भगवान बुद्ध देशोदेशी फिरत असताना एका राजाच्या राज्यात गेले. बुद्ध आपल्या राज्यात आले आहेत हे समजताच त्या राजाने त्यांना सन्मानाने आपल्या दरबारात नेले. त्यांचा आदर-सत्कार केल्यावर त्यांना विचारले, ”मला आपल्यासारखी मन:शांती लाभेल का ?” त्यावर बुद्धांनी उत्तर दिले, ”अवश्य लाभेल. माझ्याजवळ बरीच संपत्ती होती; पण विचारांनी मी दरिद्री होतो. आतमध्ये काहीच नव्हतं. त्यामुळे जे मला शक्य झालं ते तुलाही जमेल. जे एकाला करता येतं ते दुसर्यालाही करता येईल. तू ही असाच शांतिवृक्ष बनशील कारण प्रत्येकाची आंतरिक शक्ती सारखी आहे. पण तुला त्यासाठी काहीतरी करावं लागेल.” त्यावर राजा म्हणाला, ”मी सर्व काही सोडून द्यायला तयार आहे. अगदी माझे राज्य सुद्धा.” त्यावर बुद्ध म्हणाले, ”माझे’ गमवून किवा त्याचा त्याग करून शांती मिळणार नाही. कारण त्यात ‘माझे सोडले’ हा भाव शेवटी आहेच. तेव्हा जो ‘स्वत:लाच’ विसरायला तयार असतो त्यालाच शांती मिळेल.”
तात्पर्य : ‘स्वत:च’ समर्पित झाल्याशिवाय शांती मिळत नाही.
Leave a Reply