चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याची घडी आर्य चाणक्यांनी अतिशय उत्तम बसविली होती. एकेका अधिकाराच्या जागेवर त्या विषयांची तज्ज्ञ व्यत्रि*ची त्याने नेमणूक केलली होती. तसेच राजपंडित सुद्धा त्यांनी त्याच योग्यतेचे निवडले होते. अमोध वक्तृत्व असलेल्या त्यांच्या राजपंडिताची कीर्ती आसपासच्या राज्यात पोहोचली होती. एकदा शेजारच्या राजाकडून पंडितांना निमंत्रण आले. ते स्वीकारून राजपंडित शेजारच्या राज्यात गेले. राजाने त्यांचे स्वागत केले आणि म्हणाला, ”आपलं वक्तृत्व आमच्या विद्वान पंडितांना ऐकवाल का ?” त्यावर राजपंडित म्हणाले, ”आनंदाने ! आपण माझं भाषण कुठे ठेवलं आहे ?” त्यावर राजानी बाजूच्या महालाकडे खूण केली. दोघं चालत त्या महालात गेले. राजपंडितांनी सभोवार पाहिले तर एकही श्रोता तिथे नव्हता. राजपंडित व्यासपीठावर गेले आणि आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी दीड तास अप्रतिम व्याख्यान दिले. राजाची अपेक्षा होती की श्रोते नाहीत हे पाहून राजपंडित भाषण न देता परत जातील. शेवटी राजाने पंडितांना विचारले, ”एकही श्रोता नसताना तुम्ही इतके सुरेख भाषण कसे काय दिलेत ?” त्यावर राजपंडित म्हणाले, ”तुमच्यासारखे विद्वान तर होते पण खेद एका गोष्टीचा होतो की तुमच्या राज्यात चांगले विचार ऐकायला एकही विद्वान पंडित नसावा याचा.” त्यांच्या बोलण्याने राजा मात्र फारच खजिल झाला.
तात्पर्य – बाजू उलटवण्याचे चातुर्य पण हवे.
Leave a Reply