नवीन लेखन...

मियां मल्हार

आपल्या रागदारी संगीतात, परंपरेला अतिशय महत्व आहे आणि त्यानुरूप जे संकेत निर्माण झाले आहेत, त्यांची जीवापाड जपणूक करण्याची तोशीस केली जाते. मग, त्यात रागाचे समय, ऋतूप्रधान राग इत्यादी वर्गीकरणे अंतर्भूत होतात. शास्त्रानुसार अभ्यास करायला गेल्यास, शास्त्रात खरेतर, कुठल्याही रागाचा “समय” असा दिलेला नाही तसेच ऋतूप्रधान राग, असे वर्गीकरण केलेले नाही परंतु सुरांचे साद्धर्म्य जाणून घेऊन, असे अनेक संकेत जन्माला आले आहेत. तसे बघितले तर स्वरांच्या देवता, स्वरांचे रंग इत्यादी वर्णने वाचायला मिळतात पण, या सगळ्यांचा “मूलाधार” अखेर संकेत, या शब्दापाशी येउन ठेपतो. सुरांचे, मानवी भावनांशी अतिशय जवळचे नाते असते आणि याच भावनांची जोड, अशा प्रकारच्या वर्गीकरणात झाली.
मियां मल्हार राग, याच स्वरूपाचा आहे. या रागाची उत्पत्ती तानसेन पासून सुरु झाली असे मानण्यात येते आणि त्यातूनच तानसेन आणि त्याच्या दंतकथा प्रसृत झाल्या. अर्थात या कुठल्याच गोष्टींना कसलाच शास्त्रीय आधार नसल्याने, त्याबद्दल अधिक लिहिणे योग्य नाही.
दोन्ही गंधार, दोन्ही  निषाद, आणि दोन्ही मध्यम, हे स्वर या रागाची खरी ओळख पटवून देतात. सगळे सूर या रागात उपयोगात येत असल्याने, रागाचा विस्तार प्रचंड प्रमाणात होतो. दोन्ही मध्यम जितक्या प्रभावी मांडता येतात, तितके या रागाचे रूप खुलून येते. खरतर मध्यम, रिषभ आणि पंचम या स्वरांचे चलन, इथे महत्वाचे ठरते.
      “निळावले मन, निळावले तन
       निळावले नवनीत घटांतून
निळ्या वेळूंतील शीळ निळी सखी, निळा उरांतला पीळ.
       निळ्या निळ्या प्राणांतील ज्योती
       निळी निळी डोळ्यांतील मोती
घननिळाच्या निळ्या गालिंचा निळा निळा मी तीळ”.
कवी बा.भ.बोरकरांच्या या “निळाईत” आपल्याला मल्हाराचे ललित आणि काव्यात्मक रूप सहज आकळून घेत येते. “घननिळाच्या निळ्या गालिंचा” या शब्दांतून तर याचा मल्हार रागाचे सूचन व्यक्त होते.
उस्ताद अली अकबर साहेबांनी वाजवलेला मियां मल्हार म्हणजे संतत धारांचे असामान्य नृत्य. सगळी रचना, केवळ आलापी आणि जोड इतकीच आहे.एकतर सरोद्सारखे अंतर्मुख करणारे वाद्य त्यात, या रागाचे धीरगंभीर स्वरूप!! वास्तविक आपल्या मनात उगीचच मियां मल्हार म्हटलं की पावसाच्या घनघोर धारा आणि तांडव, असे एक चित्र डोळ्यासमोर येते परंतु, या चित्राच्या नेमकी उलट अवस्था उस्तादांनी काय अप्रतिम वाजवली आहे. सुरवातीपासून, प्रत्येक सूर अतिशय स्पष्ट, रेखीव वाजवला आहे. त्यामुळे स्वरांचा “मझा’ घेता येतो. ज्यांना, स्वरज्ञान नाही, त्यांना देखील, रागातील कोमल स्वर कुठले, याचा सहज अंदाज घेता येतो.
सरोद खरेतर तंतूवाद्य, परंतु अशा वाद्यावर उस्तादांनी अशी काही हुकुमत ठेवली आहे की, ऐकताना आपल्याला, वादनातील “गायकी” अंग सहज कळून घेता येते. तंतूवाद्यांवर “गायकी” अंग  वाजवणे,हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. वाद्यातून सलगता निर्माण होणे शक्यच नसते परंतु खंडित सुरांतून “मींड” काढायची, हे खरच अति अवघड काम असते आणि इथे उस्ताद अली अकबरांनी हे काम अतिशय लीलया केलेले आहे. जरा बारकाईने ऐकल्यावर, एका सुरावरून दुसऱ्या सुरांवर जो “प्रवास” घडतो, ते ऐकणे खरोखरच चिरस्मरणीय आहे. या वादनात, सूर बोलके होत आहेत. वास्तविक, स्वरांना स्वत:ची अशी भाषा नसते परंतु कलाकार, त्यात दडलेली “भाषा” शोधून काढतो.
तबलानवाज म्हणून उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव जगात गाजलेले आहे. परंतु त्यांनी, चित्रपट संगीताच्या क्षेत्रात फारसे योगदान दिलेले नाही. त्यांनी ज्या थोड्या चित्रपटांना संगीत दिले, त्यात “साझ” चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. अर्थात त्यांनी या चित्रपटात काही अप्रतिम गाणी दिली आहेत. त्याच चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे आहे. “बादल घुमड बढ आये” या गाण्यात आपल्याला या रागाची “छटा” ऐकायला मिळेल.
“बादल घुमड बढ आये,
काली घटा घनघोर गगन मे
    अंधियारा चहु ओर
धन बरसत उत्पात प्रलय का
     प्यासा क्यू मन मोर
बादल घुमड बढ आये”.
गाण्याची चाल एका अप्रतिम तानेने होते. अगदी पूर्ण सप्तकी तान आहे. ही तानच इतकी अवघड आहे की, पुढे गाणे कशाप्रकारे विस्तारणार आहे, याची कल्पना येते. तीनतालात बांधलेले गाणे, अतिशय द्रुत लयीत आहे. या गाण्यात, इतर गाण्याच्या वेळेस, सुरेश वाडकर जसा आवाज लावतो, तसा नसून, रियाज करून घोटवलेला आवाज लावलेला आहे. अर्थात, असे सगळे गाताना, गाण्याची बंदिश होण्याचा एक धोका असतो आणि तो इथे पूर्णपणे टाळलेला आहे.  गाण्याच्या शेवटी, गायकाने ” चक्री” तान इतकी सहज घेतली आहे की ऐकताना, आपण देखील गाण्यात संपूर्ण गुंगून जातो. अखेर, संगीताचा मुख्य उद्देश तरी काय असतो ?? कलाकाराने मांडलेल्या सांगीतिक कलाकृतीत, रसिकाला हरवून जाण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आणि त्या पातळीवर हे गाणे नि:संशय अप्रतिम अनुभव देते. या गाण्यात मात्र, मियां मल्हार रागाचे जे प्रचलित रूप आहे – प्रचंड सोसाट्याचा वारा आणि घनघोर पाउस, याचे मूर्तिमंत दर्शन ऐकायला मिळते.
आता याच रागात मेहदी हसन साहेबांची अशीच अशीच एक अमूर्त रचना बांधली आहे. मेहदी हसन म्हणजे गझल गायकीत स्वत:चे स्वतंत्र घराणे निर्माण करणारी गायकी. गझल गायनाचा तोंडावळा पूर्णपणे बदलून टाकून, रागदारी संगीताची “कास” धरून तरीही, रागदारी गायन बाजूला सारून, संपूर्ण वेगळ्या धाटणीची गायकी इथे रुजवली. अत्यंत मुलायम आवाज, सगळ्या सप्तकात हिंडणारा आवाज. अर्थात, तरीदेखील, मंद्र सप्तकात खानसाहेबांची गायकी खऱ्याअर्थी  खुलून येते. चाल बांधताना, रागाच्या स्वरांचा आधार घ्यायचा, परंतु रागाचे  रसिकांना करून द्यायची, असा या गायकीचा सगळा कारभार असतो. “एक बस तू ही नहीं” हीच ती गझल.
“एक बस तू ही नहीं मुझसे खफा हो बैठा
मैंने जो संग तराशा वो खुदा हो बैठा”.
दादरा तालात बांधलेली रचना, अगदी सुरवातीपासून या रागाची छाप आपल्या कानावर येते. मेहदी हसन, नेहमीच रचनेची सुरवात अतिशय संथ, खर्जाच्या सुरांत करतात पण तो जो खर्ज असतो, तोच अति विलक्षणरीत्या आपल्या मनाचे पकड घेतो. गाण्याच्या  “,जिसे बस खफा हो बैठा” इथे “हो” शब्दावर किंचित “ठेहराव” घेतलेला आहे आणि तो खरोखरच असामान्य आहे. जणू रागाची सगळी वैशिष्ट्ये त्या एका सुरांत एकवटली आहेत!! उत्तम  श्रीखंडात हळूहळू केशर कांडी विरघळत जावी त्याप्रमाणे इथे गायकी, त्या शायरीच्या अनुरोधाने आपल्या मनात उतरत जाते. या गायकीचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे, रचनेच्या बंधात समजा एखादा शब्द बसत नसेल तर तेव्हढ्यापुरते चालीला वेगळे वळण देण्याची किमया, या गायकाने असामान्य प्रकारे साधलेली आहे.
मराठीत अर्थगर्भ गाणी तशी भरपूर सापडतात. याच यादीत “जन पळभर म्हणतील हाय हाय” हे गाणे निश्चित अंतर्भूत करावे लागेल. भा. रा तांब्यांची अप्रतिम कविता आणि त्याला तितकीच अर्थवाही अशी वसंत प्रभूंची चाल आणि लताबाईंचे गायन. यामुळे हे गाणे संस्मरणीय झाले आहे. तांब्यांच्या कवितेत, नेहमीच एकप्रकारचा राजसपणा आणि गेयता आढळते. कवितेतील शब्द आणि त्याची “जोडणी” यात, सहज आणि उस्फुर्त अशी लय असते. शब्दातील अंतर आणि त्यातून  खटके, हे सगळेच फार विलोभनीय असते. वसंत प्रभूंच्या चाली या, बहुतांशी अत्यंत श्रवणीय आणि शब्द्वेधी असतात, त्यामुळे, त्या लगेच रसिकांच्या मनाची पकड घेतात. चाल सहज गुणगुणता येण्यासारखी असते.
” जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय? “
कवितेच्या मुखड्यामध्येच प्रश्नार्थक वाक्य लिहून, तांब्यांनी रसिकांना एकप्रकारे कोडे टाकले आहे आणि  सगळी कविता या प्रश्नाभोवती घुटमळत असते.
या गाण्याची एक गंमत बघण्यासारखी आहे. कवितेचा आशय बघता आणि मियां मल्हारचा स्वभाव बघता, या गाण्यात, या रागाची “पाळेमुळे” सापडण्याची शक्यता सुतराम वाटत नाही. तरीदेखील, हे गाणे याच रागावर आधारीत आहे. अगदी पावसाळा झाला तरी मानवी आयुष्यात अंतर्मुखता, व्याकुळता, विरही भावना अस्तित्वात नेहमीच असतात. अर्थात, रागातून अशी नेमकी भावना अचूक शोधायची, हा संगीतकाराचा अप्रतिम आविष्कार. इथे आणखी एक मजा बघूया. वरती, आपण मेहदी हसन यांच्या रचनेतील ” जिसे खफा हो बैठा” या ओळीची चाल बघा आणि या गाण्यातील “पळभर म्हणतील हाय,हाय” या ओळीचे स्वर ऐका आणि या गाण्याची चाल कशी मियां मल्हार रागावर आधारित आहे, हे समजून घेता येईल.
कवी आणि संगीतकार मनोहर कवीश्वर यांनी या रागावार आधारित अतिशय सुंदर अशी रचना केली आहे आणि सुधीर फडक्यांनी आपल्या रसाळ सुरांत ती रचना कायमची अजरामर करून ठेवली आहे.
“माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा;
भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा”.
सुधीर फडके, कवितेतील आशय जाणून, गाताना शब्दोच्चार कसा करतात, ते या गाण्यात खास ऐकण्यासारखे आहे या गाण्यात “मल्हार” अगदी सरळ ऐकायला, गाण्याच्या पहिल्या सुरांतून ऐकायला मिळतो. कवितेतील काहीसा उदास स्वर, रचनेतून देखील तसाच स्त्रवत आहे आणि तोच धागा गायनातून विणलेला आहे.
मराठी चित्रपट “वरदक्षिणा” मध्ये “घन घन माला नभी दाटल्या” हे गाणे म्हणजे मूर्तिमंत “मल्हार” राग आहे. माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेला मल्हार, स्वररचना आणि गायनातून आपल्या मनावार सतत संतत धार धरून असतो.
“घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा;
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा”.
संस्कृत साहित्यातील मोर आणि पावसाचे जे अतूट नाते अनुभवायला मिळते, त्याच प्रतीकाची इथे या गाण्यात सांगड घातली आहे आणि कविता म्हणून लगेच रचनेला “वजन” प्राप्त होते. वास्तविक, मन्ना डे हे बंगाली गायक, सगळी कारकीर्द प्रामुख्याने बंगाली आणि हिंदी गाण्यांत गेलेली तरी देखील संगीतकार वसंत पवारांनी, गायकाच्या गळ्याची ताकद ओळखून ही रचना मन्ना डे यांना गायला दिली आणि गायकाने गाण्याचे सोने केले.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..