नवीन लेखन...

‘अभंगवारी…!!’

आषाढ सुरु होतो तोच वारी चे वेध घेऊन…!! आम्ही सुद्धा गेलो होतो वारीला…!हे दुसरं वर्ष आमचं!! नोकऱ्या… शाळा कसं काय जमणार २१ दिवसांचा वारीचा सोहळा अनुभवायला वैगरे सारखे प्रश्न गेल्यावर्षी पासून अडगळीत गेले ते गेलेच…. माऊलीला भेटण्याची आमची इच्छा आणि तितकीच माऊलीची सुद्धा !!! अहो…जिथे जगतनियंता पाठीशी उभा तिथे इतर चिंता उभ्या राहतायत होय ? हां … थोडा वेगळा केला प्रवास आम्ही पण वारी करून पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवून आलो हे हि खरंय !!

सामानाची बांधाबांध करता करता वारकरी गेल्यावर्षीची वारी मनातून जगत असतो… आम्ही सुद्धा गेल्या वर्षीच्या आठवणीत रमलो..पांढरे सदरे ..उपरणी सगळी छान तयारी करून ठेवली आणि वारी ची चाहूल लागल्याबरोबर लगेच bookmyshow वर जागा धरून ठेवल्या… दिंडीत कसं काही वारकरी पुढे जाऊन पाल (तंबू)रोवून ठेवतात ना!!…हो नंतर उगाच प्रॉब्लेम नको ना? आणि आमची ठरलेली दिंडी बरं का .. काही ठरलेले… काही नवीन जोडले गेलेले वारकरी असे सगळे एकत्रच जातो आम्ही..!! एकमेकांच्या मनातल्या विठ्ठलाला अनुभवत… स्वतःच्या अंतरंगातल्या विठ्ठलाची अनुभूती घेत घेत त्या विठ्ठलाच्या वारी चा आनंद म्हणजे स्वर्गसुख !! जिवंतपणी मोक्ष अनुभवणं म्हणजे काय ते हे २१ दिवस शिकवून जातात आम्हाला!! आळंदीला कळस हलला आणि पालखीप्रस्थान झालं कि मग … भेटी लागी जिवा लागलीसे आस !! ऊन..वारा..पाऊस कशाचीही तमा न बाळगता अखंड नामघोषात मन तल्लीन होऊन जातं ! रोजच्या जबाबदाऱ्या..मुलांच्या शाळा… स्वतःच्या नोकऱ्या या ऊन.. वाऱ्या… पावसासारख्याच आडमार्गी होत्या पण माऊली ने या सगळ्याचा भार सांभाळलेला होता त्यामुळे आम्हालाही विशेष चिंता नव्हतीच या कशाची!! वारीत वारकरी मोकळ्या वेळात सुद्धा नामस्मरण करीत असतात तसाच आमच्या whatsap गप्पांमधून पांडुरंग रंगू लागला ..तो रंगला आणि आम्हालाहि रंग चढू लागला त्याच्या भक्तीचा! असाच प्रवास करत करत दिवेघाट… जेजुरी…अगदी वाखरी पर्यंत येऊन पोहोचलो…सगळ्या दिंड्या एक होऊन माऊली भेटीला जातात तसंच पुणे-मुंबई अशी सगळी मंडळी आम्ही एक झालो.. पुढे चंद्रभागा तीरावर पुंडलिकाचं मंदिर दिसलं आणि साद आली … “आलोच!!” नवखे वारकरी ना आम्ही सगळे!..देवदर्शन नीट व्हायला हवं ना ! आणि पुंडलिका खेरीज कोण भेट घडवून देणार माऊलीची आम्हाला?? एव्हाना आमच्या आषाढीचा दिवस उजाडला…आज माऊली ची भेट होणार हि भावनाच हृदयात उफाळून येत होती सारखी…आणि पावलांनी वाट धरली……… षण्मुखानंदची!!!!

एरवी साठी ऑडिटोरियम पण आज मात्र सगळ्यांसाठी मंदिर बनून गेला…! त्यात प्रवेशताच गंध… बुक्क्याच्या टिक्याने अंतर्बाह्य विठ्ठलमय झालो…! वेगवेगळे वेष परिधान केलेले… वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सगळे पण कपाळावरच्या तो एक टिळा इतका उठून दिसत होता कि आम्ही सगळेच आता भागवत !! राम कृष्ण हरी कानावर आलं आणि स्तब्ध झालो …संथ लयीच्या नामस्मरणापासून ते गजर होई पर्यंत!!!जणू काही भगवंताचं विश्वरूप दर्शन घडत होतं…स्वराभिषेक होत होता माऊलीच्या पायावर!!!

राम कृष्ण हरी ने वातावरण भरून टाकलं तिथलं!! अभंगरसात न्हाऊन निघत असतानाच कर्नाटकातून दिसणारा विठ्ठल सुद्धा अनुभवला !…विश्वरूप पाहून थक्क झालेल्या मनाने हात जोडले गेले आणि रंध्रा रंध्रा ने नामघोष केला …… जगदोद्धारणा!! विठ्ठल आता पुरेपूर सामावला मनामध्ये….. ‘आता अंतरंग झाले पांडुरंग……..’ हे शब्द जगला तिथला प्रत्येक जण!! आता तिथे बाकी कोणीच उरलं नाही… गायक नाही… वादक नाही…रसिक नाही… तिथे कणाकणात होता फक्त आणि फक्त ‘विठ्ठल’!! अभंगशृंखला सुरु झाली… नामदेव पायरीच दर्शन घेऊन एक एक पाऊल माऊलीच्या गाभाऱ्याकडे जाऊ लागलो !! माऊलीचं साजरं रूप डोळे भरून अनुभवलं आणि विठ्ठला…. मायबापा … आमच्या मनातल्या भक्तीचा सूर असाच निरागस राहो ही प्रार्थना करून त्याच्या पायावर नतमस्तक झालो!!

मोरया इंटरटनमेंट Morya Entertainment(पुणे) आणि Mukesh Patil ventures (मुंबई ) या दोन पालख्यांनी आमची आषाढवारी…. ‘अभंगवारी’ घडवून आणली !! गेली ४ वर्ष ज्यांच्या स्वरांमधून या वारीची ओढ लावली आणि पुंडलिकाच्या भक्तिभावाने ज्या स्वरांनी आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घडवून आणलं ते म्हणजे आमचे सर! या वर्षीच्या सोहळ्याचं अजून एक वैशिष्टय म्हणजे वैभव जोशी यांनी लिहिलेली आणि प्राजक्ता माळी यांनी निवेदनातून ती उत्तमरीत्या साकारलेली संहिता !! माऊलीच्या गळ्यात नानाविध अलंकार असले तरी तुळशीहाराने माऊलीचं रूप खुलून दिसतं. या वर्षी Soniya Saanchi दि ने सरांसाठी बनवलेला कुर्ता म्हणजे सरांच्या स्वरांमधून अनुभवलेल्या भक्तीचं ‘मूर्त स्वरूप’ भासला!!

वारीत चालणं हे भाग्यच पण कर्तव्यात बांधले गेलेल्यां आमच्यासारख्यांच्या धावपळीच्या आयुष्याला वारीचा रंग देऊन विठ्ठला दर्शनाची अनुभूती देणारे सरांचे स्वर….म्हणजे माऊलीने आम्हाला दिलेली सगळ्यात गोड आणि मौल्यवान भेट !!

आज तिथून परतणाऱ्या प्रत्येक पावलाने मनात हा स्वररूपी विठ्ठल सामावून घेतला आणि प्रत्येकाच्या मनातल्या शुद्ध भक्तीभावनेने न्हाऊन निघालेला हा सोहळा संपन्न झाला ती पुढल्या वर्षीची वारीची आस घेऊनच !!

©अपर्णा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..