नवीन लेखन...

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी.

काय मिळते त्याना शरीराला एवढे कष्ट देवून ?. आणि कित्येक भक्तगण असे आहेत की जे त्या पंढरपूरची वारी दर वर्षी न चुकता करतात. हे केवळ मानसिक समाघान आहे कां ? कां ह्याला अंधश्रद्धा म्हणतां येईल ? विठोवा कोण ?, परमेश्वर कोण ? भक्ती म्हणजे काय ?, कशाने काय प्राप्त होते ?, असे एक नाही असंख्य प्रश्न आज तागायत अनुत्तरीत राहीलेले आहेत. ज्याला जसे ज्ञान प्राप्त झाले, जसे वातावरण मिळाले, त्या परिस्थितीप्रमाणे तो प्रश्नांची उकल करीत गेला. अनेक विचार परंतु एक वाक्यता केंव्हांच झाली नाही. विज्ञानाच्या शोध बुद्धिने इंद्रियांना जे कळले काहींनी त्याला महत्व दिले. तर कल्पनेच्या विचारांच्या झेपेमुळे सत्य काय असू शकेल, त्या अज्ञात शक्तींच्या अस्तित्वाला कांहीनी महत्व दिले. गम्मत म्हणजे ज्याचा शोध घेणे, ह्यात प्रगती करण्यापेक्षा, तथाकथीत विचरवंतच आपसांत संघर्ष करताना दिसतात.

माझ्या समोर आज तरी एक प्रश्न आला. जो मी वर व्यक्त केला. कां इतक्या प्रचंड संखेने लोक पंढरपूरला यात्रेसाठी जमा होतात. पंढरपूरलाच नव्हे तर कोणत्याही घार्मिक स्थळ यात्रेला, कुंभमेळाला लोक भक्तीभावाने जमतात. पन्नास, शंभर लोक संख्या असेल तर कदाचित अंधश्रद्धा हे नाव देवून स्वतःचे भावनिक सांतवन केलेही असते. परंतु जेंव्हा संख्या लाखोच्या घरांत जाते, तेंव्हा आश्चर्य व कौतूक पण वाटू लागते. कित्येक उच्च शिक्षित, वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणारे, विद्वान मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसतात. कांही तरी या मध्ये सत्य असेल, प्रेरणा असेल, जी इतक्या समुदायाला खेचून घेते.

पुंडलीक आणि विठ्ठोबाची जी घटना घडली, त्याचा मी गांभिरय़ाने विचार करु लागलो. निसर्गाचा सहभाग आणि मानवी योजना ह्यांत काय असतील ह्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. सारे कांही घडत असते ते निसर्गाच्या नियमाना धरुनच.

निसर्गाच्या तीन गुणधर्म वा नियममांचा मी विचार केला.

१ निसर्ग सदा सर्वकाळ निश्चीत व सत्य स्वरुपांत असतो. ( Nature is always regular )

२ निसर्गाचा मार्ग नेहमी चक्रमय ठरलेला असतो. म्हणूनच आपण जीवनाला जीवन चक्र म्हणतो. चक्र याचा अर्थ नैसर्गिक अविष्कार वा घटना घडतात, व त्याची पुनरावृत्ती होत राहते. जे घडले ते पुन्हा घडणे ही किमया ह्या निसर्ग चक्रामुळेच साधली जाते. (Nature repeats itself)

3 अत्यंत महत्वाचा गुणधर्म निसर्गांत दिसून येतो, तो म्हणजे नैसर्गिक चमत्कार. Miracle by Nature

काय अर्थ याचा ? केव्हां केव्हां निसर्ग- चाकोरीमध्ये अशी एखादी घटना घडते की त्याचा शोध बोध कदाचित् त्या झालेल्या क्षणी होत नसतो. सामान्यजन त्या घटनेला आश्चर्य समजतात. चमत्कार समजतात. दिव्यता भव्यता समजतात. परमेश्वराची अमर्याद शक्तीच हे करु शकते हे ठरवितात. थोडक्यांत चमत्कार आणि नमस्कार हे समिकरण जन्माला येवूं लागते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निश्चीतता येवू लागते. इत्यादी इत्यादी. परंतु एक मात्र सत्य दिसून येते ते म्हणजे निसर्ग एखाद्या घटनेमधून चमत्काराचे दर्शन घडवित असतो.

पौरानीक कथांचे ग्रंथ वाचताना भक्त पुंडलीकाची कथा वाचीत होतो. पुंडलीक एक महान व्यक्तीमत्व. एका प्रेरणेने भारुन गेलेले. आपल्या जन्मदात्या

आई-वडीलाना आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणारा. त्यांची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव समजणारा. ईश्वरी अस्तीत्वाला देखील त्याने माता पित्याच्या समोर दुय्यम स्थान दिले होते. कित्येक वर्षे त्याची माता पिता सेवा चालू होती. जीवनातील सर्वस्व त्यागुन फक्त आईवडील सेवा हे वृत त्याने धारण केले होते. त्याचे हे श्रम व प्रेम एवढे महान होवू तागले की ते ईश्वरी दरबारांत मान्यता प्राप्त होऊ लागले. ईश्वर नेहमी चांगल्या गुणांची सदैव दखल घेत असतो. हा अध्यात्मिक इतिहास आहे. सती सावित्रीची पतीभक्ती व सेवा ह्यानी देखील ईश्वराला झुकावेंच लागले. त्यांनी फक्त एक लक्ष्य केंद्रित केले होते. पुंडलीकाने केवळ माता-पिता सेवा-भक्ती वा सती सावित्रीने पती सेवा भक्ती. हेच त्यांचे सामर्थ्य परमेश्वराच्या प्रसन्नतेत झाले.

पुंडलीकाची माता पिता सेवाभक्ती यानी प्रेरीत होऊन परमेश्वराने त्याला श्री विठ्ठलाच्या रुपांत दर्शन देऊन धन्य केले. पुंडलीकाचे ह्रदय मन भरुन आले. त्याने सविनय नमस्कार केला.परंतु हाच त्याच्या भक्तीच्या कसोटीचा क्षण होता. ज्या क्षणी पांडूरंगाने पुंडलीकास दर्शन दिले, त्यावेळी पंढरपूर नजीक चंद्रभागेच्यातीरी, त्याचे आईवडील त्याच्या मांडीचा आसरा घेत झोपले होते. समोर उभा प्रत्यक्ष परमेश्वर श्री विठ्ठल आणि मांडीवर निद्रेत आईवडील. तो त्यांची झोप मोडू शकत नव्हता. शेवटी पुंडलीकाने विठ्ठलाला नमस्कार करीत, जवळ असलेली एक विट त्याच्या पुढ्यांत टाकून व त्याला त्यावर उभे राह्यण्याची विनंती केली. आईवडीलांची झोप चाळवली गेली. ते जागे झाले. त्याना ईश्वरी दर्शन होणे शक्यच नव्हते. कारण त्यांच्यात ते दिव्य सामर्थ्य नव्हते. त्यानी जाग येताच स्नानाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुंडलीकाने त्यांना मान देवून तो त्यांना चंद्रभागेतीरी घेऊन गेला. जाताना त्या परमात्म्याला श्री विठ्ठलाला विनंती केली की त्याने त्याच विटेवर उभे राहून पुंडलीक येण्याची वाट बघावी. तो आईवडीलांना स्नान घालून परत येईल.

आजतागायत आठ्ठाविस युगे झालेली आहेत. श्री विठ्ठल आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून, त्याच महान आईबाप सेवक भक्ताची पुंडलीकाची वाट बघत आहे. त्याच्या वाटेवर लागलेले विठ्ठलाचे डोळे आजही आम्ही सर्व बघून ईश्वर दर्शनाचा आनंद लुटतो. लाखो लाखोच्या संखेने तेथे जमा होतो.

निसर्गाचे वर वर्णन केलेले तीन नियम आणि पुंडलीक-विठ्ठलाची पौरानिक कथा याची कांही सांगड असेल कां ? हा विचार डोकाऊ लागला. एक चमत्कार झाला. एक आश्चर्य सर्वानी बघीतले, जाणले, अनुभवले. ईश्वर स्वरुप तर बघण्याची भव्यता कुणातच असण्याची शक्यता नव्हती. ती फक्त पुंडलीकातच होती. तोच ते भव्य दिव्य बघू शकत होता. परंतु त्या वेळच्या, त्या सभोवतालच्या अनेकांना फक्त त्या ईश्वरी चमत्कारांची चाहूल लागली असेल. एक प्रकाश, एक शितल आल्हादकारक वातावरण, बेहोष करणारा दरवळणारा सुगंध, एक उत्साहाची चैतन्याची लाट, समाधान शांतता यांच्या लहरी, हे सर्व त्या ईश्वर आगमन प्रसंगी एक झलक नितांत आनंद म्हणून झाले असेल. ज्याचे शब्दानी कुणालाही वर्णन करता येणार नाही. अशी वातावरण निर्मिती त्या क्षणी निर्माण झाली असावी. हा अनुभव कल्पनातीत व अप्रतीम असावा. पुंडलीकाने तो बघीतला, भोगला. इतरांनी कदाचित् त्यांचा संवाद, संपर्क, हाच एखादा नैसर्गिक चमत्कार वाटला असावा. जो की तो अनुभव इतर जन केंव्हाच विसरु शकणार नव्हते. क्षण शांत झाला, परंतु तो अनुभव कुणाच्याने सोडविना.

कालचक्राप्रमाणे वर्ष सरता, पुन्हा लोक त्याच ठिकाणी, त्याच वेळी जमा झाले. चाचपडत राहीले. शोध घेत राहीले. कारण जर तो आनंद चेतनामय चमत्कारी विलक्षण अनुभवी क्षण नैसर्गिक असेल, तर निसर्ग चक्रानुसार तो पुन्हा बरसेल. पुन्हा मिळेल. ह्या आशेत. त्याच जागी त्याच वेळी जो पुंडलीकावर बरसला. तसा कदाचित् पुन्हा बरसेल. प्रत्येकजण त्या नितांत आनंदाचा Ecstasy of Joy चा एक साक्षिदार, भागीदार, होऊ इच्छितो. त्याच्या दयेचा एखादा शिंतोडा कदाचित् आपल्याही अंगावर पडेल ह्या अपेक्षेने. त्याच भावनेने लाखोंच्या संखेने जमतात. त्याच स्थळी म्हणजे पंढरपूरला त्याच वेळी म्हणजे आषाढी एकादशीला, ज्या काळी पुंडलिकाला विठ्ठोबानी दर्शन दिले असेल. सर्व भक्त शोध बोध घेत असतात.

निसर्गाच्या नियमित, चक्रमय, आणि पुनुरावृत्ती ह्या गुणधर्मच्या शोधांत. आम्ही सर्वजण तेथे जमतो. तो निश्चीत बरसेल आणि तो बरसतो देखील. जो तो आपले नशिब आजमावतो. कुणावर तो बरसला असेल हे समजण्यास आजतरी मार्ग वा साधन नाहीत.

हेच त्या स्थळाचे ( पंढरपूर ) व वेळेचे ( आषाढी एकादशी ) महात्म्य असेल कां ? अशाच अनेक धार्मिक यात्रांच्या, कुंभमेळाच्या मागे दडलेली कारणमिमांसा व नैसर्गिक चक्ररचना कारणीभूत असू शकेल कां ?

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..