नवीन लेखन...

खऱ्या माणसाची पारख (कथा)

बऱ्याच दिवसांनी आपल्या साथीदारांसह वृद्धाश्रमात गेलो. मी आणि माझे साथीदार थोडे पैसे जमा करून वृद्धाश्रमातील लोकांना जेवण आणि थोडे कपडे घेऊन वर्षातून दोन तीनदा वृद्धाश्रमात जातो. आज ही या निमित्ताने मी आणि माझे साथीदार वृद्धाश्रमात निघालो. वृद्धाश्रमात पोहोचल्यावर तेथील वृद्धाश्रम चालवणाऱ्या मुख्य व्यक्तीची जेवण व कपडे वृद्धांना वाटप करण्यासाठी परवानगी मागितली. त्यांनी लगेच आमची विनंती स्विकारली आणि वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध व्यक्तींना मैदानात बोलवले. त्या वृद्धाश्रमात आधीपासून आम्ही जात असल्याने त्या सर्वांना आमची ओळख होती. परंतु सर्वांना माहिती देण्यासाठी त्यांनी आमची ओळख व आम्ही वृद्धाश्रमात काय करण्यासाठी आलो आहोत तेही सांगितले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आम्ही त्यांना सांगितले,”सर्व लोकांना हॉलमध्ये बसवा.” सर्व जण ओळीमध्ये बसले, आम्ही जेवण वाढण्यास घेतले सर्वांच्या चेहरा तेजस्वी व आनंदी होता.

सर्व जण मनसोक्त जेवत होते. पण एका कोपऱ्यात एक महिला अगदी भित भित जेवण करत होती. अगदी चेहऱ्यावर डोक्यावरचा पदर झाकला होता जेणे करून कुणाला चेहरा दिसू नये. कोणी काही घेण्याचा आग्रह केला तरी त्याला उत्तर देत नव्हती, कुणाकडे जेवण ही मागत नव्हती दिलं ते खात होती. ते पाहून मी त्यांच्या पाशी गेलो पण त्यांचा काही चेहरा दिसला नाही. सगळ्यांनी आपले जेवण केले. आम्ही कपडे वाटप करण्यास सुरुवात केली. सर्वजण एका ओळीत उभारले होते. पण ती महिला कपडे घेण्यास काय आली नाही. आम्ही त्या महिलेचे कपडे तेथील कर्मचाऱ्यांकडे देऊन त्या महिलेस देण्यास सांगितले. कपडे वाटप झाले आम्ही तेथून निघण्यास तयार झालो. बागेतून आम्ही निघत असताना मला ती महिला एका बाकावर बसलेली दिसली. मी त्यांच्याकडे पाहत माझ्या मनात विचार आला की, ‘मी यांना कुठे तरी पाहिले आहे, पण आठवत नाही’ मी विचार करून त्यांना आठवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा चेहरा अगदी काळा, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. तेवढ्यात माझ्या साथीदारांनी मला त्या विचारातून बाहेर काढले आणि म्हणाले,”चला आता घरी इथे कशासाठी थांबला आहेस चल” मी त्यांना पुढे जाण्यास सांगितले.

तेवढ्यात मला त्या महिलेचे नाव आठवले. मी पटकन आपली स्टीक (दिव्यांगाची काठी) ने चालत त्या बाकापाशी गेलो. ती महिला तेथून निघण्याचा प्रयत्न करत होती. मी त्यांच्यापर्यंत पोहचे पर्यंत त्या निघाल्या. मी त्यांना ‘आशा काकी’ म्हणून हाक मारली. त्यांनी पटकन मान मागे वलवली. त्यांनी मला विचारले,”तुम्ही मला शेवटी ओळखले.” त्या माझ्या ओळखीच्या होत्या. त्यांचा मुलगा अजय आणि मी खास मित्र होतो. ‌त्यांची माझी ओळख अधिपासून होती. पण त्या या वृद्धाश्रमात काय करण्यासाठी आल्या होत्या हे मला माहीत नव्हते. मी त्यांना विचारले की,”तुम्ही इथे कशा काय?” त्यांनी मला अगदी शांत शब्दात सांगितले,”तु म्हणत होतास ते खरे आहे की माणसाने रूप रंगाने चांगला असण्यापेक्षा मनाने चांगले असणे महत्त्वाचे आहे. मी नेहमी माणसाच्या रूपाला, रंगाला, देहाला, संपत्तीला महत्त्व दिले‌ पण मी माणसाचा स्वभाव, वागणूक, विचार,मन कधीच पाहिले नाही म्हणून तर माझी आज ही अवस्था झाली.अजयच्या लग्नानंतर काही दिवसांनंतर अजयचे बाबा वारले. त्यांच्या मृत्यू नंतर अजयच्या अंगावर कंपनीची आणि घराची जबाबदारी सोपवली त्यानंतर आमच्यात सारखे वाद व्हायचे या वादातूनच मला सूनने आणि अजयने घराच्या बाहेर काढलं सून सुंदर, सुशिक्षित आहे पण मनाने कुरुप होती. ना तीनं कुणाचा म्हणने ऐकले ना कुणाचा विचार केला. तेव्हा मला अशा स्वभावाची जाणिव झाली, नंतर सुननं अजयला सांगून मला घरा बाहेर काढण्यासं सांगितले. अजय देखील तिच्या बाजून.” हे ऐकून मला थोडे दु:ख वाटले त्यांचे जे आधीचे विचार ते पाहून मला त्यांचा थोडा राग आला होता पण त्याची त्यांना आता शिक्षा मिळाली आहे.

मी आणि अजय मित्र असल्याने मी आशाकाकींच्या घरी जायाचो. त्याचे घर खुप मोठं आणि सुंदर होते, अगदी राजवाड्यासारखे त्याचबरोबर त्यांची कंपनी ही होती. त्याच्या घरी त्याचे बाबा, आई (आशाकाकी), बहीण आणि अजय राहत होते. पण आशा काकी खूप घंमडी आणि दुसऱ्याला खूप कमी लेखायच्या, त्यांना काळी रंगाची, अपंग व्यक्ती अजिबात आवडत नव्हती परंतु मी अजयचा मित्र असल्याने ते माझ्याशी चांगले वागायचे पण त्यांचे वागणे हे नाटक होते हे मला काही दिवसांनंतर कळलेच. अजयच्या घरातील सदस्य अजयचे लग्न ठरवू लागले. अजयला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. अजयच्या आईच्या म्हणजे आशा काकीच्या काही मुली बद्दल अपेक्षा होत्या. त्यांना मुलगी गोरी, श्रीमंत घराण्याची, हुशार, अन्नपूर्णा असावी. मुलगी काळी, गरिब, अशिक्षित , अपंग तर मुळीच नसावी. अशा या अपेक्षेतून मुलगी शोधण्यास सुरुवात चालू झाली. चार-पाच मुली पाहून झाल्या. आशा काकींनी काय पसंत केली नाही. फक्त चुका काढल्या. ही मुलगी काळीच आहे, ही अशिक्षित, ही अपंग आहे, ह्या मुलीच घरदार गरिबच आहे. अशा प्रकारे मुलींच्या चुका काढल्या. माणसाची पारख ही त्याचे विचार, मन पाहून करावी त्याचे रुप रंग, संपत्ती पाहून नाही. पण हे आशा काकीला कोण सांगणार, त्या आपल्याच तोऱ्यात. शेवटी आशा काकीच्या मनासारखी मुलगी मिळाली. रुपाने-रंगाने देखणी, श्रीमंत घराण्यातील, जास्त शिकलेली खूप चांगली होती. आपल्या अजयला देखील ही मुलगी आवडली. अजयचे या मुलीशी लग्न करायचं ठरले. लग्नाची तयारी सुरू झाली. या लग्नाच्या काळावधीत आम्ही मित्र अजयच्या घराकडे राहण्यासाठी गेलो.

लग्नाचा दिवस उजाडला, नवरदेव घोड्यावर स्वार होण्यास तयार झाला.‌ आम्ही मित्रमंडळी नवरदेवाला घेऊन लग्नाच्या हॉल मध्ये गेलो. त्या लोकांनी लग्नातील सर्व विधी, कार्यक्रम सुरू केले. तो लग्नाचा हॉल पाहून आमचे डोळे आश्चर्य चकित झाले. काय ती मंडपाची सजावट, काय त्या लाईटा अगदी टी.व्ही ला दाखवतात तशी सगळी सजावट होती. मोठ्या दिमाखात लग्न झाले. त्यांची श्रीमंती अगदी सगळीकडे दिसत होती. अजयचे लग्न मस्तपैकी झाले. लग्नानंतर आम्ही मित्रमंडळी तिथून निघून गेलो. काही दिवसांनंतर अजय मला भेटण्यासाठी आला. त्यांचे भेटण्याचे काही विशेष कारण होते. त्याची बहीण रेश्मा डॉक्टर झाली होती. पण त्यांना त्याचा आनंद मुळात नव्हताच, त्यांची रेश्मा कडून अशी अपेक्षा होती की मोठी बिजनेसमन व्हावी. आपल्या वडिलांच्या कंपनीचा थोडा कारभार सांभाळावा. अजयला मदत करावी असे‌ त्यांना वाटत होते. परंतु रेश्माला डॉक्टर व्हायचे होते आणि ती डॉक्टरच झाली. तिने स्वतःचे छोटेसे हॉस्पिटल सुरू केले. तिला आईचा पाठिंबा नसला तरी बाबांचा पाठिंबा खूप होता. पण बाबा वारल्या नंतर तिला कोणीही पाठिंबा दिला नाही. हे पाहून ती घर सोडून गेली. पण डॉक्टर पद काही सोडलं नाही. असे अजयने मला सांगितले. नंतर मला अजयने घराकडे येण्यास सांगितले. बऱ्याच दिवसांनी अजयच्या घरी गेलो. अजयच्या घरी त्याची आई(आशा काकी) होती. मी त्यांना “अजय कुठे आहे? मला त्याला भेटायचे आहे” असे विचारले. अजयच्या आईने अगदी रागात सांगितले,”अजय नाही घरात तो आणि त्याची बायको बाहेर गेले आहेत.” “मी पुन्हा येतो” असे सांगितले. अजयच्या आईने उलट उत्तर दिले की,”तू पुन्हा इकडे येऊ नकोस आणि अजयला देखील पुन्हा भेटू नकोस” मी त्यांना विचारले, “तुम्ही असे का बोलत आहात” त्या म्हणाल्या,”हे आधीच बोलायला हवे होते, तुझ्या सारखी पाय मोडकी या घराच्या दारात सुद्धा उभा करत नाही. जा इथून नाहीतर वॉचमनला धक्के मारून घालवायला सांगेन.” मी क्षणभर ही न थांबता मी तिथून निघून गेलो. ते म्हणतात ना ‘स्वार्थी आणि घंगडी माणसाला दुसऱ्याची किंमत कधीच नसते.’ ही घडलेली हकीकत अजयला समजली आणि ‌त्याने मला फोन केला. पण या घटनेवर मला फारसे काही बोलायचे नव्हते तेव्हा तो विषय तिथेच संपवला. पुढे मी आणि अजय मोबाईल फोन वर बोलायचो पण त्यांच्या घरी मी पुन्हा कधी गेलो नाही. परंतु त्यांने आशाकाकीला बाहेर काढले आहे असे काही सांगितले नाही.

आशाकाकीची ही अवस्था पाहून त्यांचा पुरा इतिहास आठवला. मी आशा काकीला विचारले,”तुम्ही आश्रमात कसे आलात, तुम्ही मुलीकडे म्हणजे रेश्माकडे का गेला नाहीत.”आशाकाकीनी सांगितले,”मी मुलीकडे ही जाण्यास निघाले होते पण ती मला भेटली नाही, तिचा दवाखाना देखील दिसला नाही. नंतर मी वाट पाहून पाहून पार दमले. या पोटाची भूक भागविण्यासाठी मी अक्षरशः भिक मागितली. पण देवासारख्या माणसाला माझी दया आली आणि त्याने मला या वृद्धाश्रमात आणले. काही दिवसांनंतर मला कळाले की रेखा आता बाहेरच्या देशात मोठी डॉक्टर झाली आहे. ती खूप लांब गेली आहे त्यामुळे मी तिला भेटू शकली नाही.” आशा काकीची ही अवस्था पाहून मला दुःख वाटले. त्यांची ही परिस्थिती पाहवत नव्हती. मी त्यांना या अश्रामातून माझ्या बरोबर येण्यास सांगितले. पण त्या काही तयार होत नव्हत्या. त्या म्हणाल्या, “मी दुसऱ्यांच्या घरी राहणार नाही.” त्यांची खूप समजूत काढली, पण त्या काही ऐकत नव्हत्या. शेवटी मी त्यांना सांगितले,”मी तुम्हाला तुमच्या घरी अजय पाशी सोडतो, त्याला समजावून सांगतो.” हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पण त्यांनी मला विचारले, “पण मला अजयने आणि त्याच्या बायकोने पुन्हा बाहेर काढले तर? मला नाही तिकडे जायाचे.” मी त्यांना सांगितले, “अजय असा पुन्हा कधीच करणार नाही मी तुम्हाला शब्द देतो” हे ऐकून त्यांनी निघण्यास होकार दिला. मी त्या वृद्धाश्रमातून त्यांना नेण्याची परवानगी घेतली आणि आम्ही थेट आशाकाकींच्या हक्काच्या घरात जाण्यास निघालो.

आशाकाकींच्या घरी पोहचल्यावर घरामध्ये अजय आणि त्याची बायको होती. मी आणि आशा काकी घरामध्ये जाताच अजय आणि त्याची बायको आई म्हणून हाक मारत आमच्या कडे धावत आले. आशा काकींची आणि अजयची भेट झाली. अजयने आम्हाला आत नेले. आईची विचारपूस करू लागला. आशाकाकींने सर्वांची विचारपूस केली. तेवढ्यात आशाकाकींनी त्यांच्या कंपनीचा विषय काढला. अजयने आपली मान खाली घातली आणि म्हणाला,”आई तू गेल्या पासून आपली कंपनी सुरळीत चालत नव्हती, कर्ज भरपूर झाले होते. त्यामुळे मला आपली कंपनी विकावी लागली.‌ त्या पैशातून मी कर्ज फेडले थोड कंपनीतील कामगारांना पैसे दिले आणि राहिलेल्या पैशात मी बझार(मोठा बाजार) सुरू केला.” आशाकाकींना कंपनी विकल्याचे कळताच त्यांना दु:ख झाले, पण हे दु:ख फार काही काळ राहिलं नाही. तेवढ्यात त्यांची मुलगी रेश्मा आली.रेश्मा येताच तिची विचारपूस केली आणि तिला तू एवढ्या दिवस कुठे होतीस विचारले. तिने सांगितले,”आई, दादा मी खूप मोठी डॉक्टर झाली आहे. माझा स्वतःचा परदेशात मोठा दवाखाना आहे.” आशाकाकी म्हणाल्या,”खूप छान बाळा, मला तूझा खूप अभिमान वाटतो. पण दु:ख हेच की मी तुमच्या विरुद्ध वागले. मला माफ करा.” रेश्मा म्हणाली,”जाऊदे आई, झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुढं चालतं राहायचं.” तेवढ्यात आशाकाकी म्हणाल्या,”खरोखर मी खूप घमेंडी होती. मी कधी दुसऱ्यांचे ऐकत नव्हते, दुसऱ्याचा विचार करत नव्हते. माणसाचा मी स्वभाव, मन कधीच पाहिलं नाही, पाहिले ते फक्त माणसाचे रंग, रुप आणि संपत्ती. म्हणूनच तर मला हा वाईट काळ भोगावा लागला. खरच माणसाची पारख ही त्याचे रूप, रंग, संपत्ती पाहून करू नये, माणसाची पारख ही त्याचा स्वभाव, मन, विचार पाहूनच करावी.”

समाप्त

लेखक:- धनंजय एस. शिंदे

(कथा:- ‘पारख:खऱ्या माणसाची पारख’ ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

Avatar
About Dhananjay S. Shinde 1 Article
नमस्कार ? मी धनंजय एस. शिंदे. मी लिहिलेली कविता, कथा, प्रेरणादायी विचार पाहण्यासाठी www.dhananjaysshinde.blogspot.com ला फॉलो करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..