नवीन लेखन...

मै सूर्य हूॅं..

चलते-चलते इतना थक गया हूँ,
के चल नहीं सकता..
मगर मैं सूर्य हूँ,
संध्या से पहले रुक नहीं सकता..!!

आज सकाळीच हा अर्थगर्भ शेर उगाचंच आठवला आणि मनात अनेक तरंग निर्माण झाले. वरवर उदासीची छाया असणाऱ्या या शब्दांत प्रचंड उर्जा ठासून भरलेली आहे, असं जाणवलं आणि एक नविनच उत्साह तनामनात भरुन आला. शेर सूर्याशी संबंधीत असल्याने, त्यात उर्जेशिवाय आणखी काय मिळणार?

किती खरं म्हणालाय तो अनामिक शायर. न थकता, क्षणभरही विश्रांती न घेता सतत आपल्या गतीने चालणाऱ्या सूर्यापासून कितीतरी गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहे. सूर्याचा धर्मच प्रकाशणे आणि दुसऱ्याला कोणताही दुजाभाव न करता उर्जावान करणे हा आहे. वादळ-ढग येवोत, ग्रहणं लागोत किंवा आणखी काही विपरीत होवो, क्षणभर अंधारल्यासारखं होऊन हा सहस्त्ररश्मी आपला पुन्हा आपल्या सहस्त्र हातांनी सर्वाना प्रकाशातं दान देत उभाच. म्हणून तर मला वाटतं भल्या भल्यांना ‘दे माय, धरणी ठाय’ करणारे सर्व ताकदवान ग्रह याच्याभोवती लीन होऊन फेर धरून नाचत असतात, नव्हे सूर्य त्यांना तसा नाचायला लावतो, त्यांच्याही नकळत..

सूर्य ढगाआड जातो, पावसाळ्यात चार चार दिवस दिसत नाही, ग्रहणात टिचभर चंद्र किंवा मुठभर पृथ्वी त्याला गिळण्याचं धारीष्ट्य करतात, परंतू तो सर्वांना पुरून उरतो. घनघोर ढगांआडून किंवा चंद्र-पृथ्वीच्या आडूनही आपला प्रकाश, आपली उर्जा तर समोर फेकतच राहातो. ग्रहणात तर अत्यंत दुर्मिळ आणि तेवढीच प्रखर तेजस्वी असणारी ‘डायमंड’ रिंग तयार होते. या वेळी त्याच्याकडे बघणाऱ्याची दृष्टी दिपतच नाही, तर कायमची जाते येवढं तेज त्याच्यात असतं असं म्हणतात.

‘नारायण’ या शब्दात ‘नर’ हा शब्द नैसर्गिकरित्याच अंतर्भूत असल्याने, ‘नर’ हा ‘नारायणा’चाचत अंश असं म्टलं तर चुकू नये. आणि एकदा का नर हा नारायणाचा अंश हे मान्य केलं, की मग नारायणातली सर्व वैशिष्ट्य आपल्यात आहेतच, हे ही मान्य करावं लागतं. सूर्याचे अंश असणाऱ्या आपल्याला त्याची कवच कुंडलं वारसाहक्कातून आपल्याकडे आली आहेत, हे आपल्यापैकी वरच्या चारओळींतील पहिल्या दोन ओळी म्हणणारे अनेकजण पार विसरूनच जातात, त्यांनी वरच्या चार ओळीतील शेवटच्या दोन ओळी नेहेमी मनावर कोरून ठेवल्या पाहिजेत. चालता चालता थकलेल्यानीच कशाला, शेवटच्या दोन ओळी आपण सर्वांनीच लक्षात ठेवाव्यात असं मला वाटतं.

ललाटीच्या वाट्याला आलेलं आयुष्य जगताना, आपल्यासमोर अनेक प्रसंग काळ्याकुट्ट ढगांलारखै अकस्मात येतात. आता सारं सपलं असं वाटायला लावणारी अनेक लहान मोठी ग्रहणं आपल्यालाही लागतात. अशा प्रसंगी अनेकजण हरतात, थकतात आणि काहीतर हताश हतबल होऊन स्वत:लाही अकाली संपवतात. वरचा शेर अशा प्रसंगी धैर्य देतो. संकटांच्या ढगांआडूनही प्रकाशत राहायचं आणि समोरच्या एव्हरी काळ्या क्लाऊडला सिल्व्हर लायनिंग द्यायची ताकद किंवा त्या काळ्याकुट्ट ग्रहणातली प्रखर आणि डोळे दिपवून टाकणारी ‘डायमंड रिंग’ बनवायचं सामर्थ्य त्या तेजोनिधीचे अंश असणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या अंगी असते हे प्रत्येकाने स्वत:ला शिकवण्याची हिच तर वेळ असते. सूर्याप्रमाणेच त्याचेच अंश असणाऱ्या आपल्यालाही झाकोळून टाकण्याची ताकद कोणातच नाही, हा दृढ विश्वास प्रत्येकाने मनात जपायला हवा..

अडचणींच्या वेळी, आयुष्याच्या अवघड वळणांवर आपल्यापैकी अनेकजण ग्रह-ताऱ्यांचा आधार घेत वाट काढायचा प्रयत्न करुन थकतात, थबकतात. समोरच्या सर्व वाटा बंद झाल्या आहेत असं वाटताना, सूर्याला मध्य ठेवून त्याच्या भोवती फेर धरून फिरणाऱ्या परंतू सूर्याच्या तुलनेत अगदीच क्षीणं ताकद असणाऱ्या ग्रह-ताऱ्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी असे थबकलेले लोक किती खटपटी करताना दिसतात. स्वत: सूर्य असताना सूर्याच्या जवळपासही जाण्याची हिंम्मत नसणाऱ्या शनी, मंगळ, राहू, केतुदी ग्रहांच्या नादी लागण्यापेक्षा स्वत:तल्या सुर्याला ओळखा, असाही संदेश वरील चार ओळी देतात असं मला वाटतं..

सूर्य जीवनरस आहे. तो कधीही सुकत नाही. सूर्य कधीही थकत नाही. आयुष्यातील वळणावळणाची अनवट वाट चालताना कधी कधी चलते-चलते मै इतना थक गया हूँ, असं वाटणं सहाजिकच आहे;मात्र याच वेळी स्वत:ला मगर मैं सूर्य तो हूँ, संध्या से पहले रुक नहीं सकता ह्याची आठवण देत पुढे चालतच राहायचं असतं. ज्योतिषशास्त्रातही एखाद्याचे आयुष्य किती असेल आणि ते कसं जाईल ह्याचा वेध घेताना, त्याच्या कुंडलीतील इतर ग्रहांपेक्षा सुर्य कसा आहे हे बघीतलं जातं, ते बहुदा याचसाठी असावं.

आपण सारे सूर्य आहोत हा विश्वास नेहेमी मनाशी बाळगून चालत राहा, अस्त झाल्यासारखा वाटणं, चंद्र-पृथ्वींने सूर्य गिळल्यासारखा वाटणं हा दृष्टीभ्रम असतो, सूर्याला अस्त नाहीं, त्याला ग्रहण नाही. आणि अर्थातच आत्मा अमर असतो असं मानणाऱ्या आपल्यासारख्या सूर्याच्या अंशांनाही अस्त नाही, ग्रहण नाही..बस चालत राहा, चालत राहा..!!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..