नवीन लेखन...

यशाला शॉर्टकट नसतात! – अभयसिंह मोहिते सर

एमपीएससीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील कचरेवाडी-मंगळवेढे इथला अभयसिंह मोहिते राज्यात प्रथम आला आहे. इथवरच न थांबता त्याला यूपीएससीची परीक्षाही द्यायची आहे.

निकालाची बातमी ऐकल्यावर नेमकं काय वाटले ?
मला आणि आई-वडीलांना अतिशय आनंद झाला. मला यशाची खात्री होतीच. पण प्रथम क्रमांक येईल असं वाटलं नव्हतं. आईला या स्पर्धा परीक्षेविषयी फारशी माहिती नाही. पण आपल्या मुलाने काहीतरी मोठं यश मिळवलं आहे याचा आनंद तिच्या डोळ्यातून दिसत होता.

अभ्यासाचे नियोजन कसं केलं ?
मी कोणतीही शिकवणी लावली नव्हती. स्वअभ्यासावरच मी हे यश मिळवलं आहे. विविध दर्जेदार पुस्तकं, अवांतर वाचन, वर्तमानपत्र यांचं नियमित वाचन केलं. लायब्ररीतून या परीक्षेसंबंधी अनेक पुस्तके शोधली. अशा स्पर्धापरीक्षांना बसणाऱ्या इतर मित्रांचंही खूप सहकार्य लाभलं. मी कधीही लवकर उठून किंवा रात्री जागून अभ्यास केला नाही. त्यापेक्षा दिवसभरात मिळणाऱ्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल, याकडे लक्ष दिलं. मोबाईलवर कमीत कमी वेळ घालवणं, टाइमपास करण्याऐवजी अभ्यास आणि पुरेशी विश्रांती असा दिनक्रम ठेवला.

अभ्यास करताना कोणत्या अडचणी आल्या ?
मी याआधीही दोनवेळा या परीक्षेला बसलो होतो. आधीच्या प्रयत्नात अपयश आले तेव्हा वाईट वाटलं. आपण कमी पडतोय अशी भावना मनात निर्माण झाली. पण ज्या विषयांमध्ये अपयश आलं त्यांचा अधिक अभ्यास केला. चुकांचे विश्लेषण करून त्या टाळण्याचा प्रयत्न केला.

नोकरी आणि अभ्यास हे दोन्ही एकाचवेळी कसं सांभाळलं ?
मी २०११ साली विक्रीकर निरीक्षक आयुक्त आणि २०१३ ला सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर नियुक्त झालो. परंतु ही नियुक्ती होण्याआधीचे दिवस मी अभ्यासाचा पाया पक्का केला होता. नोकरी करताना संध्याकाळी मिळणाऱ्या ४-५ तासांचं अभ्यासासाठी योग्य नियोजन केलं.

स्पर्धापरीक्षांमध्ये लेखी परीक्षेबरोबरच मौखिक चाचणी हा महत्वाचा भाग असतो. त्यासाठी काय मेहनत घेतली?
विविध तज्ज्ञमंडळींकडून आणि सिनियर्सकडून मला मौखिक चाचणीसाठी मार्गदर्शन मिळालं. अनेक मॉक इंटरव्ह्यूज मी दिले. त्यातून हावभाव आणि उच्चार यात योग्य त्या सुधारणा करू शकलो. कारण उच्चारांबरोबरच तुमच्या चेहऱ्यावरील भाव आणि शारीरिक हालचाली यांतून अनेक गोष्टी दिसत असतात.

इंजिनीअर असूनही प्रशासकीय सेवाक्षेत्राकडे कसा वळलास?
इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना माझ्या मनात या क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण झालं. मशिन्सच्या सान्निध्यात करिअर करण्यापेक्षा लोकांशी संवाद साधावा आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी भावना मनात निर्माण झाली. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो.

स्पर्धापरीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील?
मी त्यांना एकच गोष्ट सांगेन, दोस्तांनो, यशाला शॉर्टकट नसतो. कष्टांना पर्याय नाही. अपयशाचा न्यूनगंड बाळगू नका. सततचा सराव आणि यश मिळविण्याची अंतर्गत प्रेरणा खूप महत्वाचे आहेत. प्रामाणिक प्रयत्न केल्यावर यश मिळतंच.

प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजासाठी काय करणार आहेस?
मी कॉम्प्युटर इंजिनीअर आहे. सध्या प्रशासनात सुरू असलेल्या कॉम्प्युटरायझेशन प्रक्रियेचं महत्वही मी जाणून आहे. मी यासाठी अधिकाधिक प्रयत्न करेन. त्यातून वेळ वाचेल आणि प्रशासनात पारदर्शकता येण्यास मदत होईल. तसंच शिक्षणक्षेत्रासाठी काही काम करावं अशी माझी इच्छा आहे. मी ज्या भागातून आलो आहे, तिथे अजूनही शिक्षणासाठी फारसं पोषक वातावरण नाही. आपल्या देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आजही आहे. ती मला बदलायची आहे. शिक्षण प्रसारासाठी मी जास्तीजास्त प्रयत्न करेन.

इतर आवडी-निवडी काय आहेत ?
मला ट्रेकिंग आवडतं. मला रोजच्या कामांसाठी लागणारा उत्साह आणि उर्जा त्यातून मिळते.

– दीपक गायकवाड

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..