नवीन लेखन...

एका भारलेल्या वास्तूत ….

फोटोत दिसणारी ही भव्य आणि अतिशय सुंदर वास्तू आहे, एक मकबरा. सुफी संत महंमद गौस यांचा. अत्यंत सुंदर आर्किटेक्चर असलेली ही भव्य वास्तू ग्वालियरमधली खास जागा आहे. महंमद गौस हे संगीत सम्राट पंडित मिंया तानसेन यांचे गुरु होते. किती मोठे लोक आणि आपली दिव्य परंपरा आहे बघा. खरं तर तानसेन हे भारतातले सगळ्यात महान संगीतकार पण त्यांची समाधी बघाल तर या भव्य मकबऱ्याच्या बाजूला अतिशय लहान आहे. आपल्याला हे बघून खूप आश्चर्य वाटतं. पण असं म्हणतात की तानसेन यांचीच तशी अखेरची इच्छा होती. आपल्या गुरुची समाधी ही भव्यच असावी आणि त्यांच्या शेजारी आपली छोटीशी. महंमद गौस हे मुगल सम्राटांचे धर्मगुरु होते. खरं तर हा फारच जगावेगळा माणूस होता. मुळात हा अफगाण वंशातला राजपुत्र होता आणि पुढे अध्यात्माची गोडी लागून तो या पदाला पोचला. गुजरातमध्ये दहा वर्ष यात्रा केल्यावर ते इथे आले. तानसेनांना घडवण्यात त्यांचे अगोदरचे गुरु स्वामी हरिदास यांचा खूप मोठा वाटा होता. लहान वयात असल्यापासून स्वामी हरिदासांनी या महान संगीतकाराला घडवायला सुरवात केली. मात्र संत महंमद गौस यांचं शिष्यत्व घेतल्यावर तानसेन सुफी गाणी गायला लागले. तानसेनांविषयी अनेक कथा परंपरेने सांगितल्या आहेत. असं म्हणतात की त्याचे बाबा देखील संगीताचे उत्तम जाणकार आणि कलाकार होते. ते प्रतिभाशाली कवी होते.

सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नात पंडित तानसेन होते. असंही म्हणतात की तानसेन जेव्हा सर्वप्रथम सम्राट अकबरासमोर गायले तेव्हा त्याने खुश होऊन तानसेनांना त्यावेळी एक लाख सोन्याच्या मोहरा बक्षीस दिल्या. तानसेन एवढे प्रतिभावान होते की ते गाऊन पाऊस पाडायचे त्यांचा मेघमल्हार सुरु झाला की बाहेर मुसळधार पाऊस पडत असे. तसंच ते राग दीपक गायला लागले की दिवे लागायचे. त्यांनी भैरव, दरबारी कानडा, मल्हार, सारंग, रागेश्वरी अशा अनेक रांगांच्या रचना केल्या. त्यांना त्यांच्या या कल्पनेपलीकडच्या योगदानामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे संस्थापक मानलं जातं. त्याच्या या असामान्य आणि दैवी व्यक्तिमत्वाभोवती गेली शेकडो वर्ष एक झगमगतं वलय आहे ..

महंमद गौस यांचा हा भव्य मकबरा म्हणजे आर्किटेक्चरमधली जादुई आणि असामान्य निर्मिती आहे. असं म्हणतात की ही भव्य वास्तू तयार व्हायला ३८ वर्ष लागली. मकबऱ्याचा आकाशाला स्पर्श करणारा भव्य घुमट आणि त्याखालचा आतला विस्तृत गूढ अवकाश हे बांधकाम शास्त्रातली असामान्य निर्मिती आहे. बांधकाम शास्त्रातली अनेक तांत्रिक गणितं, महिरपी एकात एक गुंफून बांधकाम एवढं मजबूत केलंय की ते आज शेकडो वर्ष होऊनही ते दिमाखात उभं आहे. या मकबऱ्याचं आर्किटेक्चर आणि बांधकाम अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीचं आहे. चार बाग पद्धती वापरून सगळं प्रांगण आणि मुख्य वास्तू यांचं डिझाइन केलं गेलंय. यातलं खास वैशिष्ठय म्हणजे ही जी चार बाग संकल्पना आहे, सर्वसाधारणपणे त्याच्या मध्यभागी मुख्य वास्तू उभारली जाते. इथे मात्र ती मध्यभागापासून खूप मागच्या बाजूला योजली आहे. जाणकार म्हणतात की असं करायचं कारण की या मुळे वास्तुवरचं सामान्य नजरेचं आकर्षण फार शार्प झालंय आणि दुसरं म्हणजे वरच्या भव्य अवकाशाशी वास्तूचा कुठल्याही अडथळ्याशिवाय थेट संबंध प्रस्थापित होतोय. मकबऱ्याच्या वास्तूचा मुख्य प्लान हस्त-बेहेस्त (Hasht-behest) या संकल्पनेवर आहे. पर्शिअन मध्ये याचा अर्थ होतो ‘आठ क्षितिजं’. यामध्ये मध्यभागी मोठा हॉल आणि सभोवताली आठ दालनं. यात सजावटीसाठी अत्यंत मूल्यवान हिरेमाणकं वापरण्यात येतात. जेणेकरून यात आठ अवकाश समाविष्ट होतील. पूर्वीचे तंत्रज्ञ, कारागीर किती प्रतिभावान होते, त्यांनी या अशा भव्य, बुलंद वास्तू बांधल्या आणि नुसत्याच बांधल्या नाहीत तर आपल्या प्रतिभेने त्यात अशी विलक्षण निर्मिती केली की या वास्तू अवकाशाशी, निसर्गाशी सहज संवाद करत्या झाल्या. आतल्या अवकाशात ध्वनीच्या सामर्थ्याची आणि माणसाच्या ऊर्जेला प्रज्वलित करण्याची कमाल केली.

या वास्तूची अजून एक मोठी खासियत म्हणजे इथल्या लाल पथ्थर, सँडस्टोन आणि संगमरवरात कोरलेल्या ५० जाळ्या. या जाळ्या त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, अष्टकोणी आकारात आहेत. असं म्हणतात की या जाळ्या शिंदे राजवटीत केल्या गेल्या. प्रकाशाच्या खास योजनेसाठी याची निर्मिती केली गेली आणि यातून वास्तूच्या आत झिरपणारा प्रकाश फार लक्षवेधक केला गेला. जानकोजीराव आणि जयाजीराव शिंदे यांच्या कारकीर्दीत ही निर्मिती झाली आहे. या नाजूक आणि सुंदर जाळ्या बघायला देश विदेशातले कलाकार येतात. त्यावेळी हे काम करणारे निष्णात राजस्थानी कारागीर मोठया संख्येत होते. अशा जाळीदार पडद्याला उर्दूत ‘चिलमन’ म्हणतात आणि यावर अनेक शायरांनी .. कवींनी शायरी केलेली आहे.

तानसेनांची जी समाधी आहे ती एका चिंचेच्या झाडाखाली आहे. तिथे एका बोर्डावर लिहिलंय की ‘इस वृक्षकी पत्तिया चूसनेसे आवाज मधुर होती है”. खरं तर हे अतिशय भव्य प्रांगण म्हणजे एक कब्रस्तान आहे. हे कबरस्तान जरी असलं तरी संत महंमद गौस आणि संगीत सम्राट मिंया तानसेन तिथे गेली अनेक वर्ष चिरविश्रांती घेत आहेत. दोघंही या पृथ्वीवरचे संगीताचे अलौकिक म्हणावेत असेच दैवी कलाकार … ते नक्कीच इथे रियाज करत असतील … गात असतील … साहजिकच त्या पवित्र स्वरांनी … सुरांनी हे प्रांगण भरलेलं आणि भारलेलं आहे. कधी ग्वालियरला गेलात, तर इथे जरूर भेट द्या. सुफी संत महंमद गौस आणि पंडित तानसेन यांना तुमचा नमस्कार रुजू करा. वास्तूत असलेला ‘पीर’ आपली इच्छा नक्की पुरी करतो, अशी स्थानिकांची गाढ श्रद्धा आहे. वास्तूचं देणं किती वेगळं असतं, याची अनुभूती घ्या…..

– प्रकाश पिटकर

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..