नवीन लेखन...

माझा चड्डीयार – भाग- २

आज जेंव्हा ज्येष्ठ नागरिक ह्या जीवनाच्या वळणावरुन मी माझ्या बालपणाकडे बघू लागलो, तेंव्हा आश्चर्याचे अनेक प्रसंग, धागे, व गुंता समोर येऊ लागला. ६५ वर्षापुर्वीचा काळ. एकीकडे बालमन, जे सरळ, साध्या, आणि नैसर्गिक घटनामध्ये व्यस्त होते. त्याच वेळी सभोवतालची वडीलधारी मंडळी यांचे संस्कारमय विचार, ह्या दोन्हीचा संघर्ष मी त्या वयांत अनुभवला. विजय होत गेला तो बालमनाचा. ज्यात होती एक प्रचंड व विलक्षण जिद्द, हट्ट, लपलेल्या अज्ञात अधिकाराची जाण, उगवत्या सुर्याचे अल्हाद वाटणारे तेज,  परंतु थोड्याच वेळानंतर चमकणार, तेजाळणार, ही जाणीव.

तसा मी भावंडामधील लहान.परंतु academic currier च्या द्दष्टी कोनातून वरच्या पायरीवर सतत असे. तथाकथीत हूशार विद्यार्थी. वर्गामध्ये नेहमी प्रथम क्रमांक टिकवून ठेवणारा. त्यामुळेच कदाचित् माझ्या ईच्छेला, विचाराला, भावनेला महत्व दिले जात असल्याची, मला देखील जाणीव झालेली होती. वडील माझ्यावर खुप प्रेम करायचे. आणि इतर भावंडापेक्षा मी त्यांचा फार लाडका होतो.

“ कोण बा तुला सांगणार ?  तुला बोल लावणार ?  “    ही मजसंबंधी टोमणेयुक्त भाषा सतत इतर भावंडाकडून बोलली जायची.

मला आजही तो दिवस चांगला आठवतो. वडीलानी केलेला प्रेमळ उपदेश व मार्गदर्शन. ज्यांत रुजली होती एका वेगळ्यांच दिशेची वाट. मी सहावी ही इयत्ता प्रथम क्रमांक मिळवून पास झालो होतो. वडीलाना पेढा देण्यास गेलो. ते म्हणाले   “   छान. एकदम आनंद वाटला. अशीच प्रगती सतत करीत रहा. एखादी गोष्ट मिळवणे जसे समाधान कारक असते, त्यापेक्षा ते यश टिकवणे फार गरजेचे राहते. सतत योग्य प्रयत्न, जिद्द, चिकाटी  व स्वभावामधला समजूतदारपणा, जीवनाला यशस्वी करतो. “

ते थांबले व पुन्हा सांगु लागले  “  एक प्रयत्न कर. एक दोन चांगल्या मित्रांची सतत संगत असावी. ते हूशार, समजदार व अभ्यासू वृत्तीचे असावे. अशांचा विश्वास संपादन करावा. आणि सांघीक पद्धतीने अभ्यास व्यायाम व खेळणे ह्यावर मन केंद्रीत करावे. यश निश्चीत मिळते. ”  वडीलांचा हा उपदेश मी मनांत पक्का कोरुन ठेवला होता.

मला तो दिवस चांगलाच आठवतो. घरा जवळ एक शाळा होती. व तेथे एक मोठे मैदान होते. संध्याकाळी मी रोज तेथे खेळण्यास जात असे. एक वयस्कर मुलगा  सर्व समवयीन मुलांचे गट करुन त्यांच्याकडून हूतूतू, आट्या पाट्या, खो खो हे देशी खेळ खेळऊन घेत असे. तो फक्त मार्गदर्शन करी. वयाच्या मानाने मी खूप लठ्ठ होतो. त्यामुळे खेळण्यातील चपळायी वा चैतन्यमय हलचाली याला कमी पडत होतो. खेळण्यातील एक Back Footed विद्यार्थी म्हणून माझ्या गटात असे. परंतु तो ग्रुप लिडर माझ्याकडे विषेश लक्ष देऊन होता. मला सतत उत्साहीत करीत असे. प्रत्येक खेळण्यात सहभागी करुन घेत होता. आणि त्याचमुळे मला त्यावेळी खेळण्याची आवड निर्माण झाली होती.

खो खो चा खेळ रंगला होता.  मी थोड्याच वेळांत बाद झालो.जवळच असलेल्या एका दगडावर जाऊन बसलो. मी तो खेळ बघत बसलो होतो. माझ्याच वयाचा एक मुलगा खो खो खेळत होता. शरीर यष्टी अती रोड. हाडकुळा अंगकाठीने. अतीशय चपळाईने खेळत होता. शेवटपर्यंत बाद झाला नाही. त्याच्या खेळाकडे बघून मला त्याच्या बद्दल आपुलकी व प्रेम वाटू लागले. आपण देखील असेच खेळावे, पळावे, हा विचार

डोक्यांत येऊ लागला. खेळाची वेळ होतांच त्या लिडर विद्यार्थ्याने शिट्टी मारली. खेळ संपला. तोच चपळ मुलगा दम टाकीत मज जवळ आला व शेजारच्या दगडावर बसला. मी त्याला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

“ काय नांव तुझ “  “ मारुती ”

“ कोठे राहतो “    “ जवळच धोंडापुरां गल्लीत.”

“ रोज खेळण्यास येतो का “   “हो !  मी रोज येथेच खेळत असतो “

“मला हा खो खो चा खेळ शिकवशील का ? “   तो हसत म्हणाला  “ मी काय शिकवणार. खेळत जा. जिद्दीने खेळावे. हळू हळू सर्व खेळ आपोआपच येतो. आपल्या चुका आपल्यालाच कळतात. आपणच त्यांत सुधारणा करतो. हेच तर खेळ शिकणे आहेना.”

तो गप्प झाला. परंतु मला त्याच्या बोलण्याचा विश्वास वाटला. त्याच्या बद्दल आपुलकी वाटू लागली.

वडीलांचे शब्द आठवले.  “चांगले मित्र करावे. चांगले संस्कार होतात. आपणपन चांगले बनू लागतो.”

ह्या मारुती बद्दल एक वेगळीच भावना मनांत येऊं लागली. बस याच्याशीच मैत्री करावी.

“ तु रोज संध्याकाळी येथे येतोस ना, मी पण येत जायीन.” मी म्हणालो.

तो फक्त  “हो येईन “ म्हणाला. आणि लगेच निघून गेला

 हीच डॉ. मारुती शंकरराव अतकरे व डॉ. भगवान केशवराव नागापूरकर  यांच्या मित्रत्व रोपणाची प्रथम पायरी. जी पुढे पुढे जात समांन्तर चालत गेली.  आज वयाची पंचाहत्तरी पुर्ण करीत पुढे जात आहे. वयानी जरी शारिरीक दुर्बलता दाखवण्यास सुरवात केली असली,  तरी आमची मने आजही टवटवीत आहेत. जशी बाल वयांत होती, शाळकरी विद्यार्थी म्हणून होती, विद्यालयीन दशेत असतानाची होती,  मेडीकल महाविद्यालयीन शैक्षणीक साम्राज्यात होती, पदव्युत्तर शिक्षण काळांत होती. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे दोघानीही शासनांत कार्य करीत मोठी पदे भुषवित निवृत्ती घेई पर्यंत,  साऱ्या साऱ्या जीवन चक्रांत आमच्या मनाची टवटवी सतत जागृत व चैतन्यमय राहीली.

मला खेळाचाच दुसरा प्रसंग आठवतो. मुलांचा गट बनवला जायचा. जे चांगले खेळडू असायचे, ते त्या खेळाचे गट प्रमुख व्हायचे वा समजले जायचे. दोन गटप्रमुख एकमेका समोर ऊभे रहात असे. प्रथम एकाने दुसऱ्या गटप्रमुखाच्या हातावर टाळी देत मुलांच्या ग्रुपमधून एका खेळाडूची निवड करायची.  नंतर दुसऱ्या गटाच्या प्रमुखाने टाळी देत त्याच्या गटासाठी भिडू निवडायचा. ह्यांत जे कच्चे खेळाडू असत, त्याना मागणी अर्थातच शेवटी होत असे. मी असाच कच्चा खेळाडू. म्हणून मला बऱ्याच वेळानंतर मागणी येई. त्याची मला जाण असल्यामुळे मी सहसा त्या प्रसंगी बाजूस जाऊन बसे. दोन गटप्रमुखांत मारुती देखील होता. मी बाजूस दगडावर बसून गम्मत बघत होतो. मला आश्चर्याचा धक्का बसला. मारुतीने पहील्याच मागणी टाळीमध्ये माझे नांव घेतले.

“ भगवान “  मला खूप आनंद झाला. मी धावत जाऊन त्याच्या गटांत सामील झालो. त्यावेळी मला माझी क्षमता, योग्यता, चंचलता, खेळाडू कौश्यल्य,   याची मुळीच जाणिव आली नाही.  फक्त समाधान व आनंद वाटला की मला गटांत ताबडतोब घेतले गेले. मी कौतूकाने मारुतीकडे बघत राहीलो.

हाच तो क्षण, जेंव्हा जीवनाचा बनत चाललेला गुंता बळकट होऊ लागला होता.     “  मारुती व भगवान “   हे रसायन-समिकरण तयार होऊ लागले होते. पुढे वैद्यकीय क्षेत्रातील पदव्या घेऊन आज तागायत टिकून राहीले आहे. 

— डॉ. भगवान नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..