नवीन लेखन...

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक

Dangers in Investing in Bitcoins

भारतात कोणत्याही कंपनीला किंवा संस्थेला बिटकॉईन्स किंवा इतर कोणत्याही आभासी चलनाचे व्यवहार करण्यासाठी कधीही मंजुरी दिलेली नाही किंवा परवाना दिलेला नाही. या आभासी चलनाला कोणताच कायदेशीर आधार नाही. त्यामुळे गुंतवलेले पैसे बुडाल्यास काहीही कारवाई करता येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, आभासी चलन हे आर्थिक, वित्तीय, कायदेशीर आणि सुरक्षा या सर्वच बाबतीत जोखमीचे आहे.

बिटकॉईनसारख्या आभासी चलनाचे वाढते मूल्य पाहता गुंतवणूक करणार्‍यांना सरकारकडून इशारा देण्यात आला आहे. आभासी चलनासाठी इशारा जारी करत बिटकॉईनसारख्या कोणत्याही चलनाला कायदेशीर परवानगी देण्यात आलेली नाही आणि अन्य कोणत्याही संपत्तीप्रमाणे त्याचा व्यवहार करता येणार नाही, असे अर्थमंत्रालयाने नुकतेच म्हटले. बिटकॉईनमधील गुंतवणूक धोक्याची आहे. आभासी चलनामध्ये बनावट योजना सुरू करण्यात येत असून, स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करण्यात यावी, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर बिटकॉईनसारख्या आभासी चलनाचे मूल्य गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रत्यक्षात त्याचे कोणतेही मूल्य नाही. यामुळे बिटकॉईनच्या किमती बाजारातील व्यवहारावर अवलंबून आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला कोणत्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही. सामान्य व्यक्तींनी या प्रकारच्या गुंतवणुकीपासून दूर राहावे, असे अर्थमंत्रालयाने म्हटले.

आभासी चलन बिटकॉईनमधील गुंतवणुकीत शहेनशाह ठरलेले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या गुंतवणुकीने गेल्या काही दिवसांतच तळ गाठला आहे. बिटकॉईनचे मूल्य वाढल्याने ६४० कोटी रु.पर्यंत पोहोचलेली बच्चन यांची कमाई आता केवळ ४ कोटी ७० लाख रु.वर घसरली आहे. बिटकॉईनचे मूल्य २३ टक्क्यांनी गडगडले आहे.

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करावी का ?

सध्या गुंतवणुकोच्छुकांमध्ये आणि आर्थिक जगतामध्ये बिटकॉईन या आभासी चलनाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. याचे कारण या आभासी चलनाचे नित्यनेमाने वाढत चाललेले मूल्य. गेल्या एक आठवड्याच्या काळातच बिटकॉईनची किंमत ७० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे बिटकॉईन खरेदी करणारे करोडपती आणि अब्जाधीश झाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच सर्वसामान्य जनतेला बिटकॉईनसारख्या आभासी चलनाच्या व्यवहाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. भारतात कोणत्याही कंपनीला किंवा संस्थेला बिटकॉईन्स किंवा इतर कोणत्याही आभासी चलनाचे व्यवहार करण्यासाठी कधीही मंजुरी दिलेली नाही किंवा परवाना दिलेला नाही. या आभासी चलनाला कोणताच कायदेशीर आधार नाही. त्यामुळे गुंतवलेले पैसे बुडाल्यास काहीही कारवाई करता येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, आभासी चलन हे आर्थिक, वित्तीय, कायदेशीर आणि सुरक्षा या सर्वच बाबतीत जोखमीचे आहे.

रिझर्व्ह बँकेचा हा तिसरा इशारा आहे. आभासी चलनाबाबत यापूर्वी सर्वसामान्य जनतेसाठी २४ डिसेंबर २०१३ मध्ये पहिला इशारा जारी केला होता. भारतात आभासी चलन किंवा व्हर्च्युअल करन्सीमध्ये बिटकॉईन सर्वाधिक प्रसिद्ध चलन आहे. हे चलन ३ जानेवारी २००९ रोजी अस्तित्वात आले तेव्हा त्याचे मूल्य १ सेंट इतके होते. ५ डिसेंबर रोजी एका बिटकॉईनची किंमत १४ हजार डॉलर झाली होती. बिटकॉईन खरेदी करणार्‍या गुंतवणूकदारांचे वेड पाहून भारतीय रिझर्व्ह बँकेने याच दिवशी इशारा देत संभावित धोक्याविषयी सामान्य जनतेला सूचित केले आहे; पण बँकेच्या इशार्‍याचा गुंतवणूकदारांवर काहीही परिणाम झाल्याचे दिसत नाही. त्यामुळेच ८ डिसेंबर रोजी बिटकॉईन चलनाचे मूल्य १७ हजार डॉलर्स अर्थात १०.९६ लाख रुपयांपर्यंत पोहोचले.

अनेक फायदे –

पेमेंट करण्याचे स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये आपण कोणत्याही वेळेला पेमेंट करू शकतो. बँकांना असणार्‍या सुट्या, नोकरशाहीचा अभाव, मर्यादित वापर याचा कोणताही परिणाम या पेमेंट व्यवस्थेवर होत नाही. कमी वेळेत व्यापार/व्यवहार करणे हे या प्रणालीचे वैशिष्ट्य.

बिटकॉईन्समध्ये व्यापारी (मर्चन्ट) मार्फत देवाणघेवाण हे फारच सुलभ आहे.

जगभरामध्ये बर्‍याच वित्तीय संस्था बिटकॉईन या पेमेंट प्रणालीचा वापर करण्यास उत्सुक आहेत. ओव्हरस्टोक.कॉम, मायक्रोसॉफ्ट, चिपएअर.कॉम, विकिपीडिया, अल्झा, चॅन.कॉम, बिटकॉइनकॉफी.कॉम, ब्लूमबर्ग.कॉम, सनटाइम्स, इंटुईत अशा बर्‍याच संस्था बिटकॉईन्स हे माध्यम वापरत आहेत.

बिटकॉईन आपण एक पेमेंट गेटवे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून ई-कॉमर्स संकेतस्थळासाठी वापरू शकतो. आर्थिक देवाणघेवाण करणे सुसह्य आहे.

कायद्याचा विचार केल्यास या बिटकॉईनवर सध्यातरी कोणतेही निर्बंध नाहीत. अर्जेंटिना आणि रशिया या देशांचा अपवाद वगळता बाकी देशांमध्ये वापरास बंदी नाही. कोणतेही कार्ड न वापरता व्यवहार करणे हे बिटकॉईन्समुळे शक्य झाले.

‘व्हर्च्युअल मनी’ अर्थात ‘व्हर्च्युअल पेमेंट सिस्टीम’मुळे कागदी नोटांच्या स्वरूपात असणारे चलन एका नवीन रूपात बदलले दिसेल. यामुळे नोटा प्रिंट करण्यासाठी लागणारे विशिष्ट तंत्रज्ञान, येणारा खर्च, गुणवत्ताप्राप्त मनुष्यबळ यांची गरज कमी स्वरूपात लागेल.

बिटकॉईन्सचे असणारे युजर्स हे व्यवहार नियंत्रित करण्यास कारणीभूत आहेत. यामध्ये आपली व्यक्तिगत ओळख, माहिती लपवली जाते. आयडेंटिटी थेफ्टचा धोका कमी आहे. शिवाय बिटकॉईन्सचे यूजर्स त्यांचे बिटकॉईन्स/पैसे हे बॅकअप आणि एन्क्रिप्शनच्या स्वरूपात संरक्षित केले जातात.

संशय आहे, तिथे पैसा गुंतवू नये

ज्या पद्धतीने बिटकॉईन त्याचे जाळे जगभर इंटरनेटच्या माध्यमातून पसरत आहे, त्याचा प्रकार हा एखाद्या पौंझी योजनेसारखा आहे. झेपूळ नावाच्या इसमाने १७व्या शतकात एक योजना आणली होती आणि त्यामध्ये खूप जणांना पैसा गमवावा लागला होता. ट्युलिप फुलांच्या योजनांपासून, शेरेगर दामदुप्पट योजना, नाशिकची KBC आणि बिटकॉईन यांची कार्यपद्धती पाहिली तर लोकांपर्यंत पोहोचण्याची पद्धत, आता नाही तर कधी ‘तुम्ही पैसा कमावू शकत नाही’ असे उभे राहिलेले मृगजळ भल्या भल्या लोकांची बुद्धी गहाण ठेवते. यामागे कारण एकच माणसाची हाव आणि कमी वेळात मोठी स्वप्न पूर्ण करायची इच्छा यामुळे व्यावहारिक विचार करायची क्षमता बंद होऊन आभासी जगात हे वावरू लागतात. कायद्याचा विचार केल्यास या बिटकॉईनवर सध्यातरी कोणतेही निर्बंध नाहीत. अर्जेंटिना आणि रशिया या देशांचा अपवाद वगळता बाकी देशांमध्ये वापरास बंदी नाही. थायलंडमध्ये बिटकॉईन्स एक्स्चेन्ज करीता अधिकृत लायसन्स असणे अनिवार्य आहे. बेकायदेशीररीत्या बिटकॉईन्सचा व्यवहार, गॅम्बलिंग, हॅकिंग यासाठी वापर करण्याचा संभाव्य धोका हा अनधिकृत युजर्सकडून होईल अशी शक्यता वाटते.

काही संस्था तसेच लोक बिटकॉईन्स वापरण्यास मज्जाव करत आहेत. अपूर्ण माहिती आणि त्याबद्दल असणारी विश्वासार्हता ही मुख्य कारणे त्यांना हे वॉलेट वापरण्यास वंचित राहिले आहेत.

प्रत्येक बिटकॉईन्सच्या युजरने आपली स्वत:ची व्यक्तिगत/आर्थिक माहिती अथवा ओळख लपवणे हे थोडे जिकरीचे काम आहे. शैक्षणिकदृष्ट्या हे लोक तत्पर हवेत. सुरक्षिततेबद्दल योग्य ती जिज्ञासा हवी.

बिटकॉईन्स, व्हर्च्युअल कार्ड्स यांची वेगवान वाढ पाहता भविष्यामध्ये मनुष्यबळावर याचा विपरीत परिणाम होणारच हे निश्चित आहे. आर्थिक व्यवहार हे संगणकीकृत होते. तसेच या संगणक प्रणाली महत्त्वाचे निर्णय घेण्यास कार्यक्षम असतील. काय आहे भविष्य?

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक ही पाण्याच्या बुडबुड्यासारखी आहे. हा बुडबुडा कधीही फूटू शकतो. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक एका फटक्यात शून्य होऊ शकते. अर्थात, या इशार्‍यानंतरही या आभासी चलनाची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. याचे कारण अवैध किंवा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांसाठी तसेच आभासी चलन गोळा करून काळा पैसा जमा करणार्‍यांसाठी हे एक सुरक्षित माध्यम ठरते आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक आहे, असे सांगताना रिझर्व्ह बँकेने पाच मुद्दे मांडले आहेत. डिजिटल करन्सीला डिजिटल स्वरूपातच ठेवले जाते. त्यामुळे ते हॅकिंग किंवा व्हायरस हल्ल्यांद्वारे बाधित होऊ शकते. या चलनावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही केंद्रीय संस्था नाही. या चलनाच्या किमतींमध्ये अचानक घसरण झाल्यास त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते आणि त्यामध्ये सरकारला काहीही करता येत नाही. यामध्ये सट्टाबाजीचीही शक्यता आहे. बिटकॉईनसारखी क्रिप्टो करन्सी ज्या एक्स्चेंजमधून देण्यात येते त्यांचे नियंत्रण कोणत्या देशाकडे आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. बिटकॉईनचा वापर अवैध व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या आभासी चलनात गुंतवणूक करण्यामुळे ‘ऍण्टी मनी लॉंडरिंग’ किंवा ‘टेरर फंडिंग’ यासारख्या कायद्यांचे उल्लंघन कधी आणि किती प्रमाणात होईल, याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

जगात जितके चलन आहेत त्यापैकी प्रत्येक चलनाला कोणत्या ना कोणत्या तरी देशाची मान्यता आहे. त्यामुळे जगभरात त्यावर व्यवहार सुरू असतात. बिटकॉईनला भारतात अजून कायदेशीर मान्यता दिलेली नाही. भारतात बिटकॉईन वापरणारे जवळपास ५० हजार लोक आहेत. बिटकॉईनसंदर्भात अनेक कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक धोके असल्यामुळे याचा वापर करू नये, असा सल्ला रिझर्व्ह बँकेने दिला आहे. तरीही बिटकॉईनच्या वापरात येत्या काही वर्षांत भारत एक आघाडीचा देश असेल.

बिटकॉईनचे वाढते मूल्य आणि भारतीय गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर या आभासी चलनात झालेली गुंतवणूक लक्षात घेता सरकारने यासंदर्भात चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. चीनने बिटकॉईन क्रिप्टो करन्सी एक्स्चेंजवर निर्बंध आणले आहेत. इंडोनेशियामध्येही आभासी चलन व्यवहार बेकायदेशीर घोषित केला आहे. भारतात बिटकॉईन्स मिळवून देणार्‍या काही एजन्सी आहेत. परंतु, त्यांना कोणतेही अधिकृत स्वरूप नसल्याने त्याबाबतच्या व्यवहारांना सुरक्षितता नाही. आपल्याकडे आभासी चलनासंबंधात स्पष्ट कायदे कानून आणि कार्यपद्धती अद्याप अस्तित्वातच नसल्याने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..