नवीन लेखन...

इलेक्ट्रिकल इंजिनिअरची दुग्धव्यवसायात क्रांती!

|| हरि ॐ ||
नोकरीच्या मागे न लागता स्वमेहनतीने बेसखेडा जिल्ह्यातील (चांदुर बाजार) येथील व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्री रवी पाटील या होतकरु तरुणाने दुग्धव्यवसायात क्रांती घडविली आहे. पुणे येथील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘चॅलेंज’ म्हणून त्याने दुग्धव्यवसाय स्विकारला आणि यशस्वीही करुन दाखविला. कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता परिश्रमाने या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करुन जिल्ह्यातील युवकांसाठी तो आदर्श ठरला आहे. कुटूंबाने शेतकरी असलेल्या या युवकाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन ही किमया साधली आहे.
समाजसेवी संस्थेत काम करतांना आलेल्या विविध प्रकारच्या अनुभवातून पाटील यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वास्तव्य असलेल्या चांदुर बाजार तालुका परिसरात अनेक भाकड गाई कसायामार्फत कटाईसाठी जात होत्या. एकदा कसायाकडून अशाचप्रकारे सोडविलेल्या गाई त्यांनी घरी आणल्या आणि याच गाईपासून त्यांनी दुग्ध व्यवसायास प्रारंभ केला. आज त्यांचेकडे विविध जातीच्या ६० गाई व ६४ वासरे आहेत. त्यापैकी २० गाई दुभत्या आहेत. या गाई ४०० लिटर दुध देतात.
शेतातील शेडमध्येच त्यांच्या गाईंचे संगोपन केले जाते. दुभत्या गाई व दुधाळू नसलेल्या गाईचे त्यांनी वेगवेगळे गट केले आहेत. गाईंच्या वासरांसाठी त्यांनी वय व वजनानुसार वेगळी व्यवस्था केलेली आहे. गाईंना दिवसभर एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यास स्नायूचे व स्तनाचे आजार होण्याची शक्यता असते. तसेच दुधाच्या प्रमाणातही घट येते. त्यामुळे मोकळ्या ठिकाणी गाईंना दिवसभर फिरता येईल अश्या पध्दतीने बांधण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. यांत्रिक पध्दतीने गाईंचे दुध काढले जात असल्याने वेळेची बचत होऊन दुध अधिक शुध्द राहत असल्याचे रवी पाटील सांगतात.
दररोज निघणाऱ्या ४०० लिटर दुधापैकी काही दुध गावातच विक्री करतात व उरलेले दुध खाजगी कंपनीला विकतात. याशिवाय ते घरीच दही, पनिर, चक्का, चिज, तुप आदी वस्तू तयार करुन मागणी प्रमाणे ग्राहकांना पुरवितात. खर्चात कपात करण्यासाठी गाईंना अतिशय पोषक असणार्‍या लुसर्न, बरसिंग, यशवंत, जयवंत, काडीघास, बाजरा, ज्वारी, मका, उस आदी विविध जातीच्या बहुवार्षिक चार्‍याचे उत्पादन शेतात घेतात. महिन्याला दुध, शेण, गोमुत्र व नविन कालवडी विक्रीतून १ लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिवते. खर्च वजा जाता ५० हजारापर्यंतचे उत्पन्न शिल्लक राहते.
दुधाव्यतिरीक्त अन्य उत्पादनामधून त्यांना वर्षाला ३०० ट्रॉली शेणखत तसेच साधारण ७३००० लिटर गोमुत्र मिळते. आले, हळद, मिरची, संत्र, पपई आणि कपाशीची शेती करणाऱे शेतकऱी ४ रुपये लिटर प्रमाणे त्यांच्याकडून गोमुत्र खरेदी करतात. त्यांच्याकडे निर्माण होणारे शेणखत ते अन्य शेतकर्‍यांना देऊन त्याच्याबदल्यात गाईंसाठी लागणारा गव्हाचा भुसा शेतकऱ्यांकडनू घेतात गाईंवर खाद्यापदार्थांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात त्यामुळे कपात होते. परिसरातील शेतकऱ्यांचे दुधही ते संकलित करतात. जवळपास दरदिवशी हजार ते दीड हजार लिटर दुधाचे संकलन करुन अमरावती येथील एका खाजगी कंपनीला कमिशन बेसवर पुरवितात. या व्यवसायतही त्यांना प्रतिलीटर एक रुपया याप्रमाणे दरदिवशी एक ते दीड हजाराच्या जवळपास उत्पन्न मिळते. भरपूर दुध देणार्‍या विदेशी जातीच्या जर्सी, होल्स्टेन तसेच साहिवाल, गीर, गौराळू व इंडियन जैन या देशी गाईंचाही समावेश आहे.
कसायापासुन सोडविलेल्या भाकड गायी पुन्हा उत्पादनक्षम बनवून जीवनदान देणे व चांगल्या अनुवांशिकतेचे वळु, शेतीउपयोगी बैल व कालवडी तयार करुन त्यांची विक्री करतात. कसायाकडून गाई सोडवितांना होणारा आनंद या व्यवसायात मिळणार्‍या उत्पन्नापेक्षाही अधिक असल्याचे रवी पाटलांना वाटते. परिसरात विविध कुटूंबात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी चळवळ म्हणून ते काम करतात. दुग्ध व्यवसाय आज त्यांच्या परिवाराच्या उर्दनिर्वाहाचे प्रमुख साधन बनले आहे. तसेच ते दुग्धव्यवसायाविषयी उपलब्ध असलेल्या साधनसमुग्री व कमी भांडवलामध्ये दुग्धव्यवसाय प्रशिक्षण, चारा निर्मिती व नियोजन याबाबत मार्गदर्शन करतात. आपल्या व्यवसायात त्यांनी केलेली प्रगती इतर युवकांना व शेतकर्‍यांना प्रेरणादायी अशीच आहे.
विदर्भात गायींच्या संगोपनाकडे शेतकरी नेहमीच दूर्लक्ष करतात. गाईंना जंगलात सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत चरायला सोडतात याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे दूध कमी देतात व भाकड होतात. गायींची संख्या न वाढवता जास्त दूध देणार्‍या जर्सी, होस्टेन व चांगल्या दूध देणार्‍या देशी प्रजातीच्या गायी प्रत्येक शेतकरी कुटूंबांनी शेतीपुरक व्यवसायासाठी पाळाव्यात. याची जागृती अमरावती जिल्ह्यात रवि पाटील करत आहेत. आज चांदूर बाजार तालुक्यात शंभर शेतकरी गायीपासून दूधाचा व्यवसाय करत आहेत.

 

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..