नवीन लेखन...

मार्क व्टेन आणि श्रीशांत

विनोदी लेखनासाठी सुप्रसिध्द असलेले आणि तिरकस रिमार्कसाठी कुप्रसिध्द असलेले मार्क व्टेन एकदा सहज म्हणून गेले, काही पुस्तकं अशी असतात की जी लेखकास शब्दबद्द होऊ देण्यास तीव्र नकारघंटा वाजवतात. त्यांच्या पाठिमागे प्रेयसीच्या पाठिमागे लागणार नाही इतका लेखक लागतो, मनधरणी करतो,पण ही पुस्तकं ढिम्म हलत नाही. गदागदा हलवली तरी डुलत नाहीत, किती खरं बोलले नाहीत का हे व्टेन महोदय.

आता हेच बघा की जर श्रीशांत यांच्या करकमलांद्वारे नुकत्याच घडून गेलेल्या पराक्रमावर पुस्तक पाडण्याची लेखरावांना इच्छा झाली तरी ते पुस्तक त्यास तयार होईल का?जेम्स बाँडचे पराक्रम काल्पनिक होते.म्हणून ते कागदावर आले नाहीत तर इआन फ्लेमिंगला जेम्सची सारीच लफडी माहीत होती.त्यामुळे पारदर्शकता होती.त्यातूनच शब्दांना कथेचा फॉर्म मिळाला.श्रीशांत यांनी पराक्रम गाजवला.पण त्याचं त्यांनाच म्हणे कळेना हा पराक्रम त्यांच्या हातून घडला की कुणी तरी बाहुलीने त्यांच्या हातून घडवला?शिवाय ही बाहुली एक,दोन की तीन तसेच मराठी,पाकिस्तानी की झुमरीतलैयानिवासी हेही गुलदस्त्यात.

पोलिसांना वाटतं कुणी एक पॉवरफूल बाहुलाच श्रीशांत यांना नाचवत होता.झंपिंग झपॅक म्हणत शाहरुख खान ते माधुरी दीक्षित ते कटरीना हीस फराह खान नाचवू शकते.पण बाहूला हा काही नृत्य दिग्दर्शक नाही.किंवा होऊ शकत नाही.तसेच रेमो फर्नांडिस किंवा प्रभुदेवाचं हे टोपणनाव सुध्दा नाही.जर नाचायचे होते तर श्रीशांत कां बरे क्रिकेट खेळत राहिले?डान्स इंडिया डान्स, नच बलिए होतेच की त्यांच्यासाठी. श्रीशांतने राहूल महाजनांना एक एसएमएस केला असता तरी त्यांनी या कार्यक्रमांचे पत्ते – फोन-ईमेल-वेबसाइट,फेसबूक ऍ़ड्रेस सारं धाडलं असतं.विनोद कांबळी सुध्दा एका डान्स शोमध्ये झंपिंग झपॅक करुन आले होते,त्यांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळालं असतं.पण तसे झाले नाही.याचा अर्थ पाणी नक्कीच मुरतेय.हे पाणी बिसलरीचे की की रावी नदीचे हे मात्र गुलदस्त्यात आहे.

श्रीशांत यांनी त्यांच्या मैत्रिणीला 40 हजाराचा मोबाइल दिला असं सांगितलं जातं.पण मोबाइल चाळीस रुपयांचाही राहू शकतो. उल्हासनगरचा असेल तर चारशे रुपयांचा राहील.मेड इन चीन असेल तर किंमत गुलदस्त्यात राहील.चाळीस हजार आकडा संशयास्पदच.चाळीस लाख कां नाही?चाळीस लाखाचा मोबाइल ही जरा अवास्तव कल्पना झाली असं आजच्या जगात कुणी म्हणूच शकत नाही.आठ लाखाचंही घर असतं आणि आठ हजार कोटी रुपयांचं घर असू शकतं हे आपणा सर्वांनाच माहीत नाही का?

श्रीशांत यांच्या राहण्याची सोय केलेल्या हॉटेलमधील रुमशिवाय त्यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेसमध्ये असणाऱ्या एका हॉटेलमध्ये रुम बूक केल्याचं सांगितलं जातं.हे हॉटेल मिठी नदीच्या परिसराच्या आजुबाजूला आहे.समजा श्रीशांत यांची सामाजिक जाणीव जागृत होऊन मिठी नदीचा गाळ आणि घाण दूर करण्याचे त्यांनी मुंबई मुक्कामी ठरवलं असेल तर? या कामासाठी किती खर्च येऊ शकतो हे बघण्यासाठी मिठी नदीच्या जवळपासच्या हॉटेलमध्ये राहण्याचे ठरवलं असेल तर? या नदीची पाहणी रात्रीच व्यवस्थित होणार की नाही?हे वास्तव जर ध्यानात घेतले तर श्रीशांत हे योग्य मार्गीच होते असं म्हणता येऊ शकतं..पण वास्तव आणि वस्तुस्थिती समोर येणार कशी? हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत पुस्तक कसं बरं शब्दांचं स्वागत करेल?मग ते पुस्तक सलीम-जावेद यांनी लिहायला घेतलेलं असो किंवा जेम्स हेडली चेसने किंवा चेतन भगतने लिहायला घेतलं असो, त्याने काहीच फरक पडत नाही.

मार्क व्टेन किती अचूक बोलून गेले, नाही का?

— श्री.सुरेश वांदिले

Avatar
About सुरेश वांदिले 10 Articles
श्री. सुरेश वांदिले हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात संचालकपदावर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “लोकराज्य” या मासिकाचे ते संपादक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..