नवीन लेखन...

मायाबाजार

कुणी विकतं, कुणी खरेदी करतं, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवावं लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल ते जास्तीत जास्त भावात विकलं जातं. कुणी बुद्धिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवाने दिलेले सौंदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेऊन विकायला बसतं. मायाबाजार चालू राहतो. 


मायावी मुंबई नगरी. एक भूलभुलैया. एकदा का आत शिरलं की बाहेर पडणं मुश्कील. सतत एक एक पाऊल पुढेच टाकल जातं. मागे सतत दडपण असतं. पुढे जाण्याचं, काही काळ चालल्यानंतर लक्षात येत आपण चालत आहोत, पण स्वत:भेवतीच. त्यामुळे शंभर पावल टाकली तरी आपण जिथं आहोत तिथंच थांबलेले आहोत. आजूबाजूची गर्दी, वाहनांचा वेग, घटनांचा वेग, सतत काही तरी करीत आहोत असा आभास, विविध आकर्षणांच मायावी जाळं, त्यामुळे आपण पुढे जात आहोत, असा भासच होत राहतो. प्रत्यक्षत मात्र आपण असतो तिथंच राहतो. कल्याणचा माणूस कल्याणला, विरारचा विरारला, अंधेरीचा अंधेरीला, दादरचा दादरला आणि मलबार हिल-कफ परेडचा आलिशान टेकडयांवर.

कल्याणचा माणूस फार फार तर ठाण्याला येईल. दहिसरचा बोरिवलीला येईल. पण परळच्या चाळीतून एकदम नरिमन पॉईंटला पोहोचलेले किंवा डोंबिवलीहून एकदम नरिमन पॉईंटला पोहोचलेले (कामासाठी नव्हे तर कायमचं वास्तव्य करण्यासाठी)  अशी किती उदाहरणं असतील. लाखात एखादं. हाताच्या बोटावर मोजण्याइतकं. पण शक्यता असते, त्या शक्यतेच्या जोरावरच माणूस स्वत:भोवती गरागरा फिरत राहतो. थोडाफार पुढे जात असेल पण लक्षात येत, कितीही वेगान फिरल तरी पुढे जाण्याची गती काही म्हणावी तशी येत नाही. मग तो आपणच आखलेल्या ठराविक साचेबंद सुरक्षित वर्तुळात फिरत राहतो आणि त्यातच समाधान मानतो किंवा जिवापाड परिश्रम करीत थकून-भागून सततच निराश होऊन जातो. पण मुंबईचं मायानगर आपली भुरळ त्याच्यावर पाडतच राहतं. बाहेर राहणाऱ्याला तर इथला झगमगाट सततच खुणावल राहतो. आतील अक्राळ विक्राळ आ वासले प्रश्न भिववत असतानाही तो या मायानगरात प्रवेश करतो आणि हातपाय हलवत राहतो. इथल्या मायाबाजाराची एक नशाच त्याला चढते आणि वास्तवापासून दूर अशा वेगळयाच अवस्थेत पोहोचून इथल्या हालअपेष्टा सहन करीत राहतो.

व्हीटी स्टेशनच्या बाहेर पडलं की फेरीवाले अंगावर तुटून पडीत. बघता बघता त्यांच्या पोतडीतला माल संपून जातो. तो संपवण्यासाठी त्यांना घसा कोरडा करावा लागतो. पण माल चांगला आहे. तो खपेल. मी काशाल ओरडू, अस या फेरीवाल्याला म्हणता येत नाही. कारण माल चांगला आहे एवढया गोष्टीवर या मायाबाजारात काही खपत नाही. माल चांगलाआहे हे ओरडून सांगावं. लागतं. माल सजवावा लागतो. आकर्षक करावा लागतो. ग्राहकांच लक्ष वेधून घ्याव लागतं. जो जास्त ओरडतो, ज्याचा माल बरा असतो तो लवकर मोकळा होतो. जास्त पैसे कमावता ज्याचा माल चांगला असतो, पण ज्याला ओरडाची लाज वाटते किंवा आळसामुळे माल सजवण्याकडे लक्ष द्यावसं वाटत नाही तो मागे पडतो. त्याला कुणी विचारत नाही. माल पडून राहतो. नशीब असेल तर एखादा चोखंदळ ग्राहक येतो. पण क्वचित. कुणाकडे इतका वेळ राहला आहे? कमी वेळात, कमी पैशात जास्तीत जास्त काम झाल पाहिजे इकडे सर्वांच लक्ष.

त्यामुळे स्वत:विषयी चांगलं बोलू नये, असे संस्कार झालेली बाळबोध वळणाची माणसं त्यांचे सुप्त गुण अनुल्लेखान मारले जातात. जीवघेण्या स्पर्धेत टिकायच असेल तर आक्रमक बनाव लागतं. फेरीवाल्यांच तत्वज्ञान कळत-नकळत या आर्थिक बाजारपेठेच्या सर्व अंगात पुरेपूर भरल आहे. केवळ तुमच्याकडे आहे हे सांगावं लागतं. ते अधिक प्रभावीपणे सांगण्याचे कौशल्य संपादन करावं लागतं, आणि ते नसल तर सारी मेहनत वाया जाते. केवळ तुम्ही स्वत:च स्वत:विषयी बोलून भागत नाही तर तुमच्याविषयी बोलणारी, तुमच कौतुक करणार माणस गोळा करावी लागतात, जोडावी लागतात. तरच तुमच्या कलेच गुणांचे चीज होतं. किमान त्याची दखल घेतली जाते. हे आवडत नसल तरी सत्य आहे.

तुम्ही माल स्वत: बनवलात की तयार- आयात केलात हे कुणी बघत नाही. झगमगाट पाहिजे. कामात, मालात, गुणवत्ता नसली तर कितीही विक्रीकौशल्य असल तरी काही उपयोग नाही. हे जरी खर असलं, तरी शंभर रुपयाचा माल दोनशे रुपयांना विकायला जमल पाहिजे.

मुंबई -मार्केट साहित्यांच, कलांच, वस्तुंच, माणसांच, त्यांच्या कर्तृत्वाच- इतकं मोठं आहे की तिथं काहीही खपता येतं. या मायाबाजारात इतके वळसे आणि वळण आहेत, इतक्या छोटया-मोठया गल्ल्या आहेत की त्यात पाचशे रुपये डझनाच्या पाव किलो वजनाच्या हापूस आंब्यांपासून डाग पडलेल्या गावठीा आंब्यांपर्यंत सहज सर्व काही विकलं जातं. प्रत्येकाला आपल्या खिशात काय आहे आणि त्या किंमतीत कुठे काय मिळू शकतं हे माहिती असतं.

हा मायाबाजार सर्व दूर पसरलेला आहे. डी. एन. रोडवर तुम्हाला सुईच्या टाचणीपासून रोजच्या गरजेच्या वस्तुंबरोबरच चैनीची कोणतीही वस्तू मिळू शकते. लिंकिंग रोड आहे. चिराबाजार आहे, लोहार चाळ आहे, दार टीटी आहे, चोरबाजारही आहे, फेरीवाले आहेतच, नाहीतर पंचतारांकित हॉटेलांतील शॉपिंग आर्केड आहे. फेरीवाल्याकडे तीस रुपयाला मिळणारा  टी-शर्ट दुकानात अडीचशेला मिळातो आणि फॅशनेबल नावाजलेलया डिझाइनर दुकानात त्याची किंमत हजार रुपेय होते. मायाबाजारातल्या एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत तुमचा प्रवास चालू राहतो. कुणी विकत, कुणी खरेदी करत, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवाव लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल तो जास्तीत जास्त भावात विकल जातं. कुणी बुध्दिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवानं दिलेले सौदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेउुन विकायला बसतं. मायाबाजार चलू राहतो. घरात, ऑफिसात, पाटर्यांत, समारंभात, मैफिलीत, त्याला काळ, काम वेग –नसतो

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : २ जून १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..