नवीन लेखन...

ईश्वरी संकल्पना… उच्चशक्ती (बेवड्याची डायरी – भाग २०)

सरांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या दुसऱ्या पायरीत दर्शवलेल्या उच्च्शक्ती बद्दल माहिती देताना सांगितले की..” बहुतांशी वेगवेगळ्या धर्मानी .. पंथांनी ..मानवसमूहांनी ..त्यांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे गोष्टी घडवणारा ..सर्व सृष्टीवर नियंत्रण करणारा ..कणाकणात वसलेला…पाप पुण्याचा हिशोब ठेवून फळ देणारा ..कोणीतरी स्वामी ..आहे हे सांगितले आहे ..तसेच अनेक धर्मांनी स्वामीला अथवा ईश्वराला प्रसन्न करण्याचे ..त्याची पूजा अर्चा करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत ..तो एकच आहे ..त्याला मानवानी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहून धर्मात ..पंथात वाटला आहे …असेही म्हंटले जाते..गोंधळ हा असतो की ज्याला कोणी प्रत्यक्ष पहिला नाहीय ..तरीही ‘ तो ‘ आहे ..त्याचे अस्तित्व आहे हे मानले जाते ..अशा या परमेश्वराला जाणून घेणे म्हणजे एक कसरतच आहे …

या ईश्वराची साकार सगुण आणि निराकार निर्गुण अशी दोन रूपे हिंदुत्वात मांडली गेली आहेत ..आपण खूप खोलात न जाता किवा या कल्पनेचा कीस न काढता सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने हे समजून घेतले पाहिजे ..त्यासाठी जर शास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर केला तर धार्मिक वाद न उदभवता किवा ईश्वर आहे किवा नाही हा वाद न घालता आपल्याला कोणीतरी उच्च्शक्ती या सृष्टीत कार्यरत आहे ..नियमबद्ध सुसूत्र पद्धतीने त्याचे कार्य चालते ..तसेच आपल्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणारे त्या शक्तीचे नियम आपण समजून घेवू शकू ..या शक्तीला आपण निसर्ग असे म्हणूयात ..निसर्ग म्हंटले की देव ..अल्लाह ..गाँड …असे सगळेच यात येतात .. या निसर्गाचे नियम आपण समजावून घेतले… स्विकारले नक्कीच निसर्गाच्या मदतीने आपल्याला आपले जीवन व्यसनमुक्तीकडे ..शांती ..समाधान ..प्रसन्नतेकडे सहजतेने नेता येईल ..यालाच उच्चशक्तीची मदत घेणे म्हणता येईल ..असे सांगत सरांनी निसर्गनियमांचे पालन ..त्यांची अपरिहार्यता ..याबद्दल ..सांगण्यास सुरवात केली .

१ ) सृष्टीची निर्मिती झाल्यावर सर्व जीव सृष्टी निर्माण होण्यास होण्यास पृथ्वी ..अग्नी ..जल… वायू ..आकाश ही पंचमहाभूते कारणीभूत आहेत हे शास्त्राला मान्य आहे ..चल..अचल , सजीव -निर्जीव , अशा सर्व घटकांच्या निर्मितीला ही पंच महाभूते जवाबदार आहेत ..आपले शरीर देखील याच घटकांनी बनलेले आहे ..या पंच तत्वांचे प्रमाण शरीरात विशिष्ट असे आहे ..जेव्हा जेव्हा ते प्रमाण कमी जास्त होते तेव्हा ..आजार निर्माण होतात ..तेव्हा आपल्या शरीराची योग्य काळजी घेणे ..शरीराचे संवर्धन करणे ..हे आपले नैसर्गिक कर्तव्य आहेच ..

२) जन्म – मृत्यू , भरती- ओहोटी , दिवस- रात्र , अपघात ..नैसर्गिक आपत्ती ..हे निसर्ग नियम आहेत ..तसेच सुख -दुखः , मिलन – विरह , बालपण ..तारुण्य ..प्रौढावस्था ..जरा ..व्याधी ..मृत्यू या अवस्था देखील या निसर्गनियमांवर आधारित आहेत …मानव जेव्हा जेव्हा या नियमांना नाकारतो ..हे नियम समजून घेत नाही ..पालन करत नाही ..या नियमांना आव्हान देतो ..तेव्हा तेव्हा त्याला संकटांचा सामना करावा लागतो …

३) इतर प्राणी आणि मानव यातील प्रमुख फरक हा आहे की निसर्गाने मानवाला इतर प्राण्यांपेक्षा कुशाग्र अशा बुद्धीचे वरदान दिले आहे तसेच त्या बुद्धीचा वापर करून जीवन अधिक सुखकर ..आरामदायी करण्यासाठी ..चातुर्य ..आकलन क्षमता ..तसेच मनातील विचार अमलात आणण्यासाठी योग्य असे उपयुक्त अवयव दिले आहेत …परंतु मानवाने त्याच्या निसर्गदत्त अशा काम ..क्रोध ..लोभ ..मद ..मोह ..मत्सर या विकारांमुळे स्वतच्या अहंकाराला खतपाणी घालून सारी सुखे मिळावी या अट्टाहासाने बुद्धीचा गैरवापर करून स्वतःसाठी आणि सर्व सृष्टीसाठी अनेक समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत …

४) या सृष्टीत ‘ आपोआप ‘ असे काहीच घडत नाही तर प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कार्यकारण भाव असतो ..म्हणजेच न्यूटनच्या क्रिया – प्रतिक्रिया या सिद्धांतानुसार हे कार्य चालते …आपल्या प्रत्येक कृतीची काहीतरी प्रतिक्रिया निसर्गात निर्माण होत असते ..जर योग्य कृती असेल तर योग्य अशी प्रतिक्रिया मिळते ..विपरीत कृती करणाऱ्यांना विपरीत प्रतिक्रिया मिळते या प्रतिक्रिया भावनिक ..शारीरिक ..सामाजिक ..कौटुंबिक अथवा भौतिकही असू शकतात .. ..राग.. द्वेष…प्रेम ..स्नेह ..जिव्हाळा ..या प्रकारच्या सकारात्मक किवा नकारात्मक भावना देखील प्रतिक्रिया निर्माण करतात … ‘ कर्म आणि त्याचे फळ ‘ याच प्रकारचा सिद्धांत आहे हा ..फक्त एक गोष्ट महत्वाची आहे की काही क्रियांना ताबडतोब प्रतिक्रिया मिळते ..तर काही किर्यांचे फळ निर्माण होण्यास वेळ लागतो ..मात्र प्रतिक्रया अथवा फळ मिळणार हे नक्की …आपण व्यसन करायला सुरवात केल्यावर ताबडतोब त्या विपरीत कृतीचे फळ आपल्याला मिळाले नाही ..तर कालांतराने वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान होत गेले ..असेच व्यसन सोडल्यावर देखील चांगले फळ हळू हळू मिळणार आहे ..ग्लोबल वाँर्मिंग हे देखील मानवाने निसर्गनियम समजून न घेता स्वैर वर्तन केल्याचेच कालांतराने मिळणारे फळ आहे ..किवा एखादे फळ झाड आपण लावले कि जसे ताबडतोब त्याला फळे येत नाहीत ..त्याप्रमाणे चांगल्या कर्माचे फळ मिळण्यास देखील अवधी द्यावा लागतो…

५) या निसर्ग नियमांना कोणीही अपवाद नाहीय ..जेव्हा जेव्हा निसर्गनियम मोडले जातील ..नाकारले जातील ..पायदळी तुडवले जातील ..तेव्हा तेव्हा मानवाला दुखां:चा सामना करावाच लागेल ..म्हणून या निसर्ग नियमांना स्वीकारून ..योग्य प्रकारे समजून घेवून आपण स्वत:चे जीवन अधिक सुखी करू शकतो ….

हे नियम सांगत सरांनी आता आपल्या व्यसनाधीनतेशी किवा व्यसनमुक्तीशी या नियमांचा कसा संबंध येतो ते उद्या सांगतो असे म्हणून समूह उपचार थांबवला ..आम्हाला सर्वाना डायरीत लिहायला एक प्रश्न दिला ‘ आपण निसर्गनियमांचे पालन करण्यात कोठे कोठे चूक केली असे असे आपल्याला वाटते ? ‘..सगळे जरा अवघडच वाटले मला ..पण थोडा थोडा उजेड पडत होता …

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

1 Comment on ईश्वरी संकल्पना… उच्चशक्ती (बेवड्याची डायरी – भाग २०)

Leave a Reply to सदाशिव जंगम Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..