गोविदा एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला होता. पण लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आपले व आईचे पोट भरण्यासाठी त्याला एका सरदाराच्या घरी चाकरी करावी लागली. गोविदाला त्या घरात घराची साफसफाई करणे, देवघर साफ करणे, पूजेची तयारी करणे याशिवाय कावडीने विहिरीचे पाणी भरायचे कामसुद्धा त्याच्याकडेच होते. सर्व कामं होता होता दिवस संपत असे त्याला रिकामा असा वेळच मिळत नसे. पण आज वडिलांच्या पश्चात त्याचा आणि आईचा उदारनिर्वाह त्यावरच अवलंबून होता. त्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता.
एक दिवस वाड्यात गोंधळ झाला होता. सरदार अतिशय रागवलेले होते. वाड्यात प्रत्येकजण कांहीतरी शोधत होता. सरदारांची हिर्याची अंगठी हरविली होती. आजपर्यंत वाड्यात कधी वस्तू हरविली नव्हती. गोविदा नवीनच वाड्यात यायला लागला होता त्यामुळे त्याच्यावरच संशय होता. त्याला बोलावून त्याबद्दल विचारले असता, ‘‘मी चोरी केलेली नाही’’ ठामपणे त्याने उत्तर दिले. पण सरदारांनी गोविदाला देवघरात नेले व देवावरील फूल उचलून खरे बोलण्यास सांगितले. फूल उचलत गोविदा म्हणाला, ‘‘देवा मी चोरी केलेली नाही. आता खरं काय ते तूच सांग’’ तेवढ्यात सरदारांचे लक्ष देवघरातल्या तीर्थ असलेल्या ताम्हनात गेले. त्यांना त्यात कांहीतरी चमकल्यासारखे वाटले. पाहातात तो अंगठी पूजा करताना त्यात गळून पडली होती. सरदारांनी गोविदाला, ‘‘तू चोर नाहीस !’’ अशी कबुली दिली. त्यावर गोविदाने देवाला हात जोडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘सत्याचा वाली परमेश्वर !’’
तात्पर्य – सत्याचा वाली परमेश्वर.
Leave a Reply