नवीन लेखन...

मिठास जागा, मिठावर जगू नका

श्रीकृष्ण रुक्मिणी एकांतात गप्पा छाटत होते, अचानक रुक्मिणी लाडात येऊन म्हणाली, मी तुम्हाला कशी आहे असे वाटते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले, रुक्मिणी काय सांगू तुला, तुझे महत्व माझ्यासाठी अनमोल आहे, तू अगदी मिठासारखी आहेस.

का………..य, मी मिठासारखी खारट वाटते तुम्हाला, आणि मुसमुसून रडायला सुरवात झाली. श्रीकृष्ण तिला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण रुक्मिणी काही केल्या शांत होईना. शेवटी कृतीने दाखविण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर, श्रीकृष्ण पुढे काही न बोलता तिथून निघून गेले.

ते तडक भटारखान्यात गेले, सर्व आचाऱ्याना सक्त ताकीद दिली, कि आज पासून कोणत्याच खाद्य पदार्थात मीठ टाकायचे नाही, हे ऐकून भटारखान्यातील सर्व कर्मचारी स्तब्ध झाले. दुसऱ्या दिवशी सार्वजनिक जेवण होते, राज्यातील, थोर लोक या खास भोजनास आमंत्रित होते. सर्व पंच पक्वान्ने करण्यात आचाऱ्यांनी कोणतीच कमतरता दाखवली न्हवती.

श्रीकृष्ण रुक्मिणीला सर्वाना जेवणाचा आग्रह करण्यासाठी विनंती करून दुसऱ्या कक्षात निघून गेले. सर्व पाहुणे जेवायला बसले, परंतु पहिला घास तोंडात घालताच सर्वांची तोंडे वाकडी झाली. साक्षात महाराणी सर्वांच्या समोर जातीने हजार होत्या, पण कुणालाही जेवण घशाखाली उतरत न्हवते. हळूहळू पाहुण्यांनी कुजबुज सुरु केली, व मीठ मागण्यास सुरवात केली. वाढपी सर्व जिन्नस वाढायला तयार होते, पण मीठ कोणीच द्यायला तयार न्हवते. रुक्मिणीच्या काय होतंय समजेना, कुणीही स्पष्ट बोलेना व नीट जेवताना दिसेना.

शेवटी रुक्मिणी स्वतः भटारखान्यात जाऊन पदार्थांची चव घेऊ लागल्या, तर लक्षात आले, कशातही मीठ न्हवते. मुख्य आचाऱ्याला याचे कारण विचारता, त्यांनी महाराजांची तशी ताकीद आहे असे सांगून, मीठ वाढणार नाही असे स्पष्ट सांगितले.

रुक्मिणी तडक श्रीकृष्ण बसलेल्या कक्षात गेल्या, व त्यांच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. काय हे मिळमिळीत जेवण बनवायला सांगितले आहे, कोणत्याही पदार्थात मीठ नाही, कोणीही आनंदाने जेवत नाही, आणि तुम्ही त्या सर्वांच्या समोर मला धाडून इथे आराम करत आहात. श्रीकृष्ण तिला पाहून गालातल्या गालात हसत होते, म्हणाले कसले जेवण म्हणालीस, परत म्ह……ण. हो……हो मी म्हणत आहे मि…ळ…मि…..ळी….त, चव रहित जेवण का बनवायला सांगितले?

श्रीकृष्ण म्हणाले मी उत्तम स्वयंपाक बनवायला सांगितला होता, सर्व उच्च प्रतीचे मसाले बनवून स्वयंपाक केला आहे, त्या मुळे स्वयंपाक चांगला झालेला आहेच, यात कोणतीच शंका नाही. हं, मी फक्त कशातही मीठ टाकू नका इतकेच सांगितले, पण त्याने काय फरक पडतो, इतके सुरेख मसाले, उच्च प्रतीचे धान्य, व राज्यातील नामवंत आचारी जर जेवण बनवत असतील तर फक्त मीठ ते हि चिमूटभर न टाकल्यामुळे जेवण का मिळमिळीत होणार आहे?

आता तुला समजले असेलच मिठाचे महत्व, जेवणात मीठ नसेल तर सर्व मिळमिळीत लागणार यात शंका नाहीच, हे सिद्ध करायचे होते म्हणून हा घाट घातला. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, काल मी तुला मिठासारखी आहेस म्हणालो, तर तू रागावलीस, रुसून बसलीस, मग तुझे माझ्या जीवनातील महत्व काय आहे हे समजविण्यासाठी, मला हे सर्व करावे लागले. माझ्या जीवनात सर्व काही उदात्त आहे, पण तू मिठासारखी असल्यामुळे या जीवनाला एक उत्तम चव आलेली आहे, व त्याचा आनंद मी उपभोगतो आहे. जाऊ…दे, आपले संवाद नंतरही सुरु राहतील, आधी आचाऱ्याना बोलाव, मी सर्व पदार्थात मीठ टाकायला सांगतो, पाहुणे मला नावे ठेऊदेत, पण त्या अन्नाला नको, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.

रुक्मिणी आता वरमली, म्हणाली नाथ काल मी जे रागावले ती माझी चूक झाली. असो, मीठ अन्नात हवेच पण ते चवी पुरते… हे मला पूर्ण उमगले..असे म्हणत भटारखान्यात निघून गेली.

आपल्या जीवनातही आपले वागणे चिमूटभर मिठासारखे असावे, मुलीच्या किव्वा मुलाच्या आई वडिलांनी चवीपुरते मुलांच्या संसारात लक्ष घालावे. आई वडिलांनी मुलांच्या संसारात अती लक्ष घातल्यामुळे ते मोडकळीस आलेले आज दिसून येतात, याचे कारण अती लुडबुड हि मिठाच्या खड्यासारखी खारटपणा आणते, त्याने मुलांचे जीवन बेचव होते, हीच गोष्ट सर्वांच्या जीवनाला लागू होते.

आता आरोग्याबाबतही मिठाचे महत्व अनन्यसाधारण आहे, अती तिथे माती हे मिठास योग्य तर्हेने लागू होते. अती मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतो, हे लक्षात ठेवा, जेवणात वरून मीठ शक्यतो टाळाच.

मिठास जागा, मिठावर जगू नका…..

विजय लिमये
(9326040204)

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..