूर्व काळात जंगलात लागणाऱ्या प्रचंड वणव्यांमध्ये मृत पावलेल्या प्राण्यांचं मांस रुचकर लागतं, हे आपल्या पूर्वजांच्या त्यावेळीच ध्यानात आलं होतं. ‘अग्नी’चा तेंव्हाच देव झाला होता. वणव्यात जळून गेलेल्या झाडांच्या जागी नविन झाडं जोमाने वाढतात हे लक्षात आलेल्या आपल्या पूर्वजांनी तोच प्रयोग शेतीतही केला, तो यशस्वी झाला. आजही आपण शेतजमिनीत भाजावळ करतो ते असंच आपल्या पूर्वजांच्या निरिक्षणातून विकसीत झालेलं शास्त्र आहे. बी रुजून येण्यासाठी पाण्याचीही आवश्यकता असल्याने ‘वरूणा’लाही देवत्व मिळालं. आजही आपली शेती बहुतांशी पावसावरच अवलंबून आहे आणि त्या पाऊस देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आजच्या आधुनिक युगात आपल्या देशात आजही यज्ञयाग होत असतात, याची बिजं अशी आपल्या प्राचिन पूर्वजांत सापडतात.

ज्यांना देव मानलं, त्यांची पुजा करण हे ओघानच आलं. मग माती, पाऊस, अग्नी, गाय यांची पुजा करणं सुरु झालं यात देवाने आपल्यावर नेहेमी प्रसन्न असावं ही भावना तर होतीच, त्याच बरोबर महाप्रलय येऊन आपलं नुकसान होऊ नये ही भावनाही असावी. आता शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचं एकत्रित दर्शन होणं आपल्या पूर्वजांना आवश्यक वाटलं असावं. त्यासाठी एखाद्या प्रतिकाचं नेहेमी समोर असणं गरजेचं वाटू लागलं असावं आणि आपल्या पूर्वजांच्या कल्पनाशक्तीने, शेतीलाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा मिलाफ केला, मिश्रण केलं आणि आपल्या देशाच्या आराध्य दैवताचा, ‘भगवान शंकरा’चा जन्म झाला. त्याची पुजा करणं सुरु केलं. आपला भारत देश आज कितीही आधुनिक झाला असला तरी आजही तो कृषीप्रधान देश म्हणूनच ओळखला जातो आणि या देशाचं आराध्य दैवत महादेव हेच आहे. पृथ्वी, अग्नी, पाणी, वारा आणि आकाश(उजेड) ह्या शेतीसाठी अत्यावश्यक घटकांना पुढे आपल्या धर्मशास्त्रांत ‘पंच महाभुतां’चं स्थान मिळालं, त्याची बिजं अशी आपल्या पूर्वजांनी लावलेल्या शेतीच्या शोधात आहेत असं मला वाटतं..

देशाच्या अष्टदिशांतील कोणत्याही गांवात गेल्यास, तिथं शंकराचं मंदीर नाही असं होत नाही. महादेवाची पुजा म्हणजे शेतीची पुजा हा त्याचा साधा अर्थ. भगवान शंकराचं अवघं स्वरुपच शेतीचं आहे. त्याचा वास हिमालय पर्वतात असतो. पर्वत हे मातीचं प्रतिक. शंकराने जटांमध्ये गंगा धारण केलीय. पर्वतातून नद्या उगम पावतात. याचा अर्थ शेती फुलवणाऱ्या त्या नद्यांचं, पाण्याचं प्रतिक. अंगाला फास लेलं भस्म आपण शेतीत करत असलेल्या भाजावळीतून निर्माण झालेल्या राखेचं प्रतिक. शंकराचं वाहन नंदी म्हणजे शेतीसाठी आवश्यक गोवंशाचं-बैलाचं प्रतिक. भगवान शंकराने समुद्रमंथनातून निघालेलं विष प्राशन केलं अशी पौराणिक कथा आहे. हे विष प्राशन करताना, त्यातील काही थेंब पृथ्वीवर पडले आणि ते साप-विंचूदी प्राण्यांनी प्राशन केले आणि ते विषारी झाले असंही ती कथा सांगते. शेतीसाठी साप हा उपकारक आहे आणि म्हणून त्याचं विष सहन करूनही शंकराने त्यांना आपल्या कांठावर गुंडाळून ठेवलाय. साप हा शेतीसाठी उपकारक असतो हे आपल्याला माहित आहे चंद्रप्रकाश वनस्पतीवाढीसाठी आवश्यक असतो असं आधुनिक विज्ञान सांगतं, तेच तर शंकराच्या जटांतील चंद्रकोर सुचवते. सर्वात महत्वाचं म्हणजे माती, पाणी, गो, सर्प, चंद्र या सर्व शेतीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा ‘संकर’, हाच ‘शंकर’ म्हणून मनुष्य रुपात आपण साकारला आणि त्याची पुजा करायला सुरुवात केली. महादेवाचं ‘शंकर’ हे नांव ‘संकर, म्हणजे मिश्रण यावरून आलं सावं, हे या दोन शब्दातलं सख्खेपण मला सुचवतंय. शंकराची पुजा म्हणजे शेतीची पुजा, शेतकर्माची पुजा, शेतकऱ्याची पुजा, दुसरं अन्य काही नसावं असं मला वाटतं. भगवान शंकर हे आपल्या प्राचिन कृषी संस्कृतीचं प्रतिक आहे. प्राचिन काळी जे आपल्या पूर्वजांनी केलं, ते आपणही अद्याप चालू ठेवलंय फक्त त्यातील अर्थ मात्र आपण विसरलोय..!

माणसानंच देवाला जन्म दिला असल्याने, देव हे माणसाचं अपत्य झालं आणि मग जे जे आपल्या जीवनात घडतं किंवा घडू शकेल, ते ते त्या देवाच्या जीवनातही घडू लागलं किंवा घडलेलं पाहाणं मनुष्याला आवडू लागलं असावं. त्यावर मग कथा रचल्या जाऊ लागल्या. शंकरही याला अपवाद कसा ठरेल? मग शंकराला पार्वती बायको म्हणून मिळाली. शंकर-पार्वतीचं प्रेम, रुसवे-फुगवे, शंकराने रागाने निघून जाणं, मग पार्वतीनं तो करणं, मनधरणी करणं, त्यावर मग शंकराने प्रसन्न होऊन वर देणं, दोघांचं फिरायला निघणं, द्युत खेळणं आदी मनुष्याच्या जीवनांत घडणाऱ्या गोष्टी, शंकराच्या जीवनातही घडू लागल्या. मनुष्य रुपात साकारलेल्या शंकराच्या जीवनात त्या काळच्या मनुष्य जीवनाचे प्रतिबिंब पडणं अगदी स्वाभाविक होतं.

शेतीरुपी महादेवाचं लग्न करायची वेळ आली आणि त्यासाठी माणसाने बायको मुक्रर केली, ती पार्वती. पार्वती ही हिमालयाची कन्या. हिमालय हा पर्वत आणि पर्वताची मुलगी ती पार्वती. पार्वतीचा मुलगा तो गणपती. गणपती हा फक्त पार्वतीचा मुलगा होता, शंकर-पार्वतीचा नव्हे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. शंकर-पार्वतीचा मुलगा कार्तिकेय(याच फक्त इथे उल्लेख केलेला आहे कारण आपल्या लेखाचा तो विषय नाहीय), गणपती नव्हे. गणपती जन्माची कथा सर्वांनाच माहित आहे. पार्वती आंघोळीला बसली असता, कुणी येऊ नये म्हणून पार्वतीने आपल्या अंगावरील मळापासून एक मुलगा बनवून पाहाऱ्यावर ठेवला. पुढे शंकर तिथे येतो, त्याला तो मुलगा रोखतो, शंकर रागाने त्याची मान उडवतो आणि मग पार्वतीच्या हट्टाने त्या मुलाला हत्तीचं डोकं लावतो आणि गणपती जन्मतो अशी काहीशी ती कथा.

आई आंघोळ करत असता तिथे प्रत्यक्ष तिच्या पतीला, म्हणजे शंकरालाही प्रवेश न देणारा पार्वती ’माते’चा पुत्र म्हणून गणपतीची आपल्याला पहिल्यांदा ओळख होते. पार्वतीने स्नानास बसण्यापूर्वी तीच्या अंगावरील मळापासून श्रीगणेशाची बालमूर्ती घडवली हा या कथेचा सुरुवातीचा भाग. लहानपणी आश्चर्याची वाटणारी ही गणेश जन्माची कहाणी पुढे मोठेपणी प्रश्न म्हणून समोर उभी राहिली आणि पहिला प्रश्न पडला तो असा, की एखाद्या लहान बाळाइतकी मुर्ती घडवायची झाल्यास पार्वतीच्या अंगावरील किती मळ लागला असेल आणि त्यासाठी पार्वती किती वर्ष आंघोळीवाचून राहिली असेल हा..! पुढे कुठेतरी वाचनात आलं, की ही कथाही शेतीचं माहात्म्य सांगणारी आहे. शंकर जसा शेतीचं प्रतिक आहे, तशीच ही कथा शेतीला आवश्यक त्या सर्व घटकांचं प्रतिनिधीत्व करणारी आहे. ‘पार्वती’ ही हिमालयाची म्हणजे ‘पर्वता’ची कन्या आणि अर्थातच पर्वत कन्येच्या अंगावरील मळ म्हणजे ‘माती’ हे थोडासा विचार केला तरी आपल्या लक्षात येईल. पार्वती स्नानाला बसलीय याचा अर्थ पावसाळा सुरु झालाय आणि पावसामुळे मऊ झालेल्या मातीपासूनच मूर्ती/प्रतिमा तयार करता येते. तेच तर तिने केलं आणि श्री गणेशाचं पूर्व स्वरुप तयार झालं. पावसामुळे चिखल झालेल्या मातीला ‘गारा’ असाही एक शब्द आहे. माती आणि पाणी एकत्र करून जो मऊशार चिखल कुंभार बनवतात, त्याला ‘गारा’ असं म्हणतात हे संत गोरा कुंभारांच्या कथेत वाचलेलं मला आठवतं. पावसामुळे तयार झालेल्या मऊशार ‘गारा’पासून पार्वतीने ज्या बालप्रतिमेला जन्म दिला म्हणून ‘गारा’ शब्दापासून पार्वती ‘गौरी’ झाली असणं शक्य आहे. गणेशोत्सवात म्हणून तर गौरीचं महत्व..! गौरी म्हणजे माती, पावसामुळे चिखल झालेली आणि पेरणीस योग्य अशी शेतजमीन. तीच गौरी, तिच पार्वती..! गणपतीत गौरीपुजनाला सारखंच महत्व का दिलेलं आहे, हे यावरून लक्षात येईल आणि गणपती मातीचा का असावा हे ही कळेल.

आता गणपतीच्या स्वरूपाकडे बघू. गणपतीचं मुख ‘हत्ती’चं आहे आणि ‘हत्ती’ हे आपल्या संस्कृतीत पुर्वापार काळापासून समृद्धीचं प्रतिकं मानलं गेलं आहे. ही समृद्धी शेतीतून, पिक-पाण्यातून निर्माण झाली आहे. इथं हत्ती शाकाहारी आहे लक्षात घेणं आवश्यक आहे. शाकाहारी असुनही तो प्रचंड मोठा, बुद्धीमान आणि ताकदवानही आहे. म्हणून गणपतीचं मुख हत्तीचं. आज जरी लोक मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या बाळगत असले, तरी दारी हत्ती झुलणे म्हणजेच श्रीमंती ही आजही मराठी जणांची श्रीमंतीची कल्पना आहे ती त्यामुळेच. गजान्तलक्ष्मी हा शब्दप्रयोग उगिच नाही आला.

गणपती ‘एकदंत’ आहे. त्याचा एक दात तुटलेला आहे आणि तुटलेला तो दात त्याने त्याच्या एका हातात धारण केलेला आहे. नीट निरिक्षण केलं, तर हा तुटलेला दात दिसतो ‘नांगरा’सारखा; नव्हे त्याचा अर्थ ‘नांगर’असाच आहे. गम्मत म्हणजे कन्नड भाषेत ‘नांगर’ व ‘दात’ याला ‘कोळ्ळ’ किंवा ‘कोळ्ळु’ हा एकच शब्द आहे हे कृ. पां. कुलकर्णींचा मराठी व्युत्पत्ती कोष सांगतो. पेशवाईत एखाद्या गावाला शिक्षा म्हणून त्या गांवावरून ‘गाढवाचा कोलु’, म्हणजे गाढवाचा नांगर फिरवायचे ही गोष्ट मी शाळेत असताना वाचलेली मला या निमित्ताने आठवली. ज्यांचा जन्म सन १९६५ च्या आगेमागे झालाय, त्या सर्वांना हे आठवत असेल.

कोकणात गणपतीला इतर कोणतही, अगदी सोन्या-चांदीच डेकोरेशन केलं गेलं तरी त्याच्या डोक्यावर टांगलेली लाकडी मंडपी आणि त्यात केलेली तेरडा, कांगणी, कवंडाळं, सोनतळ, तेरवाड इत्यादी पावसाळी पाना-फुलांच्या मांडणीला अतोनात महत्व आहे. त्याच्या डोक्यावरील मंडपित विराजमान होण्याचा हक्क केवळ पावसाळ्यातच उगवणाऱ्या या रानफुले-फळांचाच. गणपतीला ‘दुर्वा’ आवडतात..दुर्वा आणि डोक्यावरील मंडपित लावलेली रानटी पाने-फुले हे पावसामुळे शेतीतून उगवलेल्या ‘धान्या’चं आणि त्यातून येणाऱ्या ‘धना’चं प्रतिक आहे. ‘धन-धान्य’ हा समृद्धीदर्शक शब्द आपल्या कृषिसंस्कृतीतूनच उगम पावलाय असं म्हणायला हरकत नाही.

गणपतीचं वाहन ‘उंदीर’. उंदीर हा पिकाचा क्रमांक एकचा शत्रु. या उंदराला गणपतीने वाहन म्हणून निवडलं असून त्यावर त्याचे पूर्ण नियंत्रण आहे. हे वाहन आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून त्याने कमरेला सर्पही गुंडाळलेला आहे. ‘उंदीर’ आणि ‘साप’ या प्रतीकांतून पिकाचं रक्षण करण्याची हमी गणपतीने भक्ताला दिलेली आहे. गणपतीच्या पूजनातून सर्पपुजनही अपेक्षित आहे.

गणपतीचं ‘लंबोदर’ असणं दर्शवतं की विश्वाची उत्पत्ती त्याच्या उदरातून झालेली आहे..माझ्या भक्ताचं पोट सदैव भरलेलं राहो हेच ‘लंबोदर’ सुचवतो..त्त्याच्या हातांत पाश, अंकुश आहे..तो भक्ताला उपभोग घे अस ही सांगतो परंतू उपभोगावर ‘अंकुश’ही असावा असेही गणपती आपल्याला सुचवतो..शेतीची, धरीत्रीची पुजा करा. ‘माते’ला आणि ‘माती’ला सांभाळा, तीचा आदर करा असा संदेश देणारा श्रीगणेश आपला लाडका असल्यास नवल ते काय?

अश्या शेतीचक्राचं मुर्तीमंत प्रतिक असणाऱ्या शंकर, पार्वती आणि गणपती या कुटुंबाचा अर्थ मला मानापासून भावलाय. हा अर्थ मला अनेक महानुभवांनी रचलेल्या ग्रंथांच्या वाचनातून गवसला आहे. शंकर-पार्वती-गणपती ह्यांचं पूजन म्हणजे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या माती, पाणी, अग्नी, वारा आणि आभाळ यांचं प्रतिक रुपातलं पूजन..आपल्या प्राचिन पूर्वजांनी साकारलेलं हे सृजनाचं प्रतिक आपण आजही मनोभावे पुजतोय, मात्र त्यामागची मुळ पवित्र भावना आपण हरवून बसलोय. ती सर्वांना कळावी, शेती व शेतकरी यांचं महत्व सर्वांना कळून शेती उत्तम, व्यापार मध्यम व नोकरी कनिष्ठ ही उतरंड आपल्या समाजात पुन्हा प्रस्थापित व्हावी या साठी हा लेखन प्रपंचं..

आपले सर्व मोठे आणि महत्वाचे सण पावसाळ्यात येतात, याला काही अर्थ आहे. पावसाचं महत्व आजही आपल्यी देशात कायम आहे.

हा लेख खरं तर एका पुस्तकाचा विषय आहे. शेतीला पुरक असलेली मातृसंस्कृती, कुटुंब व्यवस्था, मातृसंस्कृतीवर झालेले पुरुष संस्कृतीचे आक्रमण, नांगरामुळे शेती उत्तम होते हे लक्षात येणं आणि तशीच क्रिया अपत्य जन्मापूर्वीही घडते हे लक्षात येऊन पुरुषाला मिळालेलं महत्व, हे सर्व विषय आनुषंगीक असुनही जागेची मर्यादा लक्षात घेऊन मांडता आलेले नाहीत. शंकर-पार्वती-गणपतीची माहितीही शक्य तितक्या कमी शब्दांत लिहायचा प्रयत्न केला आहे, आपल्याला तो नक्की आवडेल असा विश्वास आहे.

आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा..!!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..