नवीन लेखन...

मेरा भारत महान?

मला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी, मी या लेखात व्यक्त केलेल्या मतांवर स्वत:शी संवाद केल्यास आणि नंतर माझ्याशी वाद घातल्यास मला अधिक आवडेल.

मेरा भारत महान?
फिलहाल नही, पर हो जरूर सकता है..

आज देशाचा स्वातंत्र्य दिन. देश स्वतंत्र होऊन आज ७१ वर्ष पूर्ण झाली. सन १९४७ साली देश स्वतंत्र होताना आपण देशाची अखंडता आणि विविधतामे एकता राखण्याची शपथ घेतली असेल किंवा तसा संकल्प सोडला असेल. तसं आपण दरवर्षी ही शपथ घेतोच. आज पुन्हा ७२व्यांदा तशी शपथ घेऊन संकल्प सोडू आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून आपापल्या जाती-धर्माच्या संम्मेलनात, महासंम्मेलनात, मोर्चात, सभांत किंवा अगदी गेला बाजार ज्ञातीवर्धक मंडळाच्या वळचणीला जाऊन कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ याची हिरीरिने चर्चा करु. वेळ पडलीच तर रस्त्यावरही उतरू, नासधुस करू वैगेरे वैगेरे. हे सर्व २६ जानेवारीपर्यंत चालू राहील. २६ जानेवारीचे २४ तास उलटले, की पुन्हा आपण आपल्या जाती-धर्माच्या कोषात बंदीस्त. हेच चक्र गेली ७१ वर्ष सुरू आहे. पुढेही हेच चालू राहाणार यात शंका नाही. त्यात निवडणुकांच्या आसपासचा स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन असेल, तर देशभक्तीचे नियोजित २४ तास संपले, की पुन्हा जाती-धर्माचा उन्माद अंमळ जास्तच आपल्या अंगात भिनत जातो..

जाती-धर्माचा आपल्या अंगात भिनलेला उन्माद पाह्याल्यावर मला आपलं पारतंत्र्य आठवलं. आता माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला, त्यामुळे १९४७ पुर्वीच्या पारतंत्र्यात नेमकी काय परिस्थिती होती, हे मला समजणार नाही. परंतु जे काही थोडं-फार कळलं, ते लहानपणीच्या शालेय पुस्तकातूनच. परंतू नंतर नंतर माझ्या वाचनातून आणि अलीकडे मुंबई शहराचा अभ्यास करताना माझ्या वाचनात आलेल्या एतद्देशीय लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांतून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत गेली, ती म्हणजे स्वातंत्र वैगेरेशी त्या काळच्या सामान्य लोकांचं फारसं काही देणं-घेणं नसावं. याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांनी इथल्या जनतेला दिलेलं धार्मिक आणि जातीय स्वातंत्र्य. ब्रिटिशांनी इथल्या देवा-धर्मात फारशी ढवळाढवळ केली नाही. किंबहुना धर्मप्रसारासाठी म्हणून हिंदुस्थानला आलेली ख्रिश्चन मिशनऱ्यांची जहाजं त्यांनी मुंबईच्या किनाऱ्यालाही लागू दिली नाहीत. कारण आपापल्या प्रथा-परंपरात मग्न असलेल्या त्याकाळच्या हिन्दुस्थानात चाललं होतं, ते त्यांच्या पथ्यावरच पडणारं होतं. जो पर्यंत लोक त्यांच्या जाती-धर्म व्यवस्थेत मग्न आहेत, तो पर्यंत आपल्याला धोका नाही, हे ब्रिटिश पक्के जाणून होते. मला शाळेत वाचलेलं आठवतंय की, १८५७ सालच्या स्वातंत्र्य संग्रामामागची सैनिकांची प्रेरणा काय असेल ती असो, त्याची ठिणगी पडली होती ती मात्र काडतुसांना लावलेल्या गायीच्या आणि डुकराच्या चरबीच्या आवरणामुळे. त्यामुळे धर्मभ्रष्ट झाल्याची भावना हिन्दू-मुसलमान सैनिकांमधे पडली आणि मग पुढचं सर्व घडलं, तो पर्यंत पलटणींत सर्व आलवेल होतं..!

मी हे का सांगतोय, तर स्वातंत्र्यानंतरही देशी राज्यकर्ते एक्झॅटली ती ब्रिटिशांचीच नीती अंगिकारून राज्य करताहेत, म्हणून. फरक पडलाच असेल तर, ब्रिटिशांनी धर्म-जातीत काही क्रूर प्रथा बंद करण्यापलिकडे थेट हस्तक्षेप केला नाही; स्वतंत्र भारतातले राज्यकर्ते मात्र जाती-धर्माची कास उघडपणाने धरताना दिसताहेत. आपल्या बगलबच्च्यांना तसं करण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसताहेत. दिवसेंदिवस जाती-धर्मांचे रंग जास्त गडद होताना दिसतायत, त्याचा आपल्याला गर्व-अभिमानही वाटू लागलाय आणि हे आपल्यासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठीही धोकादायक आहे, हे आपण विसरत चाललोय. भितीदायक आहे ते हेच. सत्तेसाठी स्वत:चे जाती धर्म जोपासणारे सर्वपक्षीय नेते मला भगवान विष्णूच्या मोहिनी अवतारासारखे वाटतात. त्यांच्या प्रमाणे जर आपण वागलो, तर आपण भस्मसात होणार हे नक्की. आणि अवतार पुन्हा शेषशायी विष्णूसारखा लक्ष्मीच्या सहवासात पुढची पाच वर्ष निवांत पडून राहाणार, हे सर्व जनता जाणते आणि तरीही या दगाबाज पुढाऱ्यांच्या कच्छपी लागते, हे सर्व न समजण्याच्या पलिकडचं आहे.

आणि देशाच्या अखंडतेविषयी काय बोलावं..! अखंडतेची महानता (फक्त)भाषणांतून ऐकण्याची उद्याची ७२वी वेळ. उद्या अखंड भारत ‘बनवण्या’चा संकल्प आपण ७२व्या वेळी सोडणार. जाती-धर्मात दुभंगलेली जनता पाहून, ‘संकल्प सोडणे’ या शब्दप्रयोगाचा बहुतेक आपण शब्दंश: अर्थ घेतलाय, असं सर्व काही सोडलेलं बघून म्हटलं तर चुकू नये असं वाटण्यासारखी सारी परिस्थिती आहे. म्हणायला आपण चार भौगेलिक सीमा असलेला अखंड देश आहोत, पण आतून मात्र दुभंगलेलो, तिभंगलेलो आहोत. जाती-धर्माने आपल्या प्रत्येकात अदृष्य, परंतू सोशल मिडियात स्पष्टपणे दृष्य असलेल्या भिंती उभ्या केल्या आहेत. जो तो जास्तीत जास्त जातीवादी-धर्मवादी कळपांत जाण्यासाठी धडपडतोय. ‘माझा भारत कळपांचा देश आहे’ असं म्हटलं तर चुकू नये. त्या कळपांतही पुन्हा अंतर्गत कळप आणि कळप नायक आहेतच. जो तो आपल्या कळपाचं अस्त्तित्व त्याला ‘जात्या’च लाभलेल्या न्युसन्स पाॅवरचा उपयोग करुन जाणवून देण्यात मशगूल आहे. ‘अखंड भारत’, ‘एकात्म भारत’ किंवा ‘देश प्रथंम’ ह्या फक्त ट्रकांच्या मागे लिहिलेल्या आणि टायरांचा चिखल उडून चिखलाने बरबटलेल्या ‘मेरा भारत महान’सारख्या भाषणातल्या घोषणा म्हणून उरुन राहील्या आहेत.

हे चित्र बदलू शकतं का, तर याचं उत्तर होय असं आहे. ह्यासाठी फक्त एकच निर्धार करावा लागेल, तो म्हणजे अगदी या क्षणापासून कोणत्याही जाती-धर्माच्या, अगदी स्वत:च्याही, आहारी न जाणं. कठीण आहे, पण अशक्य बिलकूल नाही. देश म्हणजे काही हाडामांसाची व्यक्ती नसते. देश ओळखला जातो, तो देशवासीयांमुळे. देशवासी जर एकमेंकाला धरून असतील, अभंग असतील, तरच देश अखंड राहातो. आपल्यातला तीव्र होत जाणारा जातीभेद पाहून परकीय लोक आपल्याला हसत असावेत आणि कदाचिक हा जातीभेद अधिक कडवा व्हावा यासाठी प्रयत्नही करत असावेत. आपले लाचार पुढारी त्यांच्या त्या कृष्णकृत्यात सहभागी असावेत, असं म्हटलं तर फार काही चुकू नये. सरडाछाप पुढाऱ्यांचा हा कावा ओळखून, त्यांना आपल्यात जाती-धर्माचे निर्माण केलेले मनभेद गाडून आणि एकजुटीने ‘भारतीय’ म्हणून उभं राहाण्याचा निर्धार जरी आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी केला, तरी खऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं असं म्हणता येईल.

“आजपासून कोणत्याही जाती वा धर्माधारीत संस्था किंवा संघटना किंवा पक्षाशी मी कोणताही संबंध ठेवणार नाही. माझी जी काही बांधिलकी अाणि निष्ठा असेल, ती मी माझ्या भारतीय समाजाशी आणि देशाशी ठेवेन” अशी शपथ आपल्यापैकी प्रत्येकाने घेऊन निग्रहाने तसं वागावं लागेल. तर आणि तरच हा देश अभंग राहू शकतो. तसा तो सैन्याच्या जीवावर अभंग राहीलही, परतू मग आपल्याला ‘अखंड आणि एकात्म देश’ ही व्याख्या लागू होणार नाही. सर्व पंक्षीय नेत्यांनी अंगिकारलेली फोडा आणि झोडा ही निती ओळखून आणि केवळ आणि केवळ देशहिताला प्राधान्य देऊन वागण्याचा निश्चय आजच्या दिवशी आपण करूया, एवढीच विनंती आजच्या स्वातंत्र्य दिनी करू इच्छितो..!!

“दिन दूर नहीं मनभेद मिटायेंगे, खुद को पुन: अभंग बनाएँगे ।” यह हो सकता है, बस हमे हमकदम होकर कदम बढाने होगे..! तब ही भारत महान बन सकता है..!!

-©️नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..